प्रशासकीय यंत्रणेच्या बेपर्वाईने हाडाच्या शेतकऱ्याचा गेला हकनाक बळी
सिटी बेल ∆ उरण ∆ विठ्ठल ममताबादे ∆
खाजगी कंटेनर गोदामांनी त्यांच्या गोदामांच्या पाठीमागील बाजूस असलेल्या शेतकर्यांना शेतीत ट्रॅक्टर व अन्य वाहने नेण्यासाठी किमान 12 ते 15 फुटींचा रस्ता कंटेेनर गोदामांच्या बाहेरील चारही बाजूनेे ठेवणे बंधनकारक असतांनाही उरण तालुक्यात या नियमांनाच फाट्यावर मारले जात आहे.त्या बाबत ज्या प्रशासकीय यंत्रणेने अशा नियमाची अंमलबजावणी करणे गरजेचे आहे ती यंत्रणाच धृतराष्ट्रा सारखी वागत असल्याने उरण तालुक्यातील एका ‘हाडाच्या शेतकर्याचा’ हकनाक बळी गेला आहे. याबाबत उरण मधील पत्रकार अजित पाटील यांनी थेट राज्याचे मुख्यमंत्री ना.एकनाथराव शिंदे, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नानाभाऊ पटोले यांच्याकडे लेखी तक्रार करून आपली कैफियत मांडली आहे. तर या तक्रारीची प्रत येत्या काही दिवसात बांधपाडा ग्रापंचायतीला देऊन संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी करणार आहेत.

उरणच्या खोपटे गावातील शेतकरी तथा पत्रकार अजित पाटील यांचे वडील स्व. श्री. रामनाथ रघुनाथ पाटील यांचा कुटूंबियांसह शेतावर खरीपाची पेरणी करायला गेलेले असतांना चक्कर येऊन मृत्यू झाला. ज्या ठिकाणी पाटील यांची शेती आहे .त्या संपुर्ण खाडीतील शेतकर्यांना शेतीवर जाण्यासाठी बाजुच्या ऑल कार्गो लॉजिस्टीक या प्रकल्पाने किमान 12 ते 15 फुटांचा ट्रॅक्टर जाऊ शकेल एवढा रस्ता ठेवणे बंधनकारक असतांना देखील त्यांनी तो ठेवलेला नाही . त्यामुळे शेतावर चक्कर येऊन पडलेल्या रा.र.पाटील या शेतकर्याला वेळेवर उपचारासाठी नेता आले नाही. शेतांच्या बांधांवरून उचलून आणून त्यांना उपचारासाठी दवाखान्यात नेतानाच त्यांचा मृत्यू झाला आहे. त्याुमुळेच भविष्यात अशा घटना घडू नयेत या साठी उरण तालुक्यातील सर्वच कंपन्यांनी त्यांच्या प्रकल्पाच्या चारही बाजुने शेतकर्यांना शेतीवर जाण्यासाठी किान 12 ते 15 फुटांचा रस्ता ठेवला जावा अशी मागंणी या पत्रांतून अजित पाटील यांनी केली आहे. विशेष म्हणजे उरण तालुका मराठी पत्रकार संघाने देखील यापूर्वीच तालुक्यातील अनधिकृत कंटेनर यार्डांवर कारवाई करण्याची मागणी तहसीलदार व जिल्हाधिकारी यांच्या कडे केलेली आहे. मात्र तहसीलदारांनी त्या मागणीला केराची टोपली दाखवली आहे . त्या मागणीत देखील पत्रकार संघाने सर्वच कंटेनर यार्डांनी त्यांच्या प्रकल्पाच्या पाठीमागे असणाऱ्या शेतीत शेतकऱ्यांना जाण्यासाठी कंपन्यांनी प्रकल्पाच्या चारही बाजूने किमान 12 ते 15 फुटांचा रस्ता ठेवणेची मागणी केलेली आहे.
