
खुशबू च्या वडिलांसह ग्राम संवर्धन सामाजिक संस्था आणि राजीव गांधी पंचायतराज संगठनच्या संघर्षाला यश
रोहा : समीर बामुगडे
पेण तालुक्यातील एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प पेण अंतर्गत चालविण्यात येणाऱ्या वरवणे येथील आदिवासी आश्रम शाळेतील खुशबू नामदेव ठाकरे हिच्या मृत्यूप्रकरणी अखेर पेण पोलिस ठाण्यात भारतीय न्याय संहितेच्या कलम १०६(१) अंतर्गत वैद्यकीय अधिकाऱ्याविरुद्ध एफ.आय.आर दाखल करण्यात आल्याने खुशबू ठाकरे चे वडील नामदेव ठाकरे आणि ग्राम संवर्धन सामाजिक संस्था व राजीव गांधी पंचायत राज संघटन या सामाजिक संघटनांच्या दीड वर्षांच्या संघर्षाला मोठे यश प्राप्त झाले आहे. या प्रकरणात पोलीस तपास करण्याची जबाबदारी पेण पोलिसांवर येऊन पडली आहे.
दरम्यान ग्राम संवर्धन सामाजिक संस्था,राजीव गांधी पंचायतराज संगठन आणि खुशबू ठाकरेचे कुटुंबीय जवळपास दीड वर्ष सातत्याने पाठपुरावा करीत असताना रायगड जिल्हा परिषदेचे आरोग्य विभाग, एकात्मिक आदिवासी विकास विभाग प्रकल्प अधिकारी आणि पोलीस यंत्रणा एकमेकांकडे बोट दाखवीत गुन्हे दाखल करण्यास टाळाटाळ करत असल्याने अखेर 30 जुलैपासून पेण उपविभागीय अधिकाऱ्यांच्या कार्यालयासमोर ग्राम संवर्धन सामाजिक संस्थेचे अध्यक्ष रायगड भूषण सामाजिक कार्यकर्ते संतोष ठाकूर, राजीव गांधी पंचायत राज संघटनच्या महासचिव नंदा मात्रे आणि खुशबू ठाकरेचे वडील नामदेव ठाकरे यांनी दोशींवर गुन्हे दाखल करण्यासाठी आमरण उपोषणाचा पवित्रा घेतल्यानंतर बुधवारी रात्री दोन वाजून 17 मिनिटांनी पेन पोलिसांनी वैद्यकीय अधिकाऱ्यांवर एफ आय आर दाखल केली असल्याचे सांगत पेन उपविभागीय अधिकारी प्रवीण पवार यांनी उपोषणकर्त्यांना एफ आय आर ची प्रत देत उपोषण थांबविण्याची विनंती केल्यानंतर सामाजिक कार्यकर्ते संतोष ठाकूर यांनी या प्रकरणात महाराष्ट्र शासनाच्या कुसुम अभियानाच्या संचालकांपासून ते ज्या डॅपसन औषधामुळे खुशबू ठाकरे चा मृत्यू झाला त्या औषध निर्मात्या कंपनी मालकांसहित सर्वांची सखोल चौकशी करण्याची मागणी करत सदर उपोषण तात्पुरते स्थगित केले आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की २२ जानेवारी २०२५ रोजी उपचारादरम्यान खुशबू ठाकरे हिचा मृत्यू झाला होता. त्यानंतर तिचे वडील नामदेव ठाकरे यांनी मृत्यूबाबत संशय व्यक्त करत सखोल पोलिस चौकशीची मागणी केली होती. पुढे ग्राम संवर्धन सामाजिक संस्था, राजीव गांधी पंचायतराज संगठन आणि स्थानिक आदिवासी बांधवांनी विविध निवेदने, आंदोलने व ६ मे २०२५ रोजी तहसील कार्यालय, पेण येथे काढलेल्या आदिवासी आक्रोश मोर्चाच्या माध्यमातून दोषींवर गुन्हा दाखल करण्याची मागणी सातत्याने लावून धरली.
दरम्यान, वैद्यकीय निष्काळजीपणा (नेग्लिजन्स) समितीचा अहवाल, आरोग्य विभागाचा पत्रव्यवहार तसेच विविध स्तरांवरील चौकशी अहवालांनंतरही गुन्हा दाखल होत नसल्याने आंदोलनकर्त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली होती. या प्रकरणाची दखल महाराष्ट्र विधानसभेतही घेण्यात आली होती. एफआयआर दाखल करण्याच्या मागणीसाठी ३० जुलै २०२६ रोजी उपविभागीय अधिकारी, पेण यांच्या कार्यालयासमोर लक्षवेधी सत्याग्रह व ठिय्या आंदोलन सुरू करण्यात आले. त्याआधीच २८ जुलै २०२६ रोजी रात्री २.१७ वाजता पोलिस उपनिरीक्षक निलेश राजपूत यांच्या फिर्यादीवरून वैद्यकीय अधिकारी ममता मधुकर गजबे यांच्याविरुद्ध एफआयआर नोंदविण्यात आल्याची प्रत आंदोलनकर्त्यांना प्राप्त झाली.एफआयआर दाखल झाल्यानंतर ग्रामसंवर्धन सामाजिक संस्थेचे अध्यक्ष संतोष ठाकूर आणि राजीव गांधी पंचायतराज संगठनच्या राष्ट्रीय महासचिव नंदा म्हात्रे यांनी ही न्याय मिळविण्याच्या लढ्याची केवळ सुरुवात असल्याचे सांगितले. या प्रकरणात सुरुवातीपासून विविध कागदपत्रांच्या आधारे ज्यांच्याविरोधात आरोप करण्यात आले आहेत, त्या इतर संबंधित वैद्यकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांचीही निष्पक्ष चौकशी करून आवश्यकतेनुसार कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी त्यांनी केली.याशिवाय खुशबू ठाकरे ही अनुसूचित जमातीतील विद्यार्थिनी असल्याने उपचार प्रक्रियेत भेदभाव झाला असल्याचा आरोप करत अनुसूचित जाती-जमाती (अत्याचार प्रतिबंधक) कायद्यानुसारही गुन्हा नोंदविण्याची मागणी करण्यात आली आहे. तसेच, या गुन्ह्याचा तपास विलंब न लावता जलदगतीने पूर्ण करून सर्व संबंधित पुरावे, साक्षी आणि चौकशी अहवालांचा आधार घेत दोषारोपपत्र न्यायालयात दाखल करण्यात यावे, अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी प्रशासनाकडे केली आहे.
या प्रकरणात तपासाची पारदर्शकता राखून खुशबू ठाकरेच्या कुटुंबीयांना न्याय मिळवून देण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात
यावेळी सामाजिक कार्यकर्ते संदीप पाटील ग्राम संवर्धन सामाजिक संस्थेचे महेश पाटील, अजय कालेकर,अशोक मोकल, कैलास काटे, योगेश गोळे, किशोर शिर्के, सतीश पाटील, आदिवासी समाजाचे नेते सुनील वाघमारे, नर्मदा वाघे, वैभवी म्हात्रे अभिमन्यू म्हात्रे, नरेश कडू यांच्यासह शेकडो आदिवासी बांधव उपस्थित होते



Be First to Comment