Press "Enter" to skip to content

बदल घडवणाऱ्या सावित्रीच्या पाच लेकी


दुर्गम भागातील आदिवासी मुलींची अभिमानास्पद कामगिरी


सिटी बेल लाइव्ह / खांब-रोहे (नंदकुमार मरवडे)


दहावीचा निकाल लागला त्यात अनेक मुलांनी यश संपादन केले.त्यात ह्या पाच मुली यावर्षी फक्त दहावी पास झाल्या नसून त्यांनी एक आदर्श निर्माण केला आहे.
रोहा तालुक्यातील पाले खुर्द आदिवासीवाडी येथील ह्या सर्व मुली.मुख्य रस्त्यापासून सुमारे १ किमी डोंगरात वसलेली वाडी.२०१० च्या ह्या पहिलीच्या बॅचच्या ह्या पाच मुली. ह्या कन्यांनी ज्यावेळी पहिलीत प्रवेश घेतला होता त्यावेळी आदिवासीवाडीतील एकही मुलगी १० वी पर्यन्त किंवा १० वी पास झालेली नव्हती.अशा वातावरणात ह्या मुलींनी शिक्षणाचा श्रीगणेशा केला होता. सर्वांच्या घरची परिस्थिती बिकट,आई वडील जेमतेम शिकलेले तर काहींचे निरक्षर.त्यावेळी वाडीतील मुलींचे शिक्षण जेमतेम ८ वी वी पर्यन्त व्हायचे मग आदर्श घ्यावा तर कोणाचा असा प्रश्न मुलींपुढे निश्चित यायचा. अशा वातावरणात ह्या पाचही मुलींनी पहिली ते चौथी पर्यंतचे शिक्षण त्यावेळचे शिक्षक गजानन जाधव या ध्येयवेड्या शिक्षकांजवळ घेतले.
अनेकदा घरच्या लहान भावंडाना सांभाळणे,घरचे कामे करणे,बकऱ्याच्या सांभाळणे ,कधी कधी आईवडिलांना कामात मदत करणे असे कामे करत करत ह्या मुलींनी जिद्दीने प्राथमिक शिक्षण पूर्ण केले.
पुढे पाचवीच्या शिक्षणासाठी कोलाडला जावे लागायचे त्यावेळी गजानन जाधव यांनी पालकांना सांगून त्यांना हायस्कुलमध्ये प्रवेश घ्यायला लावला त्यानंतर ह्या मुली दररोज २ किमी डोंगर उतरून-चढून व पुढील ८ किमी चा प्रवास कधी चालत तर कधी पैसे असल्यास रिक्षाने करून शाळा न चुकवता ५ वी ते १० वी चा टप्पा पूर्ण केला.
ता.२९ रजी १० वी चा निकाल लागला व ह्या पाच कन्यांचा निकाल काय लागेल ह्याची सा-यांनाच उत्सुकता लागली होती व सायंकाळी बातमी आली की ह्या पाचही मुली चांगल्या गुणाने पास झाल्या.त्यातील कु.मोहिनी वामन जाधव ५७.२० %, कु.रेश्मा रामचंद्र वाघमारे ६१.८० %, कु.दीपाली राजेश जाधव ५१.२०%, कु.शुभांगी महेंद्र वाघमारे ५७.२०%, कु.रोहिणी रविंद्र वाघमारे ५९.२०% गुण घेऊन उत्तीर्ण झाल्या आहेत.
खरं तर या मुलींचे कौतुक सा-यानाच यासाठी वाटत की ज्या कातकरी आदिवासी समाजात ह्या मुली राहतात तेथे शिक्षणाचे प्रमाण खूप कमी आहे व त्यात मुलींच्या शिक्षणाच्या बाबतीत खूप उदासीनता पण नजीकच्या काळात परिवर्तन होऊन शिक्षणाचे महत्व समजल्यामुळे अनेक पालक मुलींच्या शिक्षणासाठी आग्रही झाले आहेत.ह्या मुलींने आज फक्त दहावीचा टप्पा पूर्ण केला नसून समाजातील इतर मुलींसाठी आदर्श घालून दिला आहे. आज या या निकालाने
या पाचही मुलींचे व तिच्या आईवडिलांचे सर्वच स्तरातून खूप कौतूक व अभिमान वाटत आहे.ह्या पाचही सावित्रीच्या लेकींना पुढील शैक्षणिक वाटचालीस सर्व स्तरातून शुभेच्छांचा वर्षाव होताना दिसत आहे.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.