लोकनेते दि. बा. पाटील यांच्या नावाला मान्यता मिळविण्यासाठी सर्वांनी एकसंघ होऊ या : लोकनेते रामशेठ ठाकूर
सिटी बेल । उरण । घन:श्याम कडू ।
प्रकल्पग्रस्तांच्या न्याय्य हक्कांसाठी आपले सारे आयुष्य प्राणपणाने लढणारे दिवंगत नेते दि. बा. पाटील यांचे नाव नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला द्यावे या मागणीसाठी सर्व राजकीय पक्षांनी आपले राजकीय मतभेद बाजूला ठेवून एकजुटीने लढा देण्याची गरज आहे, असे सांगून आपला आवाज मुंबई, महाराष्ट्रासह दिल्लीपर्यंत पोहचवून ‘दिबां’च्या नावाला मान्यता मिळविण्यासाठी सर्वांनी एकसंघ होऊ, असे आवाहन लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी नमूद केले.
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला प्रकल्पग्रस्तांचे झुंझार नेते दि. बा. पाटील यांचे नाव द्यावे, या मागणीसाठी उरण द्रोणागिरी नोड येथील भागूबाई चांगू ठाकूर विद्यालयातील सभागृहात सर्वपक्षीय कृती समितीची बैठक झाली. या लढ्यासाठी उरण तालुक्यात सर्वपक्षीय कमिटी स्थापन करण्याचे ठरले.

विमानतळाला ‘दिबा. पाटील यांचे नाव देण्यासाठी १० जून रोजी मानवी साखळी आणि २४ जून रोजी सिडको भवनाला घेराव घालण्यात येणार आहे. या व्यापक लढ्यासाठी सर्वांनी जोमाने कामाला लागण्याचे आवाहनही लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी केले. लोकनेते दि. बा. पाटील यांचे नाव नवी मुंबई विमानतळाला दिलेच पाहिजे अशी भूमिका येथील प्रकल्पग्रस्त व नेतेमंडळींनी घेतली आहे. यासाठी लोकनेते दि. बा. पाटील नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ सर्वपक्षीय कृती समितीची स्थापना करण्यात आली आहे.
१० व २४ जून रोजी होणार्या आंदोलनासाठी गावोगावी व पंचायत समिती गणनिहाय बैठकांचे आयोजन करा. त्याठिकाणी मार्गदर्शन करण्यासाठी आम्ही उपस्थित राहणार असल्याचे मान्यवरांनी सांगितले.
या समितीची बैठक द्रोणागिरी नोड येथे संपन्न झाली. या बैठकीस समितीचे अध्यक्ष दशरथ पाटील, आमदार महेश बालदी, काँग्रेसचे संतोष केणे, जेएनपीटी ट्रस्टी भूषण पाटील, मनसेचे अतुल भगत, शेकापचे नरेश घरत, राष्ट्रवादीचे वैजनाथ ठाकूर, जे. डी. तांडेल, नगराध्यक्षा सायली म्हात्रे, सीमा घरत, रेखा घरत, रवी भोईर, सुरेश पाटील, सुधीर घरत, चंद्रकांत घरत, महेश कडू, पंडित घरत, मेघनाथ म्हात्रे, संजय ठाकूर आदींसह अनेक पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते.








Be First to Comment