हृदयविकार टाळण्यासाठी व्हॅलेंटाईन दिवशी झाडे लावण्याचा डॉक्टरांचा सल्ला
सिटी बेल लाइव्ह । आरोग्य प्रतिनिधी ।
गेल्या पाच वर्षात नवी मुंबई, पनवेल, रायगड, ठाणे,वसई विरार ते पालघर जिल्ह्यात कमालीची लोकसंख्या वाढली आहे. वाढत्या शहरीकरणामुळे वायू प्रदूषणामध्ये सुद्धा वाढ झाली असून याचा दुष्परिणाम थेट हृदयावर होत असल्याचे निरीक्षण नवी मुंबईतील नेरुळ येथील शुश्रृषा हार्ट केयर व मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटलतर्फे नोंदविण्यात आले आहे.
गेल्या दोन महिन्यामध्ये अनलॉकची प्रक्रिया सुरु झाल्यानंतर मुंबई, नवी मुंबई ठाणे ही शहरे सर्वाधिक प्रदूषित असल्याचे मथळे छापून येत आहेत याच जाणिवेतून येत्या व्हॅलेंटाईन दिनी झाडे लावण्याचा सल्ला वैद्यकीय क्षेत्रातून दिला जात आहे. व्हॅलेंटाईन दिन व हृदय यांचे दृढ नाते आहे परंतु वाढत्या वायू प्रदूषणामुळे नागरिकांचे हृदयच कमजोर पडत असल्याचे समोर येत आहे त्यामुळे हे वायू प्रदूषण कमी करण्यासाठी व्हॅलेंटाईन दिनी प्रत्येकाने एक तरी झाड लावण्याची विनंती नेरुळ येथील शुश्रृषा हार्ट केयरतर्फे करण्यात आली आहे. व्हॅलेंटाईन दिनाचे औचित्य साधून आमच्याकडे येणाऱ्या रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांना आम्ही झाडे लावण्यासाठी प्रोत्साहित करणार आहोत.
याविषयी अधिक माहिती देताना शुश्रूषा हार्ट केयर सेन्टर व मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटलचे संचालक व हृदयशल्यविशारद डॉ. संजय तारळेकर म्हणाले, ” भारतीय भूपृष्ठावरील एरोसोल मधील पी एम२.५ चे प्रमाण मोजले असता देशातील वेगवेगळ्या भागातील शहरी आणि ग्रामीण क्षेत्रात वायू प्रदूषणाच्या पातळीत त्यांना फारसा फरक दिसत नाही. पी एम२.५ च्या संपर्कात आल्यामुळे होणाऱ्या हृदय आणि फुफ्फुसांच्या आजारामुळे भारतामध्ये दरवर्षी १० लाख लोकांना लवकर म्हणजेच वयाच्या तिशीमध्ये अथवा चाळीशी मध्ये मृत्यूचा सामना करावा लागतो वायू प्रदूषणाचा एरोसोलचा संबंध असतो: यामध्ये पाण्याचे दूषित थेंब, धुळीचे लहान कण, ब्लॅक कार्बनचे सूक्ष्म कण, वायू प्रदूषण करणारे वायू इत्यादींचा समावेश असतो.
एरोसोल हे नैसर्गिक तसेच मानवनिर्मित असतात. धुके, स्टिम,धूळ ही नैसर्गिक एरोसोलची उदाहरणे आहेत. मानवी आरोग्यास हानी पोहचवण्याची क्षमता असलेल्या लहान-लहान कणांमध्ये एरोसोलचा समावेश असतो. दरवर्षी मानवनिर्मित एरोसोलचा भारतातील अनेक शहरांच्या वायू प्रदूषणात समावेश असतो. वाहने, उद्योगधंदे, कारखाने यातून बाहेर पडणारा धूर, तसेच शेतात पेंढा जाळण्यामुळे होणाऱ्या धुरामुळे मानवनिर्मित एरोसोल तयार होत असल्यामुळे येत्या काळात हृदयविकार वाढीस लागणार आहेत. आपण वायू प्रदूषणावर एका दिवसात मात करू शकत नाही परंतु ते कमी करण्यासाठी नक्कीच प्रयत्न करू शकतो व यातील पहिला प्रयत्न हा झाडे लावणे हा आहे, आपल्या घराच्या आजूबाजूला असलेल्या मोकळ्या जागेवर जर झाडे लावली तर त्यातून निर्मण होणारा ऑक्सिजन हा आपल्याला एक वरदानच ठरेल कारण भारतातील जी दहा शहरे प्रदूषणाच्या खाईत आहेत, त्यातील पाच शहरे महाराष्ट्रातील आहेत. “हवा प्रदूषणाने माणसाच्या श्वसन संस्थेला पहिला फटका बसतो त्यामुळे विविध प्रकारचे हृदयरोग जडण्यासाठी श्वसनातून शरीरात घुसणारी अस्वच्छ हवा कारणीभूत ठरते.
वाहतूक प्रदूषणातून बाहेर पडणारी अल्ट्राफिनसारखी प्रदूषके रक्तवाहिन्यातील रक्त प्रवाहात अडथळा आणतात व त्यामुळेहृदयविकाराचा झटका येतो. शहरात हवेचे प्रदूषण भरमसाठ होत असते व तिथे वास्तव्य करणारे नागरिक हमखास उच्च रक्तदाबाचे बळी ठरत असून हृद्यविकाराचे रुग्ण वाढत असल्याची माहिती हृदयशल्यविशारद डॉ संजय तारळेकर यांनी दिली.








Be First to Comment