पर्यावरण संवर्धनासाठी पटकावला महाराष्ट्र शासनाचा “माझी वसुंधरा” अवॉर्ड
सिटी बेल ∆ मुंबई ∆
महाराष्ट्र राज्य शासनाच्या पर्यावरण व वातावरणीय बदल विभागाच्यावतीने महाराष्ट्रातील तमाम ग्रामपंचायतींसाठी माझी वसुंधरा २.0 अवॉर्ड २०२२ चे आयोजन करण्यात आले होते. कोकण विभागातील अत्युत्कृष्ट कामगिरीसाठी पनवेल तालुक्यातील गव्हाण ग्रामपंचायतीची निवड करण्यात आली आहे.
पंचतत्वाचे संवर्धन करून संरक्षण करून व जतन करून शाश्वत विकास साधल्या बद्दल गव्हाण ग्रामपंचायतीला पुरस्कृत करण्यात आले. महाराष्ट्र राज्य शासनाचा प्रतिष्ठेचा समजला जाणारा पुरस्कार पटकावल्याबद्दल गव्हाण ग्रामपंचायतीच्या शिरपेचात अजून एक मानाचा तुरा खोवला गेला आहे.
नुकत्याच मुंबई येथे झालेल्या शानदार कार्यक्रमात उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांच्या शुभहस्ते गव्हाण चे ग्रामविकास अधिकारी मोहन देविदास पाटील आणि सरपंच माई प्रकाश भोईर यांनी प्रशस्तिपत्रक स्वीकारले. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे अध्यक्षस्थानी उपस्थित होते तर महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, पर्यावरण व वातावरणीय बदल तथा पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे आदी प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते.
पर्यटन तथा पर्यावरण व वातावरण बदल विभागाचे मंत्री आदित्य ठाकरे आणि सदर विभागाच्या प्रधान सचिव मनीषा पाटणकर- म्हैसकर यांच्या स्वाक्षरीचे प्रमाणपत्र देऊन गव्हाण ग्रामपंचायतीचा गौरव करण्यात आला.







Be First to Comment