Press "Enter" to skip to content

६३.९०० कि.मी लांबी व एकूण ४१४.६८ कोटींचा खर्च असलेल्या या तीन प्रकल्पांचे भूमीपूजन

मुंबई – गोवा महामार्गाचे काम येत्या डिसेंबर पर्यंत पूर्ण होईल : केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी

सिटी बेल ∆ पनवेल ∆ प्रतिनिधी ∆

मुंबई-गोवा महामार्गाचे काम यावर्षीच्या डिसेंबरपर्यंत पूर्ण होईल, ज्यामुळे महाराष्ट्रातील कोकण विभागाच्या विकासाला मोठी चालना मिळेल, असे प्रतिपादन केंद्रीय रस्ते,वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी आज(दि. ३० मार्च) खारपाडा टोल प्लाझा येथे केले.

कोकणासाठी महत्वपूर्ण असलेल्या राष्ट्रीय महामार्ग क्र.६६ मुंबई ते गोवा या महामार्गावरील पनवेल ते कासू (लांबी ४२. ३००कि.मी. आणि खर्च २५१. ९६ कोटी) या रस्त्याचे काँक्रिटीकरण, राष्ट्रीय महामार्ग क्र.९६५ डीडी राजेवाडी फाटा ते वरंध गाव (लांबी १३ कि.मी. आणि खर्च १२६. ७३ कोटी) व राष्ट्रीय महामार्ग क्र.९६५ डीडी वरंध गाव ते पुणे जिल्हा हद्द (लांबी ८. ६० कि.मी. आणि खर्च ३५. ९९ कोटी ) या रस्त्याच्या काँक्रिटीकरणासह दुपदरीकरण करणे, अशा एकूण ६३. ९०० किलोमीटर लांबी व एकूण ४१४. ६८ कोटी रुपये खर्च असलेल्या या तीन प्रकल्पांचा भूमीपूजन सोहळा कार्यक्रम त्यांच्या हस्ते पनवेल तालुक्यातील खारपाडा टोल प्लाझाजवळ संपन्न झाला, त्यावेळी ते बोलत होते.

यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून राज्याचे उद्योग मंत्री तथा रायगड-रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत, सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण, माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, खासदार श्रीरंग बारणे, खासदार सुनिल तटकरे, भाजपचे रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर,आमदार महेश बालदी, आमदार रवींद्र पाटील, माजी आमदार धैर्यशील पाटील, या रस्त्याचे कॉन्ट्रॅक्टर उद्योजक जे.एम.म्हात्रे, पी. डी. देशमुख, भाजपचे ज्येष्ठ नेते वाय. टी. देशमुख, पनवेल महानगरपालिकेचे माजी सभागृहनेते परेश ठाकूर, अपर जिल्हाधिकारी अमोल यादव,राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण,मुंबई विभागाचे क्षेत्रीय अधिकारी अंशुमाली श्रीवास्तव, मुख्य अभियंता श्री.शेलार, पनवेल प्रांताधिकारी राहुल मुंडके, पेण प्रांताधिकारी विठ्ठल इनामदार, पनवेल तहसिलदार विजय तळेकर, पेण तहसिलदार स्वप्नाली डोईफोडे आदि मान्यवर उपस्थित होते.

श्री.गडकरी म्हणाले, भूसंपादन, परवानग्या, कंत्राटदारांच्या अडचणी यासारख्या समस्यांमुळे कोकण विभागातील अनेक कामांना अनंत अडचणी येत होत्या, मात्र आता भारत सरकारच्या केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्रालयाने ही जबाबदारी स्वीकारली आहे. यावेळी त्यांनी १३ हजार कोटी रुपयांच्या मोरबे-करंजाडे रस्त्याच्या बांधकामाची घोषणा केली, जो जवाहरलाल नेहरू बंदरातून जाईल आणि मुंबई ते दिल्ली अंतर कापण्यासाठी लागणारा वेळ 12 तासांपर्यंत कमी करेल. १२०० कोटी रुपयांच्या कळंबोली जंक्शन आणि १ हजार १४६ कोटी रुपयांच्या पागोटे जंक्शनचे कामही लवकरच सुरू होईल, असेही त्यांनी सांगितले श्री.गडकरी म्हणाले की, मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाचे काम यावर्षी डिसेंबरपर्यंत पूर्ण होईल, ज्यामुळे कोकण क्षेत्राच्या विकासाला मोठ्या प्रमाणात चालना मिळेल. “मुंबई-गोवा महामार्ग महाराष्ट्राच्या कोकणातील ६६ पर्यटनस्थळांना स्पर्श करतो. त्यातून विकासाला मोठी चालना मिळेल. या महामार्गाचे काम पूर्ण होण्याने कोकणातील फळे आणि इतर उत्पादनांची जलद वाहतूक देखील होईल. त्यातून व्यवसायास चालना मिळेल. रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्रालयाने या कामासंबंधी २०११ मध्ये बांधकामासाठी दोन स्ट्रेच देण्यात आलेल्या संबंधित कंत्राटदारांना या कामातील दिरंगाईसाठी जबाबदार धरले. आता सर्व प्रकरणे निकाली निघाली आहेत. आता महामार्गाचे ११ टप्प्यांत बांधकाम व रुंदीकरण करण्यात येणार आहे. जेएनपीटी आणि दिघी बंदर यांना जोडणारा महामार्ग देशाच्या प्रगतीला निश्चित हातभार लावेल” असा विश्वास व्यक्त करून त्यांनी राज्य सरकारांना ६ ते ८ इंच टॉपिंग असलेले रस्ते बनविण्यास प्राधान्य देण्यास सांगितले, जेणेकरुन हे रस्ते किमान ५० वर्षे टिकतील, तसेच दुरुस्तीसाठी कमी खर्च येईल. “भारतात वर्षाला ५ लाख रस्ते अपघात होतात, ज्यापैकी दिड लाख प्राणघातक असतात, त्यापैकी बरेच जण १८ ते ३४ वयोगटातील मृत पावतात. हे त्रासदायक आहे. याबाबत गंभीर दखल घेण्याची आवश्यकता असल्याचे सांगून अपघातांना आळा घालण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले पाहिजेत, असे ते म्हणाले.

