सिटी बेल | खांब-रोहे | नंदकुमार मरवडे |
मागील पंधरा दिवसापासून दडी मारलेल्या पावसाने अखेर पुन्हा धो धो बरसायला सुरूवात करून दमदार स्वरूपात बरसायला लागल्याने शेतकरी वर्ग समाधानी झालेला दिसत आहे.
मागील पंधरा दिवसांत तुरळक स्वरूपात बरसाणा-या पावसाने गेल्या चार दिवसांपासून चांगली सुरुवात करून दमदार स्वरूपात बरसत असल्याने शेतकरी वर्ग सुखावला असून त्याने आपल्या खोळंबलेल्या लावणीच्या कामास प्रारंभ केला असल्याचे दिसून येत आहे. पावसाअभावी भातशेतीचे क्षेत्रात पाणीच नसल्याने भात लावणीची कामे खोळंबली होती.त्यातच भात लागवड करताना शेती क्षेत्रात चांगले चिखळ होणे आवश्यक असते. परंतु पाऊस थांबला असल्याने लावणी व चिखळणीची कामे थांबली होती.
सद्यस्थितीत पावसाने दमदार सुरुवात केल्याने भात लावणीचे कामांनीही चांगला वेग घेतला असल्याचे दिसून येत आहे.पावसाच्या भरवश्यावर भातशेतीची स्थिती अवलंबून असल्याने कधी अतिव्रुष्टी तर कधी सुका दुष्काळ या ससेमिरित शेतकरी वर्ग कायमच सापडला आहे. त्यातच दिवसेदिवस वाढत जाणारी महागाई यामुळेही शेती करणे परवडत नसल्याने केवल आपल्या हक्काची भाकरी व रोजंदारीचे साधन म्हणून बरेच शेतकरी शेती करणे परवडत नसतानाही शेती करताना दिसत आहेत.
Be First to Comment