माजी आमदार सुरेश लाड यांनी केला समर्थकांसह भाजपात प्रवेश
सिटी बेल ∆ कर्जत ∆ विजय मांडे ∆
कर्जत विधानसभा मतदार संघाचे माजी आमदार सुरेश लाड यांनी आपल्या समर्थकांसह भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला. सुरेश लाड यांच्या बद्दल मतदार संघात उलट सुलट चर्चेला उधाण आले होते .त्यांच्या आज झालेल्या प्रवेशाने या सर्व प्रश्नांवर पडदा पडला. हा प्रवेश सोहळा नागपूर येथे झाला. लाड या मतदार संघात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या तिकिटावर तीन वेळा निवडून आले होते. त्यांच्या भाजपा प्रवेशाने कर्जत विधानसभा मतदार संघातील राजकारण बदलणार आहे.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, मंत्री सुधीर मुनगुंटीवार, मंत्री रवींद्र चव्हाण, माजी मंत्री पंकजा मुंढे, आमदार प्रशांत ठाकूर, रायगड जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी, किसान सेल प्रदेश उपाध्यक्ष सुनील गोगटे, जिल्हा उपाध्यक्ष वसंत भोईर, कर्जत विधानसभा अध्यक्ष किरण ठाकरे, नितीन कांदळगावकर, मंगेश म्हसकर, तालुकाध्यक्ष राजेश भगत यांच्या उपस्थितीत माजी आमदार सुरेश लाड यांनी आपल्या समर्थकांसह भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला. राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हा कार्याध्यक्ष पंचायत समिती माजी सभापती तानाजी चव्हाण, राजिप माजी सभापती नरेश पाटील, जेष्ठ कार्यकर्ते राम राणे, माजी नगराध्यक्ष शरद लाड, राजेश लाड, स्मिता पतंगे, माजी शहराध्यक्ष नंदू लाड, कर्जत तालुका युवक अध्यक्ष सागर शेळके, विजय हजारे, प्रतीक्षा लाड – एगडे, जगदीश ठाकरे, राजू हजारे, कृष्णा जाधव, संदीप पाटील, श्वेता मनवे, प्रविण मनवे, देविदास बडेकर, सुनील सुखदारे, समीर देशमुख, राकेश जाधव, ऋषिकेश दाभाडे, बिलाल आढाळ, सचिन ओसवाल, बळीराम बडेकर, तुषार देशमुख, पंकज बडेकर, कृष्णा आंबवणे,
श्रीकांत पाटील आदी कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला.
सुरेश लाड पूर्वीपासून काँग्रेस पक्षाचे होते. दहिवली ग्रामपंचायतीचे सदस्य असताना त्यांनी राजकारण करून त्या ग्रामपंचायतील भाजपाची सत्ता उलथवून सरपंच झाले होते. त्यांनंतर कर्जत पंचायत समितीचे सभापती आणि 1999 साली राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष स्थापन झाल्यानंतर त्यांना विधानसभेची उमेदवारी देण्यात आली व शेतकरी कामगार पक्षाबरोबर आघाडी असल्याने ते विधानसभेत पोहोचले. 2004 साली देवेंद्र साटम यांनी त्यांचा पराभव केला. मात्र पराभवाने खचून न जाता त्यांनी मतदार संघात काम केले आणि 2009 साली त्यांनी आमदार साटम यांचा पराभव करून पुन्हा आमदारकी मिळविली. 2014 साली त्यांना पुन्हा पक्षाने उमेदवारी दिली मात्र त्यावेळी नवखे उमेदवार महेंद्र थोरवे यांनी निवडणुकीत चांगलीच चुरस आणली. त्यामुळे लाड अवघ्या अठराशे मतांनी निवडून आले.
2019 साली त्यांनी शिवसेनेत जाण्याचा विचार केला होता मात्र खासदार सुनील तटकरे यांनी त्यांची समजूत काढली व पक्षाने पुन्हा त्यांना उमेदवारी दिली. मात्र त्यावेळी महेंद्र थोरवे यांनी त्यांचा अठरा हजार मतांनी पराभव करून विधानसभेत प्रवेश केला. त्यांच्या या पराभवाची अनेक कारणे आहेत. जानेवारी 2019 च्या नगरपरिषद निवडणुकीत सोबत असलेल्या काँग्रेस व शेतकरी कामगार पक्षाला एकही जागा न देणे. हे त्यातील एक महत्वाचे कारण आहे. लाड आणि खासदार सुनील तटकरे यांची मैत्री सर्वांना माहीत आहे. मात्र 2019 च्या निवडणुकीत पराभव त्यांच्या जिव्हारी लागला आणि तेंव्हा पासून त्यांचे मन राजकारणात लागत नव्हते.
रायगड जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सुधाकर घारे हे तटकरे यांच्या अधिक जवळ गेले. तसेच तटकरे यांनीही घारे यांना वेळोवेळी मदत केली व अजूनही करीत आहेत. या साऱ्या घडामोडींमुळे लाड यांची घुसमट होत होती. त्यामुळे त्यांनी भारतीय जनता पार्टीत प्रवेश करण्याचा निर्णय घेतला. गेली 45 वर्षे काँग्रेसचे विचारसरणीचे असलेले सुरेश लाड यांनी 68 व्या वर्षी भारतीय जनता पार्टीत प्रवेश का केला? असा प्रश्न अनेकांना पडला आहे. ते 2019 सालीच शिवसेनेत गेले असते तर ते नक्कीच आमदार होऊन मंत्री सुद्धा झाले असते. असे अनेक राजकीय तज्ञांचे मत आहे. त्यांच्या भाजपा प्रवेशाने कर्जत विधानसभा मतदार संघातील शरद पवार गटाच्या राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. तसेच कर्जत विधानसभा मतदार संघातील राजकारण बदलणार आहे.
Be First to Comment