श्री. गडकरी म्हणाले की, रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्रालय वाहतुकीला अडथळा आणणारे टोल नाके न ठेवता महामार्गांवर उपग्रह-आधारित भाडे संकलन सुरू करण्याच्या प्रक्रियेत आहे.

रायगड जिल्हा विकासाकडे जाणारा जिल्हा आहे. तसेच कोकणातील सर्व खासदार, मंत्री आणि लोकप्रतिनिधींनी मिळून कोकणच्या सर्वांगीण विकासाचा ध्यास घ्यावा. सर्वसमावेशक विकास आराखडा तयार करावा, शासन, लोकसहभाग आणि खाजगी संस्था अशा एकत्रित गुंतवणुकीतून कोकणातील अनेक विकास कामे होऊ शकतात, असे आवाहन करून येथील जलशक्तीचा वापर करून पर्यटन आणि दळणवळणाच्या उद्देशाने लांबच लांब समुद्रकिनारा लाभलेल्या कोकण प्रदेशासाठी सी प्लेन, हॉवरक्राफ्ट आणि वॉटर टॅक्सी सिस्टिमच्या व्यवहार्यतेचा महाराष्ट्र राज्याने अभ्यास करावा.या पर्यायांना लवकरात लवकर प्रत्यक्ष कार्यान्वित करण्यासाठी सर्व प्रकारचे प्रयत्न करायला हवे, त्यासाठी माझ्याकडूनही सर्व प्रकारचे सहकार्य दिले जाईल. त्यातून आपल्या देशाचा कॅलिफोर्निया अशी ओळख असलेल्या या कोकणचा पर्यटन व औद्योगिक दृष्टीने निश्चितच विकास होईल. यामुळे स्थानिक युवकांना रोजगार मिळेल,असा विश्वासही नामदार नितीन गडकरी यांनी शेवटी व्यक्त केला.

