पनवेलमध्ये आमदार प्रशांत ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली नवाब मलिकांविरोधात भाजपचे आंदोलन
सिटी बेल • पनवेल • प्रतिनिधी •
नवाब मलिक यांना कोणत्याही राजकीय गुन्ह्यात अटक झालेली नाही तर मुंबई बाँम्ब स्फोटातील आरोपींशी त्यांनी जमिनीचा व्यवहार केला आहे. मलिक यांनी दिलेल्या पैशाचा वापर अंडरवर्ल्डने देशाविरुद्ध केला, अशा देशद्रोह्यांशी नवाब मलिक यांनी सौदा केलाच कसा, असा सवाल करत नवाब मलिक यांच्या राजीनाम्याची जोरदार मागणी आज पनवेलमध्ये करण्यात आली. यावेळी जोरदार घोषणा बाजी करत महाविकास आघाडीतील मंत्री घोटाळे करत सुटले आहेत, सत्तेच्या हव्यासापोटी त्यांना आणि आता नवाब मालिकांना पाठीशी घालण्याचे काम ठाकरे महाविकास आघाडी सरकार करत असल्याची घणाघाती टीका या आंदोलनातून करण्यात आली.
पनवेल तालुका व शहर भाजपच्या मध्यवर्ती कार्यालयासमोर भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या आंदोलनात कोकण म्हाडाचे माजी सभापती बाळासाहेब पाटील, युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष विक्रांत पाटील, उत्तर रत्नागिरी जिल्हा भाजपचे उपाध्यक्ष केदार साठे, तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत, शहराध्यक्ष जयंत पगडे, जिल्हा संघटन सरचिटणीस अविनाश कोळी, माजी नगराध्यक्ष संदीप पाटील, नगरसेवक नितीन पाटील, अजय बहिरा, संतोष भोईर, नगरसेविका दर्शना भोईर, हेमलता म्हात्रे, जिल्हा परिषद सदस्य अमित जाधव, पंचायत समिती सदस्य भूपेंद्र पाटील, राज पाटील, शशिकांत शेळके, युवा नेते दशरथ म्हात्रे, युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष मयुरेश नेतकर, तालुका अध्यक्ष आनंद ढवळे, शहराध्यक्ष रोहित जगताप, दिनेश खानावकर, सतीश पाटील, अभिषेक भोपी, वैद्यकीय सेलचे जिल्हा उपाध्यक्ष डॉ. कृष्णा देसाई, राम पाटील, अमरीश मोकल, केदार भगत, अनेश ढवळे, भीमराव पोवार, प्रसाद हनुमंते, यांच्यासह कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
यावेळी आमदार प्रशांत ठाकूर यांनी बोलताना सांगितले कि, राजकीय किंवा इतर गुन्ह्यांमुळे नाही तर देशद्रोह्यांकडून जमिन खरेदी केल्यामुळे ईडीने नवाब मलिक यांना अटक केली आहे. मात्र महाविकास आघाडी त्याचे समर्थन करून आंदोलन करीत आहे. विशेष म्हणजे भ्रष्टाचारी मंत्र्यांचा राजीनामा घेतला तर त्या खुर्चीत कोण बसणार याची चिंता महाविकास आघाडी सरकारला लागली आहे म्हणूनच मलिकांचा राजीनामा घेण्यास ठाकरे सरकारने असमर्थता दाखवली आहे. आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर, शाहू महाराज यांचा वारसा असलेला आपला राज्य आहे. मात्र आपल्या या राज्यात देशद्रोह्यांना मदत करणाऱ्यांना पाठीशी घालण्याचा निंदनीय प्रकार महविकास आघाडीकडून सुरु आहे. जमेल तेथे भ्रष्टाचार करा आणि त्यातून निवडणुक लढा हा सूत्र महाविकासाआघाडीकडून राबविला जात आहे.
