सिटी बेल ∆ उरण ∆ सुनिल ठाकूर ∆
उरण तालुक्यातील चिरनेर येथील श्री महागणपती सेंद्रिय शेती बचत गटाच्या मार्फत चिरनेर येथे एका शेतावरच्या ओढ्याला बंदिस्त करून, श्रमदानातून वनराई बंधारा बांधण्यात आला आहे.
पावसाळा संपताच पाण्याचे विविध स्तोत्र तळ गाठत असतात. मात्र काही ठिकाणी हेच पाणी आपण आडवू शकतो. आणि हेच पाणी शेतकरी आणि पशु पक्षांसाठी वरदान ठरत असते. पाऊस गेला की, ओढे काही दिवसातच सुखे ठाक पडतात. यामुळे गाव पातळीवर वनराई बंधारे बांधून, पाणी आडवा पाणी जिरवा ही संकल्पना राबविणे काळाची गरज आहे. हे वनराई बंधाऱ्यांचे पाणी रब्बी हंगामातील पिकांसाठी तसेच विहिरींच्या पाण्याच्या पाणी पातळीत, वाढ होण्यासाठी उपयुक्त ठरत आहेत.
यामुळे शेतकऱ्यांनाही भाजीपाल्याचे उत्पादन घेता येते. तसेच त्यांच्या रोजगाराचा प्रश्न ही मार्गी लागतो. विशेष म्हणजे गुरांची व जंगली प्राण्यांची तहान भागविण्यासाठी या पाण्याचा उपयोग होतो. असे ग्रामीण भागात बंधारे बांधून पाणी अडविले तर या पाण्यामुळे आठ महिने विविध प्रश्न मार्गी लागतात.
चिरनेर येथील महागणपती सेंद्रिय शेती बचत गटाचे गटप्रमुख व कृषी मित्र प्रफुल्ल खारपाटील आणि कृषी सहाय्यक निखिल देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली ही संकल्पना राबवून, तालुक्यातील बहुतेक ओढे आता तळ गाठण्याच्या तयारीत असताना, उपाय योजनेच्या दृष्टिकोनातून, चिरनेर येथे ओढ्याच्या प्रवाह असलेल्या ठिकाणी सिमेंट आणि खताच्या रिकाम्या गोणीमध्ये वाळू माती भरून, या गोणी प्रवाहाच्या ठिकाणी एकावर एक रचून, ठेवून श्रमदानातून वनराई बंधारा बांधण्यात आला. यामुळे आता भूजल पातळी वाढण्यास मदत होईल.
याप्रसंगी बंधारे बांधून पाणी अडविणे ही प्रत्येकाची नैतिक जबाबदारी आहे. असे कृषी मित्र प्रफुल्ल खारपाटील व कृषी सहाय्यक निखिल देशमुख यांनी उपस्थित शेतकऱ्यांना यावेळी संबोधित केले. यावेळी मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित होते.
Be First to Comment