Press "Enter" to skip to content

जागतिक मधुमेह दिन -१४ नोव्हेंबर २०२०

कोरोना महामारीमुळे मधुमेहाचे गांभीर्य अधोरेखित होण्यास मदत झाल्याचे वैद्यकीय निरीक्षण 🔶🔶🔶

कोरोना संक्रमणात मधुमेह रुग्णांचा जीव वाचविणे हीच भारताची पहिली प्राथमिकता हवी  🔷🔷🔷


सिटी बेल लाइव्ह । आरोग्य प्रतिनिधी । 🔶🔶🔶

सध्या जगभरात कोरोना विषाणूच्या साथीने थैमान घातले आहे. या साथीत जगभरात आतापर्यंत १३ लाखाहून अधिक मृत्यू झाले आहेत. या साथीपुढे जगातील बलशाली सत्ता देखील हतबल झालेल्या दिसत आहेत. अगदी सूक्ष्म स्वरूपातील या विषाणूने परिस्थिती चिंताजनक केली आहे. या साथीच्या वाढत्या प्रसारामुळे जगभरातील मानवी समूहाला ‘जिवंत राहणे’ हीच आपली प्राथमिकता आहे  कोरोना आटोक्यात आला असला तरीही दुसरी लाट येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

भारतामध्ये सुद्धा या कोरोना महामारीने खूपच नुकसान झाले असून महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त मृत्यू कोरोनामुळे झाले आहेत परंतु आता कोरोनाची लाट ओसरत चालली आहे व आपण परत एकदा मिशन बिगिन अगेन करून आपल्या रोजच्या कामात गुंतलो असलो तरी कोरोनाची लस आल्याशिवाय यातून सुटका नाही याची आपल्या सर्वाना कल्पना आहेच अशा परिस्थितीत १४ नोव्हेंबर रोजी साजरा होणाऱ्या  जागतिक मधुमेह दिनाला अधिक महत्व आहे कारण कोरोनाग्रस्तांच्या मृत्यूमागे सर्वात महत्त्वाचं कारण ठरलंय ते को-मॉर्बिडिटी.

सामान्यांच्या शब्दात सांगायचं झालं तर, को-मॉर्बिडिटी म्हणजे ज्या व्यक्तीला मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयरोग आणि किडनी विकार यासारखे आजार आहेत. या आजारांनी ग्रस्त रुग्णांना कोरोना विषाणूचा संसर्ग झाला, तर मृत्यूचं प्रमाण जास्त आहे. तज्ज्ञांच्या मते, शरीरातील साखरेच्या प्रमाणावर नसलेल्या नियंत्रणामुळे गुंतागुंत होण्याची शक्यता जास्त असते. याविषयी अधिक माहिती देताना  तेरणा स्पेशालिटी हॉस्पिटल व रिसर्च सेन्टरचे मधुमेहतज्ञ डॉ. विनोद मेथील सांगतात, ” ही गोष्ट तर  आता सर्वानाच  माहित झाली आहे की कमी रोगप्रतिकारक शक्ती असणाऱ्या व्यक्तींना करोना विषाणू हा लगेच विळखा घालतो.

मधुमेहाची समस्या असलेल्या रुग्णांची रोगप्रतिकारक शक्ती कमी असते. त्यामुळेच कोरोना  विषाणू त्यांना सहज लक्ष्य करतो. म्हणून जर एखाद्या मधुमेहग्रस्ताला कोरोना विषाणूने जखडले तर त्याचे शरीर करोना विषाणूशी लढू शकत नाही आणि विषाणू अधिक वेगाने संपूर्ण शरीरात पसरतो. त्यामुळे हेच दुसरे एक कारण आहे की कोरोना  विषाणू हा मधुमेहाच्या रूग्णांवर सर्वाधिक प्रभाव टाकतो. कोरोना व्हायरस हिमोग्लोबिनवर हल्ला करून शरीरातील  ऑक्सिजन वाहून नेणाऱ्या प्रक्रियेला आळा घालतो त्यामुळे शरीरातील महत्त्वाच्या अवयवांना रक्त पुरवठा न झाल्यामुळे रुग्ण मल्टीऑर्गन फेल्युयरच्या स्थितीत जातो. यासाठी डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार आहार तसेच औषधे घेतली पाहिजे आजही अनेक मधुमेही रुग्ण काही काळानंतर औषधे थांबवतात व अशाच रुग्णांना कोरोनाचा अधिक धोका असतो.

कोरोनाची लस कधी येईल हे आपल्याला माहीत नाही आहे म्हणुनच मधुमेह असलेल्या रुग्णांनी गाफील राहून चालणार नाही. कोरोना महामारीत आपल्याला मधुमेह या आजाराचे गांभीर्य समजले आहे व या महामारीतून आपण सर्वानी मधुमेह या आजाराशी लढले पाहिजे. आज मुंबईसारख्या शहरात मधुमेह हा आजार संसर्गासारखा वाढत असल्यामुळे  डॉक्टरांनी सांगितलेल्या सर्व नियमांचे काटेकोरपणे पालन करावे आणि योग्य औषधांचे सेवन करावे. जितकी सुरक्षा या काळात मधुमेह रुग्ण घेतील तितका त्यांचा जीव वाचण्याची शक्यता वाढेल.”मधुमेहाचे देशातील वाढते प्रमाण निश्चितच चिंताजनक आहे.

शहरी भागांतील श्रीमंत व्यक्तींचा मानला जाणारा हा आजार ग्रामीण भागांतही पोहोचत आहे व त्यासाठी जीवनशैली, आहार, व्यायामाचा अभाव हे घटक कारणीभूत आहेत. मधुमेह झाल्यानंतर मूत्रपिंड, डोळे आणि पाय निकामी होण्याचे प्रमाण सर्वाधिक असते. मात्र जीवनशैलीतील बदलांमुळे निर्माण होणाऱ्या मधुमेहावर औषधोपचार, डायलिसिस केंद्रांची निर्मिती, प्रत्यारोपण या सगळ्याच पातळ्यांवर संपूर्ण भारतभर  भरीव काम सुरू आहे. मात्र मधुमेह होऊ नये यासाठी जीवनशैली कशी बदलावी, यासंदर्भातील मार्गदर्शनाची तरुणांना फार गरज आहे असे मत तेरणा स्पेशालिटी हॉस्पिटल व रिसर्च सेन्टरचे मधुमेहतज्ञ डॉ. विनोद मेथील यांनी व्यक्त केले.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.