ॲड निशांत घरत यांच्या आमरण उपोषणाची यशस्वी सांगता
सिटी बेल • उरण • विठ्ठल ममताबादे •
जेएनपीटी प्रशासनाने मान्य केल्या सर्व मागण्या मान्य केल्याने अखेर ॲड निशांत घरत यांच्या आमरण उपोषणाची यशस्वी सांगता झाली आहे.
डेप्युटी चेअरमन उन्मेष वाघ यांच्या दालनात झालेल्या बैठकीत जयवंत ढवळे (CMA), संजीव पगारे, जेएनपीटी विश्वस्त कॉ.भूषण पाटील, दिनेश पाटील, रवी पाटील , सामाजिक कार्यकर्ते संतोष पवार, दिनेश घरत, प्रा.राजेन्द्र मढवी, मुख्य तक्रारदार प्रमोद ठाकूर, युवा सामाजिक संस्था जसखार वतीने अमित ठाकूर, हर्षल ठाकूर , वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर भटे आणि मनस्वी निशांत घरत उपस्थित होते. डेप्युटी चेअरमन उन्मेष वाघ यांनी ॲड निशांत घरत यांच्या सर्व मागण्यांवर सविस्तर चर्चा केली आणि सर्व मागण्या मान्य केल्या.

1) नवीन शेवा गावासाठी शासन निर्णयानुसार आवश्यक असलेली 33 हेक्टर जागा मिळवून देण्यासाठी जे सहकार्य लागेल ते करण्याचे मान्य केले.
2) नवीन येणाऱ्या प्रकल्पामध्ये प्राधान्याने प्रकल्पग्रस्तांना आणि स्थानिक भूमिपुत्रांना नोकऱ्या देखील देण्याचे मान्य केले. तसेच त्यासाठी आवश्यक असलेले प्रशिक्षण मोफत देण्यात येईल. ते प्रशिक्षण प्रकल्पग्रस्त आणि पंचक्रोशितील सर्व स्थानिक भूमी पुत्र यांनी घेण्याचे आवाहन केले.
3) सर्वात महत्त्वाच्या मुद्द्यावर म्हणजे श्रीमती मनीषा जाधव यांची पूर्ण चौकशी 30/04/2022 पर्यंत पूर्ण करण्यात येईल. आणि डेप्युटी चेअरमन उन्मेष वाघ यांनी असेही सांगितले की आपण सादर केलेले पुरावे इतके ठोस आहेत की त्यापुढे चौकशी लावण्याची देखील गरज लागणार नाही. मनीषा जाधव यांची केस इतकी ओपन अँड शट केस आहे की ती लवकरच निर्णयापर्यंत पोहोचेल. तसेच सध्या त्यांना शो कॉज नोटीस बजावण्यात आली होती त्यावर मनीषा जाधव यांनी लेखी खुलासा दिला असून त्याची चौकशी सुरू आहे. CVC कमिटी च्या मार्गदर्शक सूचनांनुसारच त्यांची चौकशी केली जाईल आणि दोषी आढळल्यास कारवाई करण्यात येईल. तुम्हाला जर काही शंका वाटत असल्यास सदर चौकशीचे सर्व कागदपत्रे ही माहिती अधिकारा अंतर्गत आपल्याला दिली जातील.असे उन्मेष वाघ यांनी सांगितले.
ह्या सर्व मागण्या मान्य झाल्याने निशांत घरत यांनी आपले आमरण उपोषण 15 व्या दिवशी स्थगित केले. आणि 30/04/2022 रोजी पर्यंत मान्य केल्याप्रमाणे श्रीमती मनीषा जाधव यांच्या वर कारवाई न केल्यास दिनांक 01/05/2022 रोजी पासून पुन्हा आमरण उपोषणाला बसन्याची नोटीस निशांतने देऊन ठेवली आहे. तसेच दर सात दिवसांनी निशांत घरत आणि प्रमोद ठाकूर वरील मागण्यांचा आणि मनीषा जाधव केस चा पाठ पुरावा करतील त्या वेळेस त्यांना लेखी स्वरूपात अपडेट माहिती दिली जाईल असे CMA जयवंत ढवळे यांनी मान्य केले.ह्या अटी आणि शर्ती वर सदर उपोषण निशांत घरत यांनी स्थगित केले आहे.कॉम्रेड भूषण पाटील यांच्या हस्ते लिंबू पाणी पिऊन निशांत घरत यांनी उपोषण स्थगित केले.
जेएनपीटी विश्वस्त भूषण पाटील, दिनेश पाटील, रवी पाटील यांनी प्रशासनापुढे योग्य प्रकारे बाजू मांडली त्यांचे निशांत घरतने मनापासून आभार मानले.जेएनपीटी विश्वस्त भूषण पाटील यांनी खऱ्या अर्थाने यात मेहनत घेतली आणि त्यांच्या प्रयत्नांमुळेच निशांत घरत यांनी उपोषण मागे घेतले असल्याचे समजते.
जेएनपीटी चेअरमन , डेप्युटी चेअरमन उन्मेष वाघ, मुख्य प्रबंधक जयवंत ढवळे, प्रशासकीय अधिकारी संजीव पगारे, जी बी मोरे, तहसीलदार भाऊसाहेब अंधारे यांनी सहकार्य केल्याने योग्य तो मार्ग काढण्यात यश आले.सर्व पक्षाचे राजकीय पुढारी, कार्यकर्ते, सामाजिक संस्था, सामाजिक कार्यकर्ते यांनी दिलेल्या पाठिंब्यामुळे निशांतचे मनोधैर्य उंचावलेले राहिले.त्या सर्वांचेही निशांत घरत यांनी मनापासून आभार मानले आहे. तसेच सर्वात महत्त्वाचे म्हणजे सर्व पत्रकार बंधूंनी जो मीडिया कव्हरेज देऊन उपोषण जनतेपर्यंत पोहोचवले त्यामुळेच खऱ्या अर्थाने उपोषण यशस्वी होण्यास मदत झाली.असे सांगत ॲड निशांत घरत( उपोषणकर्ते)तथा माजी सरपंच नवीन शेवा यांनी सर्व पत्रकार बांधवांचे आभार मानले आहे.प्रमोद रामनाथ ठाकूर ( मुख्य तक्रारदार) यांनीही सर्वांचे आभार मानले.








Be First to Comment