मुर्दाबाद मुर्दाबाद नवाब मलिक मुर्दाबाद, धिक्कार असो धिक्कार असो महाविकास आघाडी सरकारचा धिक्कार असो, राजीनामा द्या राजीनामा द्या, देशद्रोह्यांची जमीन विकत घेणाऱ्या नवाब मलिकांचा आणि त्यांना पाठीशी घालणाऱ्या ठाकरे सरकारचा धिक्कार असो, अशा गगनभेदी घोषणा यावेळी उपस्थितांनी दिल्या.
राज्याला नाही तर देशाला लाजवेल असे कृत्य नवाब मलिक यांनी केले आहे. कवडी मोलाने जमीन खरेदी हा एवढा आरोप नाही तर देशद्रोह्यांकडून जमीन घेतली हा देशातील मोठा आणि गंभीर गुन्हा आहे. महाराष्ट्राच्या जनतेने नवाब मालिकांना प्रेम दिले मात्र त्याच जनतेच्या पाठीत खंजीर खुपसण्याचे काम नवाब मलिक यांनी केले आहे. नवाब मलिक निर्दोष नाहीत त्यांचे जावईसुद्धा ड्रग प्रकरणात अटकेत होते. शेतकरी, कष्टकरी, महिलांवर होणारे अत्याचार असे सारे प्रश्न असताना हे ठाकरे सरकार मात्र घोटाळे करत सुटले आहे. बाळासाहेब पाटील – माजी सभापती, कोकण म्हाडा.
नवाब मलिक हे वाचाळवीर आणि देशद्रोही मंत्री आहेत. महाराष्ट्राचे वाटोळे करणाऱ्या मंत्र्याला अटक झाली आहे. ते कुणाला न्याय देण्यासाठी किंवा माता भगिनींवर झालेल्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी अटक झाले नाही तर १९९३ साली झालेल्या मुंबई बॉम्ब स्फोट हल्ल्यातील देशद्रोहींकडून जमीन खरेदी केली म्हणून अटक झाले आहेत. काँगेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेनेने नौटंकी करत अन्याय झाला अशी वलग्ना केली पण ईडीने आपल्या म्होरक्याला अटक केली याची चिंता महाविकास आघाडी सरकारला लागली आहे. गोरगरिबांना ईडी त्रास देत नाही मात्र भंगारवाला तीन हजार कोटींची प्रॉपर्टी कशी करतो हे ईडीच्या निदर्शनास आले आहे. – विक्रांत पाटील, प्रदेशाध्यक्ष – युवा मोर्चा
गेल्या दोन वर्षात या सरकारमधील मंत्र्यांचे घोटाळे उघड होत आहे. या सरकारला सामान्य जनतेशी सोयर सुतक नाही. महाराष्ट्रात चांगल्या विचारांची परंपरा आहे मात्र देशद्रोह्यांकडून जमीन खरेदी करत महाराष्ट्राला डाग लावण्याचे काम ठाकरे सरकारमधील नवाब मलिक यांनी केला आहे आणि त्याचा निषेध करू तेवढा कमी आहे. महाविकास आघाडीमध्ये एकमेकांचे पटत नाही मात्र सत्तेच्या हव्यासापोटी रेटून नेण्याचे काम सुरु आहे. मुख्यमंत्र्यांना जनतेचे प्रश्न ऐकायला वेळ नाही. थोडी तरी शरम असेल तर नवाब मालिकांनी राजीनामा द्यावा. – जयंत पगडे, अध्यक्ष पनवेल शहर भाजप
महाराष्ट्राला मान खाली घालवणारे प्रकार नवाब मलिक यांनी केले आहे. त्यांची देशविघातक वृत्ती स्प्ष्टपणे समोर आली आहे. याकूब मेमन याची फाशी रद्द करावी अशी मागणी करणारे ते हेच नवाब मलिक आहेत. राजकीय फायद्यासाठी त्यांचा राजीनामा घेतला जात नाही. – मयुरेश नेतकर – युवा मोर्चा, रायगड जिल्हाध्यक्ष








Be First to Comment