Press "Enter" to skip to content

शेतकऱ्यांची क्रयशक्ती वाढण्यासाठी पशुसंवर्धन आवश्यक : डॉ.रवींद्र मर्दाने


सिटी बेल लाइव्ह । कर्जत । संजय गायकवाड । 🔶🔷🔶


शेतकऱ्यांची क्रयशक्ती वाढण्यासाठी पशुसंवर्धन व्यवसाय आवश्यक असून त्यासाठी पशू प्रजनन, त्यांचे संगोपन, पोषण आणि रोगराईपासून संरक्षण या चार बाबींचे व्यवस्थापन शास्त्रीय दृष्टिकोनातून व्हायला हवे, असे प्रतिपादन प्रादेशिक कृषी संशोधन केंद्र, कर्जतचे विस्तार शिक्षण शास्त्रज्ञ डॉ. रवींद्र मर्दाने यांनी केले.

आदिवासी ठाकूर समाज सेवा मंडळ महाराष्ट्र राज्य, जिल्हा पशू संवर्धन कार्यालय, अलिबाग व पंचायत समिती कर्जत यांच्या संयुक्त विद्यमाने अनुसूचित जमातीच्या बेरोजगारांसाठी तीन दिवसीय पशुसंवर्धन व्यवसाय प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन पाथरज प्रभागातील मोरेवाडी येथे करण्यात आले होते.त्यावेळी अध्यक्षीय मार्गदर्शन करताना ते बोलत होते.

व्यासपीठावर प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. सुभाष म्हसके,पेणचे पशुधन विकास अधिकारी डॉ. विष्णू काळे, पंचायत समिती कर्जतचे पशुधन विकास अधिकारी (विस्तार) डॉ. किसन देशमुख, खांडसचे पशुधन विकास अधिकारी डॉ. राजेंद्र भोसले,वैजनाथचे पशुधन विकास अधिकारी डॉ. सागर कसबे,कशेळेचे पशुधन विकास अधिकारी डॉ. वासुदेव गायकवाड,आदिवासी ठाकूर समाज सेवा मंडळाचे प्रदेशाध्यक्ष मनोहर पादीर,उपसरपंच अतुल लोहकरे, मंडळाचे तालुकाध्यक्ष चाहू सराई,युवा अध्यक्ष प्रकाश बांगारे,उपाध्यक्ष पुंडलिक उघडा, पांडुरंग पुजारा,किसन ढोले प्रभृती उपस्थित होते.

डॉ. मर्दाने म्हणाले की, रोजगार व स्वयंरोजगाराच्या अनेक नव्या संधी या कार्यक्षेत्रात निर्माण झाल्याने आदिवासी बांधवांनी प्रामाणिकपणे या प्रशिक्षणाचा लाभ घेतल्यास त्यांचे जीवनमान उंचावेल.डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाने विकसित केलेल्या ‘ कोकण कन्याळ ‘ या शेळीच्या गुणवैशिष्ट्यांचे विवेचन करीत कोकण विभागासाठी ती जात कशी फायदेशीर आहे, हे त्यांनी पटवून दिले.स्व. केंद्रीय मंत्री रामविलास पासवान यांच्या जीवनकार्यावर प्रकाश टाकीत त्यांच्या बहुमूल्य योगदानाचा परिचय डॉ. मर्दाने यांनी सभागृहाला करून दिला.

डॉ. सुभाष म्हसके यांनी शासनाच्या विविध योजनांचा उहापोह केला व आजच्या काळात कुक्कुटपालन, शेळीपालन व दुग्धव्यवसायचे वाढलेले महत्व अधोरेखित करीत आत्मनिर्भर होण्यासाठी एकात्मिक पशू संवर्धनाची गरज प्रतिपादित केली.शासनाच्या योजना कार्यान्वित करण्यासाठी पशुसंवर्धन विभाग कटिबद्ध असून लाभार्थ्यांची प्रामाणिक साथ मिळणे, तितकेच महत्त्वाचे आहे, असे त्यांनी नमूद केले.

या प्रशिक्षण कार्यक्रमात डॉ. विष्णू काळे, डॉ. किसन देशमुख, डॉ. राजेंद्र भोसले,डॉ. किशोर सरगर ,डॉ. सागर कसबे, डॉ. सौ वैशाली पाटील यांनी १५० आदिवासी प्रशिक्षणार्थींना पशुसंवर्धनाशी निगडित विविध विषयांवर प्रशिक्षण दिले.

कार्यक्रमाच्या उद्घाटन सत्रात मान्यवरांनी थोर पुरुषांच्या प्रतिमांचे पूजन करून विनम्र अभिवादन केले व दीप प्रज्वलन केले.यावेळी मान्यवरांचा शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन मनोहर पादीर यांनी केले. यानिमित्ताने स्व. रामविलास पासवान यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.