कधी कळ्यांनी कधी फुलांनी
कधी फळांच्या लगडण्यानी
झुकलो अनिच्छा वा इच्छेनी
गळता बहर ताठ पुनः होवोनी
कुणी तोडताना फळे फुले
हवे तसे मजला वाकविले
तुटता डहाळी वेदनेने घेरले
पानांवर ओरखडे ही उठले
खग घरटी पिले किलबिलती
पंख फुटता दूर उडून जाती
नवे घरटे पुन्हा नवा सांगाती
सुरुच राहते ही जगरहाटी
कुऱ्हाडीचे घाव मनाची ही हाव
सोसवेना अंतरीच्या कळांचा ठाव
किती आणि कसा वाकू कुठवरी
माझीच सावली न मम ऊन सावरी
नको बहर नको घरटी आता
थकलो वाकूनी देवा धाव आता
सळसळू दे ताठ मानेने जीवनी
ओझे झटकून मोकळ्या श्र्वासांनी
भाग्यश्री गर्दे. ग्रेटर नाॅयडा.(दिल्ली)






Be First to Comment