सिटी बेल लाइव्ह । उरण । घन:श्याम कडू ।
कोरोनाच्या महामारी संकटात उरणमध्ये १०८ रुग्णवाहिकेची सेवा रुग्णांना मिळत नसल्याचे वृत्त प्रसिद्ध झाले होते. या वृत्ताची दखल जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी घेऊन बी. व्ही. जी. कंपनीला जिल्ह्यातील (१०८) रुग्णवाहिका सेवा तात्काळ सुस्थितीत करण्याचे आदेश दिले आहेत.
राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढला आहे. त्यामुळे रुग्णांना इतर ठिकाणी ने आण करण्यासाठी बिव्हीजी १०८ रुग्णवाहिकेची सेवा उपलब्ध करून दिली आहे. परंतु काही दिवसांपूर्वी उरणमधील रुग्णाला पनवेलला नेण्यासाठी १०८ रुग्णवाहिकेची सेवा मिळत नव्हती.
त्यावेळी चौकशी केली असता सदर १०८ रुग्णवाहिका नादुरुस्त असल्याचे उत्तर मिळाले. मात्र याबाबत बिव्हीजी कंपनीने पर्यायी व्यवस्था करणे आवश्यक असताना ती केली नाही. यामुळे रुग्णाचा जीव गेला तर जबाबदारी कोण घेणार असा सवाल उपस्थित होत होता. याचे वृत्त आमच्या प्रतिनिधींनी प्रसिद्ध करताच जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी या वृत्ताची त्वरित दखल घेतली.
कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता रुग्णांची गैरसोय होऊ नये म्हणून जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी बिव्हीजी कंपनीला जिल्ह्यातील सर्व १०८ रुग्णवाहिका तात्काळ सुस्थितीत करून कार्यरत ठेवण्याचे आदेश दिले आहेत.








Be First to Comment