Press "Enter" to skip to content

हजारो किमींचा प्रवास निष्फळ ;अतिवृष्टीमुळे जिल्ह्यात तिबोटी खंड्या बेघर

तिबेट,भूतान व श्रीलंका या देशातून हजारो किमींचा प्रवास करून पाहुणा म्हणून येणारा तिबोटी खंड्याची घरे उध्वस्त, पिल्लांचा मृत्यू

सिटी बेल | बेणसे | रायगड |धम्मशील सावंत |

रायगड जिल्ह्यात यावर्षी अतिवृष्टीमुळे माणसांसह पशुपक्षांची देखील वाताहत झाली आहे.  तिबेट ,भूतान व श्रीलंका या देशातून हजारो किमींचा प्रवास करून जिल्ह्यात पाहुणा म्हणून येणारा तिबोटी खंड्या (Oriental Dwarf kingfisher) या पक्षाला देखील या अतिवृष्टीचा फटका बसला आहे.  जिल्ह्यातील काही पक्षी अभ्यासकांनी केलेल्या निरीक्षणावरून पूर व अतिवृष्टीमुळे तिबोटी खंड्याची घरे उध्वस्त झाली आहेत. तसेच पिल्ले देखील मेली आहेत. याबाबत पक्षी प्रेमींनी चिंता व्यक्त केली आहे.   

माणगाव विळे येथील पक्षी अभ्यासक राम मुंढे यांनी सकाळला सांगितले की    तिबोटी खंड्याच्या काही घरट्यांचे जून च्या सुरुवातीपासून पक्षी अभ्यासक राम मुंढे हे निरीक्षण करत होते. मादीने अंडी दिल्या पासून ते अंड्यातून पिल्लं बाहेर पडे पर्यंत त्यांचे सतत दोन महिने निरीक्षण चालू होते. त्यातच सलग चार ते पाच दिवस अतिवृष्टी झाल्याने त्या पावसाचे पाणी या पक्षाच्या घरट्यात घुसून ते घरटे ढासळले व त्यातील पिल्लं जागेवर मरण पावली.

अगदी काही दिवसांत ही पिल्लं भरारी घेण्याच्या तयारीत असतांना या निसर्गाचा फटका या निष्पाप जीवांना बसला आणि त्यांचा दुर्दैवी अंत झाला. यासारखी अनेक घरटी या मुसळधार पावसामुळे उन्मळून पडली आणि या पक्षांवर देखील संकट ओढवले आहे. विणीचा हंगाम निघून गेला. पिल्ले मरण पावली यामुळे या प्रजातीच्या वाढीस बाधा आली आहे.     

अनोखा संघर्ष

हजारो किलोमीटरचा प्रवास करून या पक्षाचे जून च्या सुरुवातीस जिल्ह्यात आगमन होते. साधारणतः पावसाचा आणि उपलब्ध होणाऱ्या खाद्याचा अंदाज घेऊन तो छोट्या छोट्या ओव्हळाच्या कडेला गर्द झाडीत सुमारे 2-3 फूट बीळ पाडून आपले घरटे बनवतो. या घरट्यात मादी 5 ते 6 अंडी देते, आपली उपजीविका भागवत दोघे मिळून ती अंडी उबवतात, साधारणतः 18 दिवसानंतर या अंड्यातून पिल्लं बाहेर येतात आणि अंड्यातून बाहेर आलेल्या पिल्लांना खाद्य भरवण्यासाठी नर व मादी मिळून छोटे छोटे मासे ,खेकडे, गवतावरील कीटक, छोट्या आकाराच्या चोपयी म्हणजेच सापसुरुळी, छोटी छोटी बेडके असे विविध भक्ष पकडून आपल्या पिल्लांची भूख भागवतांना दिसून येतात. मात्र यंदा अतिवृष्टीमुळे सर्व काही उध्वस्त झाले.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.