
पनवेल, दि.३१ (वार्ताहर) : सामाजिक बांधिलकी जपत गरजू विद्यार्थ्यांच्या मदतीसाठी सातत्याने कार्यरत असलेल्या मानवता फाउंडेशनच्या वतीने सुधागड तालुक्यातील सोमजाई शिक्षण संस्थेचे माध्यमिक विद्यालय, पाच्छापूर येथे विद्यार्थ्यांना छत्री वाटप करण्यात आले. पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर दुर्गम भागातील विद्यार्थ्यांना शाळेत ये-जा करताना होणारी गैरसोय लक्षात घेऊन हा उपक्रम राबविण्यात आला.
या प्रसंगी मानवता फाउंडेशनचे अध्यक्ष संजयभाऊ पवार, उपाध्यक्ष विनोद नायर, सचिव विघ्नेश मगानी, संस्थेचे ट्रस्टी दीपकजी घोसाळकर, विशाल बाबर तसेच फाउंडेशनचे अन्य पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
यावेळी फाउंडेशनच्या वतीने शालेय परिसरात वृक्षारोपण करून पर्यावरण संवर्धनाचा संदेशही देण्यात आला. सेवा आणि निसर्ग संवर्धन या दोन्ही मूल्यांचा संगम साधणाऱ्या या उपक्रमाचे शाळेचे शिक्षक, विद्यार्थी आणि ग्रामस्थांनी स्वागत केले.
मानवता फाउंडेशनचे पदाधिकाऱ्यांनी समाजातील गरजू घटकांसाठी अशा प्रकारचे सामाजिक उपक्रम भविष्यातही सातत्याने राबविण्याचा निर्धार व्यक्त केला. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रवासाला हातभार लावतानाच पर्यावरण संरक्षणाची जाणीव निर्माण करण्याचा या उपक्रमाचा उद्देश असल्याचे त्यांनी सांगितले.




Be First to Comment