पाटील यांची शेती ज्या ठिकाणी आहे त्या खाडीपासून ते खोपटे कोप्रोली या रस्त्यापर्यंतची शेकडो एकर जमिन खरेदी करून त्या जमिनीवर शशिकिरण शेट्टी आणि त्यांचे पार्टनर यांनी ऑल कार्गो लॉजिस्टिक नावाचा प्रकल्प वसविला आहे . हा प्रकल्प वसवितांना प्रकल्पाच्या चारही बाजूनी पाठीमागील शेतीत शेतकर्यांना विनासायास जाण्यासाठी व ट्रॅक्रटर अथवा तत्सम वाहने नेण्यासाठी किमान 12 ते 15 फुटांचा रस्ता ठेवणे गरजेचे होते. या परिसरात प्रकल्प वसवितांना नियोजन प्राधिकरण म्हणून काम करणार्या सिडकोच्या नियोजनात देखील तसा नियम आहे. मात्र उरण तालुक्यातील उरण पुर्व भागात वसलेल्या बहुतांशी प्रकल्पांनी हा नियम पायदळी तुडविला आहे . तसाच तो ऑल कार्गो लॉजिस्टिक नावाच्या कंपनीने देखील पायदळी तुडविला आहे . स्थानिक तलाठी अधिकारी मंडळींनी देखील तालुक्याच्या तहसीलदारांना यापूर्वीच तशा प्रकारचा अहवाल सुपूर्द केलेला आहे. मात्र त्यानंतर ही गेली कित्येक वर्षे या कंपनीने शेतकर्यांसाठी रस्ता केलेला नाही. मध्यंतरी शेतकरी वर्गाने प्रशासनाला तक्रारी केल्यावर केवळ दोन ते अडीच फुटांचा रस्ता करण्याचा दिखावूपणा कंपनीने केला होता. मात्र तो देखील नैसर्गिक पाणी निचरा नाल्यावर आणि बांधावर अतिक्रमण करून रस्ता केला होता. जो सध्या मोठ्या प्राणात वाहून गेल्याचे दिसत आहे. आणि त्या रस्त्यावरून देखील ट्रॅकटर किंवा कोणतेही वाहन शेतकरी शेतीत नेऊ शकत नाही अशी स्थिती आहे. कंपनीने आपल्या प्रकल्पाच्या चारही बाजूने पक्क्या स्वरूपाचा रस्ता ठेवला असता तर आपल्या वडिलांना थेट वाहनाद्वारे दवाखान्यात चटकन नेणे शक्य झाले असते आणि त्यातून पाटील यांच्या वडिलांचे प्राण वाचविणे शक्य झाले असते. त्यामुळेच पाठीमागील शेतीत जाण्यासाठी रस्ता न ठेवणार्या ऑल कार्गो लॉजिस्टिक प्रकल्पाच्या भोंगळ कारभारामुळेच आणि स्थानिक प्रशासनाच्या सततच्या दुर्लक्षामुळे आपल्या वडिलांचा हकनाक बळी गेला असून संबंधितांवर कठोर कारवाई करावी अशी मागणी पत्रकार अजित पाटील यांनी मुख्यमंत्री , काँग्रेस प्रदेशाध्यक्ष यांच्याकडे लेखी निवेदनातून केली आहे.तर या तक्रारीची प्रत येत्या काही दिवसात बांधपाडा ग्रापंचायतीला देऊन संबंधितांवर कडक कारवाई करण्याची मागणी करणार आहेत.
दोन दिवसांपूर्वीच तालुक्याच्या महसूल विभागाला हादरवून सोडणारी घटना समोर आली आहे येथील जासई विभागाचे मंडल अधिकारी संदीप रमाकांत रोडे यांना अनधिकृत कंटेनर यार्डावर कारवाई करू नये याकरिता 20 हजार रुपायांची लाच घेतांना रंगेहात पकडण्यात आले आहे.







Be First to Comment