सिटी बेल लाइव्ह / उरण (घनःश्याम कडू) 🔶🔷🔷🔶
जेएनपीटी कंपनीने कोट्यवधी रुपये खर्च करून दास्तान फाटा येथे उभारलेले भव्यदिव्य शिवस्मारकाला अवघ्या एक वर्षात पहिल्याच पावसात गळती लागली आहे. यावरून सदर स्मारकाचे काम निकृष्ट दर्जाचे होऊन त्यामध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाल्याचे उघड होत असल्याची चर्चा उरणच्या जनतेत सुरू आहे. याची चौकशी करण्याची मागणी केंद्रीय नौकानयनमंत्री यांच्याकडे करण्यात आली आहे.

जेएनपीटी कंपनीच्या माध्यमातून दास्तान फाटा येथे कोट्यवधी रुपये खर्च करून भव्यदिव्य अशा प्रकारच्या शिवस्मारकाची उभारणी करण्यात आली आहे. तसेच या स्मारकाच्या उद्घाटनासाठीही कोट्यवधी रुपये खर्च करण्यात आले आहेत. जेएनपीटी कंपनीने 50 ते 60 कोटी रुपये खर्च करून भव्यदिव्य अशा शिवस्मारकाची उभारणी केली आहे. परंतु याचे उदघाटन होऊन एक वर्षाचा अवधी उलटत नाही तोच यावर्षीच्या पहिल्याच पावसात शिवस्मारकाच्या भिंतीमधून पावसाचे पाणी झिरपण्यास सुरुवात झाली आहे.
यामुळे स्मारकातील शिल्प व इतर कलाकृती पाण्यात भिजून खराब होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. जेएनपीटी प्रशासनाच्या सार्वजनिक विभागानेही याला दुजोरा दिला आहे. मात्र स्मारकाला गळती लागली नसल्याचे सांगितले. याबाबत कामगार विश्वस्त, कामगार संघटना व राजकीय पक्ष तसेच नेतेमंडळी याबद्दल काहीही बोलत नसल्यामुळे आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
कोट्यवधी रुपये खर्च करून उभारलेल्या शिवस्मारकाची जर अशा प्रकारे दुर्दशा होत असेल तर सदरच्या काम हे निकृष्ट दर्जाचे असल्याचे उघड होते. त्याचबरोबर यामध्ये जेएनपीटीतील अधिकारी वर्गाच्या सहकार्याने मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाल्याची शक्यता वर्तवली जात आहे. तरी या सर्व प्रकरणांची सखोल चौकशी करून दोषींवर कडक कारवाई करून दोषीं अधिकार्यांना निलंबित करण्यात यावे अशी मागणी केंद्रीय नौकानयनमंत्री यांच्याकडे करण्यात आली आहे






Be First to Comment