कोरोना संक्रमण काळात हृदयविकार रुग्णांनी विशेष काळजी घेण्याचे वैद्यकीय क्षेत्रातून आवाहन सामाजिक
सिटी बेल । मुंबई । आरोग्य प्रतिनिधी ।
गेल्या दोन दिवसात सामाजिक, राजकीय तसेच पत्रकारिता क्षेत्रातील दिग्गज मंडळी कोरोनाच्या संक्रमणामुळे निधन झाले असून यामध्ये अनेकांच्या मृत्यूचे कारण हृदयविकार आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत संसर्ग झालेल्या एकूण रुग्णांपैकी ५० टक्के रुग्णांच्या हृदयाला इजा झाल्याचं आढळून आलंय. भारतात कोरोनातून बरे झाल्यानंतर काही दिवसांनी हार्टअटॅक म्हणजे हृदयविकाराचा झटका येऊन मृत्यू झालेल्यांची संख्या लक्षणीय आहे.
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा फटका सर्वात जास्त भारताला बसत आहे. संसर्ग क्षमता जास्त असलेल्या डबल म्युटेशनमुळे रुग्णसंख्या प्रचंड वाढली. याविषयी अधिक माहिती देताना शुश्रूषा हार्ट केयर सेन्टर व मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटलचे संचालक व हृदय शल्यविशारद डॉ. संजय तारळेकर म्हणाले, ” ज्या रुग्णांना आधीच ह्रदयासंबंधीत किंवा पचनक्रियेसंंबंधीत आजार आहेत अशा लोकांना कोरोनाचा सर्वाधिक धोका असतो. सार्स -कोव्हीड २ व्हायरसमुळे कोरोनाबाधित झालेल्या रुग्णांचा ह्रदयातील स्नायूंमध्ये सूज येते.कोव्हिड संसर्गात शरीरावर मोठा ताण पडतो. हे देखील हार्ट अटॅक येण्याचं एक कारण आहे.कोविड संसर्गात हृदयात निर्माण होणारी गुंतागुंत मृत्यूचं एक प्रमुख कारण आहे. ३० ते ५० टक्के लोकांच्या मृत्यूचं कारण हेच आहे.
हार्वर्ड हेल्थ पब्लिकेशनच्या म्हणण्यानुसार, कोरोनाचा गंभीर लक्षणांनंतर रुग्णालयात दाखल झालेल्या कोरोना रूग्णांपैकी जवळपास एक चतुर्थांश रुग्णांना हृदयविकाराचा त्रास असल्याचे दिसून आले. यापैकी जवळपास एक तृतीयांश लोकांना हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी आजार असल्याचे समोर आले. कोरोनाबाधित रुग्णांमध्ये असामान्य हृदय गती, हृदयाचे ठोके वाढणे, छातीत दुखणे आणि थकवा यासारखे लक्षणे वारंवार दिसतात. अनेक वर्षांपासून हृदयाचा त्रास असणाऱ्या व्यक्तींची रोगप्रतिकारशक्ती खूपच कमी झालेली असते. अशा स्थितीत फ्लू किंवा कोरोना व्हायरसची लागण झाल्यास या विषाणूशी लढा देण्यास रूग्णाचे शरीर कमजोर ठरत असल्याचे समोर आले आहे. हृदयरोग असलेल्यांनी महामारीच्या काळात जास्त काळजी घेतली पाहिजे.
तज्ञांच्या मार्गदर्शनाखाली उपचार सुरू ठेवले पाहिजेत. लॉंग कोव्हिड चा त्रास महिन्यांनंतरही होत असेल. तर, वेळीच डॉक्टरांकडे जाऊन तपासणी करून घ्यावी.हृदयरोग आणि कोरोना असलेल्या रुग्णांवर पहिल्या १५ दिवसात योग्य उपचार केले पाहिजेत अनेकवेळा अशा रुग्णांवर दुर्लक्ष झाल्यामुळे आपत्कालिन स्थिती निर्माण होते.” कोरोना विषाणू एकाचवेळी शरीरातील विविध अवयवांवर परिणाम करत आहे. त्यामुळे कोरोनातून बरे होण्यासाठी रुग्णास बराच वेळ लागत आहे.
हा विषाणू केवळ फुफ्फुसांवरच नव्हे तर हृदय आणि मेंदूवर परिणाम करतो. यामुळे आरोग्यावर दीर्घकाळ परिणाम होतो. श्वास घेण्यास त्रास होणे, खूप थकवा येणं, हृदयाचे ठोके अनियमित किंवा खूप जास्त जोरात होणं तसेच अचानक खूप वजन कमी होणे अशी लक्षणे दिसताच डॉक्टरांचा सल्ला घेणे गरजेचे आहे. कोव्हिडमुक्त झालेल्या हृदयरोग रुग्णांनी घरी गेल्यानंतरही काळजी घेणं महत्त्वाचं आहे.
कोरोनामुक्त रुग्णांना पुन्हा संसर्ग होण्याची शक्यता नाकारता येत नाही. अशी प्रकरणं समोर आली आहेत. त्यामुळे बरे झालेल्यांनी शक्यतो घराबाहेर पडणं टाळावं, असा सल्ला डॉ. संजय तारळेकर यांनी दिला.








Be First to Comment