गोवे गावाला पाण्याचा वेढा : पालकमंत्री आदिती तटकरे यांच्याकडून पाहणी
सिटी बेल | गोवे-कोलाड | विश्वास निकम |
गेले दोन दिवस पडत असलेल्या तुफान पावसाच्या फटकेबाजीमुळे रोहा तालुक्यातील कोलाड परिसरातून जाणाऱ्या सर्वच नद्या ह्या दुथडी भरून वाहू लागल्या आहेत. या सर्व नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली असून या परिसरातुन जाणारी माहीसदरा नदिनी धोक्याची पातळी ओलांडली आहे.
यामुळे गोवे गावाला पाण्याचा वेढा घातला असुन या परिस्थितीची माहिती मिळताच रायगडच्या पालकमंत्री आदिती तटकरे यांनी त्वरित उपस्थित राहून पाहणी केली. त्यांनी नुकसानग्रस्त शेतकरी वर्गाची भातशेतीची पाहणी करुन पंचनामे करावे अशा सूचना शासनाला दिल्या आहेत.
यावेळी ग्रामपंचायत सरपंच महेंद्र पोटफोडे, उपसरपंच नितीन जाधव,पाटबंधारे खात्याचे अधिकारी,अशोक लोहार, उभारे, गायकवाड, तलाठी नंदकुमार हिंदोळे ग्रामपंचायत सदस्य नरेंद्र पवार,सुप्रिया जाधव, नरेंद्र जाधव, ग्रामसेवक गोविंद शिद पोलिस पाटील सुरेश जाधव, राजेश शिर्के, मनोहर मांजरे, भरत जाधव, किसन ठाणेकर, मधुकर गायकवाड, गोविंद गायकवाड व गोवे ग्रामस्थ उपस्थित होते.
गोवे गावाजवळून जाणाऱ्या महिसदरा नदीला अनेक वर्षापासुन खांडी पडलेल्या होत्या. परंतु या वर्षी कोलाड पाटबंधारे खात्याने खांडी भरल्या परंतु त्या मातीने भरल्यामुळे परत त्या खांडी पुराच्या पाण्यामुळे मोठया प्रमाणात गेल्या असल्यामुळे या खांडीमुळे भातशेतीचे मोठे नुकसान झाले. शिवाय संपूर्ण गोवे गावाला पाण्याने वेढलेले असुन गावातील रस्त्यावर पाणीच पाणी झाले असुन रस्ता बंद झाला.यामुळे शासनाकडून नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
अनेक वेळा कोलाड पाटबंधारे विभागाकडे खांडी बांधण्यासाठी ग्रामस्थांनी अर्ज केला तसेच गोवे ग्रामपंचायत सरपंच महेंद्र पोटफोडे, उपसरपंच नितीन जाधव व सर्व सदस्य यांनी ग्रामपंचायती तर्फे पाटबंधारे विभागाला अर्ज केल्या नंतर यावर्षी नदीच्या खांडी भरल्या परंतु त्या निस्कुष्ट दर्जाच्या भरल्यामुळे त्या टिकाव धरू शकल्या नाही.यामुळे भातशेतीची लावणी चांगल्या प्रकारे करुनही या भातशेतीचे प्रचंड प्रमाणात नुकसान झाले आहे.
शिवाय पाण्याच्या बाजूला असणारी कच्ची घरे यांना ही धोका निर्माण झाला आहे. नदीच्या दोन्ही बाजूने महिसदरा नदी पुलापासून ते मूठवली धरण या ५किलोमीटरच्या अंतरावर संरक्षण भिंत व भराव बांधणे आवश्यक आहे.परंतु हे काम न केल्याने या नदीला जागजागी दरवर्षी खांडी जात असुन यामुळे या खांडीमुळे पुराचे पाणी शेतीत घुसून शेकडो हेक्टर शेती पाण्याखाली जाऊन भातशेतीचे नुकसान होत आहे.
Be First to Comment