यावेळी आमदार प्रशांत ठाकूर यांनी आपल्या भाषणात सांगितले कि, आजचा रामनवमीचा दिवस आहे आणि आजच्या दिवशी एकीकडे सर्वत्र महाराष्ट्रात देशात भक्तिभावाचा गजर सुरू आहे आणि अशा वेळेला विकासाचा मंत्र जपत या महाराष्ट्राला उर्जित अवस्था आणून देण्यासाठी सातत्याने केंद्रीय मंत्री नितीन गडकरी साहेब कार्यरत आहेत.मुंबई ते गोवा या महामार्गाची चर्चा दीर्घकाळ होत राहिली पण या महामार्गाला आपल्या विकासाशी जोडून या कर्नाळा किल्ल्याच्या पायथ्याशी आपण आज जेव्हा एकत्रित झालेला आहोत या संपूर्ण पनवेल आणि परिसरातील लोकांच्या ज्या सातत्याने या रस्त्याच्या बाबतीतल्या विवंचना होत्या, वेगवेगळ्या अपघातांच्या संदर्भातल्या तक्रारी होत्या या तक्रारींचा निवारण करण्यासाठी आणि विकासाचा एक एक मार्ग आपल्या सर्वांना उपलब्ध करून देण्यासाठी गडकरी साहेबांनी पाऊल उचललेला आहे. पनवेल पासून ते कासूपर्यंत रस्त्याचे ४२ किलोमीटरची लांबी त्याच्या २५१ कोटी रुपयांच्या विकासकामाचे आज या ठिकाणी शुभारंभ झाला. त्यासाठी मी पुन्हा एकदा आपल्या सर्वांच्या वतीने सन्माननीय गडकरी साहेबांचं मनापासून आभार व्यक्त करतो. खरं तर आपल्या रायगड जिल्ह्याच्या विकासासाठी अनेक वेगवेगळ्या पद्धतीचे प्रकल्प गडकरी साहेबांच्या माध्यमातून जिल्ह्याला मिळाले आहेत. इंदापूर पासून ते पुढे जारा पात्रादेवी पर्यंतचा रस्ता हा जवळपास काँक्रिटीकरण पूर्ण होत आलेला आहे आपल्याला रायगडच्या दिशेने जाणारा महाड ते पाचाड या रस्त्याच्या काँक्रिटीकरण कामाला सुरुवात झालेली आहे आणि त्याचबरोबर आपल्या या रायगड जिल्ह्यामधला माणगाव पासून ते दिघी पोर्टपर्यंत जाणारा रस्ता याचाही काँक्रिटीकरण, खालापूर पासून पाली आणि पुढे दिघी पर्यंतचा कनेक्शन या रस्त्यांच्या साठी नितीन गडकरी साहेबांनी या ठिकाणी भरभरून असा निधी दिला.त्यामुळे जिल्हयातील आर्थिक कारण मोठ्या प्रमाणात ढवळून निघाले आहे. आपल्याकडे जेएनपीटीच्या रस्त्यांच्या लोकार्पणासाठी आले त्यावेळेला कळंबोली येथील जंक्शनच्या विकासासाठी त्या ठिकाणी सुद्धा साडेआठशे कोटीच्या कामाचा शुभारंभ आदरणीय गडकरी साहेबांच्या माध्यमातून झाला आहे आणि त्याचबरोबर जेएनपीटी पासून राष्ट्रीय महामार्ग ६६ आणि पुढे नॅशनल हायवे क्रमांक ०४ याला जोडणाऱ्या रस्त्याचा सुद्धा आदरणीय गडकरी साहेबांच्या हस्ते भूमिपूजन झालेखऱ्या अर्थानं या संपूर्ण परिसराच्या विकासाच्या दृष्टिकोनातून एक महत्त्वाचा टप्पा गाठला गेला. आपल्या परिसरातले अनेक जण त्या ठिकाणी काम करतात आणि अशा वेळेला त्या रस्त्यावरून जाणारे जे दुचाकी वाहन चालकांचे वारंवार अपघात होतात, परंतु सर्विस रोड या नावाची संकल्पना विचारात कोणी घेत नव्हतं गडकरी साहेबांनी अशा पद्धतीच्या आग्रह धरला त्यामुळे गाव ठिकाणी सर्व्हिस रोड होऊन अनेकांचे जीव वाचले आहेत. त्यामुळे अनेक प्रकल्पांच्या माध्यमातून या रायगड जिल्ह्याचा विकास साधण्यासाठी गडकरी साहेबांनी जे पाऊल उचलले त्याबद्दल मी त्यांना मनापासून धन्यवाद देतो. देशाच्या विकासासाठी अहोरात्र झटणारे नामदार नितीन गडकरी यांनी विकासाच्या बरोबरीने जीवाची सुरक्षाही रस्त्यांच्या माध्यमातून दिली आहे, असेही आमदार प्रशांत ठाकूर यांनी अधोरेखित केले.

आमदार महेश बालदी यांनी नामदार नितीन गडकरी यांच्या कार्याचा गौरव करतानाच त्यांच्या दूरदृष्टीमुळे मोठया प्रमाणात वाहतूक व्यवस्थेत प्रगती होत असल्याचे अधोरेखित केले. त्याच बरोबर जेएनपीटी ते खालापूर रस्त्याच्या कामाला लवकरात लवकर सुरुवात व्हावी, अशी मागणी केली.

या कार्यक्रमाच्या निमित्ताने खासदार श्रीरंग बारणे,खासदार सुनिल तटकरे, राज्याचे उद्योग मंत्री तथा रायगड जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत, सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांची समयोचित भाषणे झाली. या सर्वच मान्यवरांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची कामाप्रति असलेली निष्ठा सर्वांनीच आदर्श घ्यावा,अशी असल्याचे मत व्यक्त करून मुंबई-गोवा महामार्गाचे काम त्यांनी जिद्दीने हाती घेतल्याबाबत त्यांचे आभार व्यक्त केले. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते मान्यवरांच्या उपस्थितीत या तीन प्रकल्पांचे भूमीपूजन डिजिटल पद्धतीने संपन्न झाले. त्यानंतर या प्रकल्पाची सविस्तर माहिती देणारी ध्वनीचित्रफित प्रदर्शित करण्यात आली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे अंशुमाली श्रीवास्तव यांनी केले. आभार प्रदर्शन यशवंत घोटकर यांनी केले. तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुप्रसिद्ध निवेदक कुणाल रेगे यांनी केले.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.