सिटी बेल | उरण | विठ्ठल ममताबादे |
उरण तालुक्यातील द्रोणागिरी नोड हा परिसर अत्यंत महत्वाचा असून या परिसरात कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावे यासाठी द्रोणागिरी नोड मध्ये पोलीस चौकीची अत्यंत गरज असून द्रोणागिरी नोड मध्ये पोलीस चौकी उभारण्यात यावे अशी मागणी द्रोणागिरी नोड व्यापारी वेलफेअर असोसिएशनचे अध्यक्ष रवींद्र पाटील यांनी केली आहे.
उरण तालुक्यात अनेक ठिकाणी विविध विकासकामे सुरु आहेत. “द्रोणागिरी नोड” हा परिसर वेगाने विकसित होणारा परिसर आहे. अनेक मोठ मोठी इमारतीचे, टॉवरचे काम येथे चालू आहेत. विविध कामानिमित्त येथे परप्रांतीय व्यक्तीचा येणे जाणे मोठ्या प्रमाणात सुरु आहे.परप्रांतीय नागरिकांचीही वस्ती मोठ्या प्रमाणात आहे. विकसित परिसर असल्याने अनेक मोठे मोठे दुकाने येथे आहेत. त्यामुळे चोरांची येथे नजर वळल्याने अनेक चोरांनी अनेकदा दुकानांची शटर तोडून सामानांची चोरी केली आहे.या परिसरात गुन्हेगारी प्रवृत्ती वाढत चालली असून लहान मोठे अनेक वाईट घटना, गुन्हे या परिसरात होत आहेत.
त्यामुळे द्रोणागिरी नोड भागातील शांतता व सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. वाईट प्रवृत्ती, वाईट घटना यांचा वेळीच बिमोड होणे आवश्यक आहे. त्यामुळे द्रोणागिरी परिसरात पोलीस चौकीची आवश्यकता असून या परिसरात पोलीस चौकी झाल्यास खून, चोरी, दरोडे, महिलांना छेडणे, भांडणे, मर्डर आदी घटनांना आळा बसेल. द्रोणागिरी नोड मध्ये पोलीस चौकी झाल्यास दुकानदार व नागरिकांमध्ये असलेले भीतीचे वातावरण कमी होईल.असे द्रोणागिरी नोड व्यापारी वेलफेअर असोसिएशनचे रविंद्र पाटील यांनी निवेदनात (मागणी अर्जा )मध्ये नमूद केले आहे.यासाठी द्रोणागिरी नोड व्यापारी वेलफेअर असोसिएशनचे अध्यक्ष रविंद्र पाटील यांनी पोलीस आयुक्त नवी मुंबई, सहाय्यक पोलीस आयुक्त न्हावा शेवा, वरिष्ठ पोलीस निरीक्षक उरण पोलीस ठाणे यांच्याकडे द्रोणागिरी परिसरात पोलीस चौकीची मागणी पत्रव्यवहाराद्वारे केली आहे.
Be First to Comment