कोरोनाच्या संकटात लहान मुलांचे मनोधैर्य वाढविण्यासाठी तेरणा स्पेशालिटी हॉस्पिटलचा पुढाकार 🔶🔷🔶🔷
सिटी बेल लाइव्ह / आरोग्य प्रतिनिधी 🔷🔶🔷🔶
मुंबई, नवी मुंबई, ठाणे -पालघर पनवेल रायगड येथे कोरोना ग्रस्तांचा आकडा वाढत असला तरी यातील अनेक जणांना सौम्य लक्षणे आढळून येत आहे ही फारच दिलासादायक बाब आहे. महानगर पालिकेच्या मदतीने अनेक खाजगी हॉस्पिटलमध्ये सौम्य लक्षणे असलेल्या रुग्णांना वैद्यकीय उपचार मिळत आहेत. नेरुळ, नवी मुंबई येथील तेरणा स्पेशालिटी हॉस्पिटल व रिसर्च सेन्टर इथे गेल्या तीन महिन्यापासून शेकडो कोरोनाग्रस्त रुग्णांवर यशस्वी उपचार झाले असून एका १३ वर्षाच्या मुलाचे मनोधैर्य वाढविण्यासाठी तेरणा स्पेशालिटी हॉस्पिटलने केलेल्या सहकार्याची चर्चा नवी मुंबईत होत आहे.
निरंजन कदम (वय १३ वर्षे ) व त्याचे आई वडिल ऑगस्ट महिन्यामध्ये कोरोना पॉजिटीव्ह झाले होते व तिघांनाही कोरोनाची सौम्य लक्षणे आढळून आले असल्यामुळे तेरणा स्पेशालिटी हॉस्पिटल व रिसर्च सेन्टरमध्ये भरती करण्यात आली. आठवी मध्ये असलेला निरंजन हा नवी मुंबईतील एका खाजगी शाळेमध्ये शिकत असून नेमकी त्याची परीक्षा ( ऑनलाईन ) याच वेळी आली होती व आपण हॉस्पिटलमध्ये भरती असल्यामुळे आपण ही परीक्षा देऊ शकणार नाही या कल्पनेने तो थोडासा नाराज होता त्याने ही खंत तेरणा हॉस्पिटलच्या डॉक्टरांकडे बोलून दाखवली.
लॉकडाउन काळामध्ये निरंजनने एकदाही ऑनलाईन शाळा चुकविली नव्हती, व त्यामुळे या परीक्षेत त्याला चांगले मार्क मिळतील याची खात्री होती , या संपूर्ण प्रकरणाची माहिती तेरणा स्पेशालिटी हॉस्पिटलच्या व्यवस्थापनाला कळविण्यात आली व निरंजनला ऑनलाईन परीक्षा देण्यासाठी तेरणा हॉस्पिटल सर्वतोपरी मदत करेल असे त्यांच्या पालकांना सांगण्यात आले.
नवी मुंबई महानगर पालिकेने आखून दिलेल्या सर्व नियमांचे पालन करून निरंजनसाठी वार्डमध्ये परीक्षेसाठी टेबल खुर्ची तसेच वायफाय इंटरनेट व लॅपटॉपची सुविधा देण्यात आली. निरंजननेसुद्धा कोरोना आजाराला न घाबरता सलग चार दिवस परीक्षा दिली व त्या परीक्षेत त्याला पूर्ण मार्क पडले.
कोरोना संक्रमणामुळे अनेकांना मानसिक तणाव येतो व चिडचीड होते परंतु १३ वर्षाच्या निरंजनने कोरोनाला न घाबरता हॉस्पिटलमध्ये राहून परीक्षा दिली ही घटना कोरोना काळात नक्कीच सकारात्मक आहे. निरंजन हा आता पूर्णपणे बरा होऊन आपल्या घरी गेला असून कोरोनाचे संकट संपल्यानंतर आम्ही त्यांचा खास सत्कार करणार असल्याची माहिती तेरणा स्पेशालिटी हॉस्पिटल व रिसर्च सेन्टरचे डेप्युटी जनरल मॅनेजर श्री संतोष साइल यांनी दिली.
पालकांना कोरोना संसर्ग झाला असेल तर त्यामुळे त्या कुटुंबातील लहान मुलांची अधिक काळजी घ्यायला हवी. कारण कुटुंबातील सदस्याला संशयित लक्षणांसाठी विलग करण्यात आले असेल तर त्यामुळे मुलांमध्ये अस्वस्थेची भावना वाढू शकते. मुलांमध्ये कोणत्याही प्रकारचा ताण वाढणार नाही यासाठी मुलांच्या कल्पकतेला चालना देण्यासाठी सर्वानींच प्रयत्न केले पाहिजे, असे निर्देश जागतिक आरोग्य संघटनेने दिले आहेत.






Be First to Comment