Press "Enter" to skip to content

‘कॉमेडियन नव्हे, राष्ट्रद्रोही !’ या विषयावर ऑनलाईन विशेष परिसंवाद !

भारताचा अपमान करणार्‍या ‘वीर दास’सारख्या कलाकारांना तुरुंगात टाका ! – सुनील पाल, प्रसिद्ध हास्य-कलाकार

सिटी बेल | उरण | विठ्ठल ममताबादे |

भारताच्या गौरवशाली गोष्टींविषयी सर्वांना अभिमान आणि आदर असला पाहिजे. अमेरिकेत जाऊन आपल्या भारताची बदनामी करणार्‍या वीर दास यांच्या वक्तव्याची मी निंदा करतो. हास्य-कलाकाराचे काम निखळ विनोदातून लोकांना हसवणे असतांना देशाची बदनामी करणे, अश्‍लील-गलिच्छ विनोद करणे, शिवीगाळ करणे, हिंदु देवतांविषयी अपशब्द वापरणे हा एकप्रकारचा वैचारिक आतंकवाद आहे. यांच्यापेक्षा रस्त्यावरील दारूडे हे लोकांचे चांगले मनोरंजन करतात. मोठ्यांचा सन्मान आणि सामाजिक मर्यादा न पाळणार्‍या अशा लोकांना हास्य-कलाकारच काय, तर कलाकार म्हणूनही मी मानत नाही. हे लोक समाजाचे शत्रू आहेत. देशाच्या शत्रूला जी शिक्षा दिली जाते तीच शिक्षा त्यांना द्यायला हवी. त्यांना तुरुंगात टाकल्याशिवाय तेे सुधारणार नाहीत, असे रोखठोक प्रतिपादन मुंबई येथील प्रसिद्ध हास्य-कलाकार सुनील पाल यांनी केले आहे. हिंदु जनजागृती समिती आयोजित ‘कॉमेडियन नव्हे, राष्ट्रद्रोही !’, या ऑनलाईन विशेष परिसंवादात ते बोलत होते.

या वेळी मुंबई येथील ‘सॅफ्रन थिंक टँक’चे संस्थापक सिद्धांत मोहिते म्हणाले की, ‘भारतात दिवसा महिलेची पूजा होते आणि रात्री गँग रेप केला जातो’ असा दुष्प्रचार करणारे वीर दास एकटे नाहीत, यात बॉलीवूडमधील काही मोठी मंडळी सहभागी आहेत. यापूर्वी छत्रपती शिवाजी महाराजांविषयी आक्षेपार्ह वक्तव्ये करण्यात आली होती. वीर दासच नव्हे, तर अग्रीमा जोशूवा, मुनव्वर फारूकी, कुणाल कामरा असे अनेक कलाकार आहेत की जे देवी-देवतांवर गलिच्छ विनोद करतात. हे लोक मुसलमान किंवा ख्रिश्‍चन धर्मियांच्या श्रद्धास्थानांविषयी विनोद करण्याचे धाडस का करत नाहीत ? कर्नाटक येथील पत्रकार लक्ष्मी राजकुमार म्हणाल्या की, हास्य-कलाकारांचे वर्तन पहाता त्यांच्यावर उपचार करण्याची नितांत आवश्यकता आहे. आपल्या देशातील महिलांचा अपमान करणारे वीर दास एकप्रकारे स्वत:च्या मातेलाही त्याचप्रकारे तोलत आहात, हे त्यांच्या लक्षात येत नाही.

नवी दिल्ली येथील हिंदु जनजागृती समितीचे प्रवक्ते नरेंद्र सुर्वे म्हणाले की, देवीदेवता, संत, राष्ट्रपुरुष, धर्मग्रंथ, भारतमाता यांच्याविषयी विनोद करून लोकांच्या मनातील श्रद्धा कमी करण्याचा हा प्रकार गेल्या काही वर्षांपासून चालू आहे. पूर्वी चित्रपट, नंतर वेब सिरीज आणि आता स्डँड-अप कॉमेडी अशा विविध माध्यमांतून अवमान केला जात आहे. नुकतेच अलाहाबाद उच्च न्यायालयाने रामायण, गीता, राम, कृष्ण आदी आपले राष्ट्रीय सन्मान असल्याने त्यांचा आदर राखण्यासाठी कायदा केला पाहिजे, असे म्हटले आहे. त्यामुळे आमचीही मागणी आहे की, केंद्र सरकारने श्रद्धास्थानांचा अवमान राेखण्यासाठी राष्ट्रीय स्तरावर कठोर कायदा करायला हवा. यापुढे देवता आणि श्रद्धास्थाने यांचा अपमान हिंदू सहन करणार नाहीत, असेही त्यांनी सांगितले.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.