Press "Enter" to skip to content

मुंबई व लगतच्या शहरांमध्ये अवकाळी पावसामुळे संसर्गजन्य आजारात होणार वाढ

हृदयविकार असलेल्या नागरिकांनी विशेष काळजी घेण्याचे डॉक्टरांचे आवाहन

सिटी बेल | आरोग्य प्रतिनिधी |

पावसाळा हा सर्वांचाच आवडीचा सीजन असला तरी अवकाळी पाऊस हा सर्वसामान्य नागरिकांना त्रास देणारा ठरत आहे. अवकाळी पावसामुळे तापमानात घट होत असल्याने सर्दी, खोकला, व्हायरल-तापन्यूमोनिया व अस्थमा यासारखे श्वसनाचे आजार पसरण्याची शक्यता आहे. या अवकाळी पावसामुळे पिण्याच्या पाण्यामध्ये गढूळपणा येतो व त्यामुळे कावीळ, डायरियासारखे रोग पसरण्याची शक्यता असते.

याविषयी अधिक माहिती देताना कल्याण येथील सिद्धिविनायक मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटलचे संचालक डॉ.अभय गायकवाड  म्हणाले ,” अवकाळी पावसामुळे तापमानात घट होते, सततच्या ढगाळ वातावरणामुळे वायू प्रदूषण हे खाली राहते व यामुळे अनेकांना श्वसनाचे आजार जडतात. अस्थमा रुग्णांसाठी हा सर्वात कठीण काळ आहे कारण पहाटे धुके पडत असल्याने कारखाने, गाड्या तसेच हॉटेल्स मधून निघणारा धूर हा जामिनापासून २०० फुटापर्यंत राहतो व हाच धूर धुके गेल्यानंतर वातावरणात मिसळतो, दुपारी नंतर  ढगाळ वातावरण असल्यामुळे नव्याने निर्माण होणारा धूर तिथेच फिरत राहतो व याचा त्रास श्वसनयंत्रणांवर होतो.

मॉर्नींग वॉकला जाणाऱ्या नागरिकांमध्ये श्वसन विकार वाढतात परंतु अनेक नागरिक याला वातावरण बदलाचा त्रास म्हणून दुर्लक्ष करतात व पुढे जाऊन श्वसन विकार वाढतात, अनेकांना याकाळात ऍलर्जीचा त्रास होतो, म्हणजेच श्वसनमार्गे प्रदूषित हवेतील दूषित स्पर्टिकल शरीरात जाऊन ते ऍलर्जीचे कारण ठरते. हिवाळा अजून सुरु झालेला नाही परंतु आधीच्या कडक ऊन तर कधी अवकाळी पाऊस मुंबई तसेच लगतच्या शहरातील नागरिकांचे आरोग्य बिघडवत आहे.”  आपले घर आणि परिसर स्वच्छ ठेवा, हात व्यवस्थित धुवा, तोंडाला, नाकाला वारंवार हात लावू नका, खोकताना आणि शिंकताना तोंड आणि नाकापुढे रूमाल किंवा हात धरा, अशा सूचना डॉ.अभय गायकवाड यांनी दिल्या आहेत.

हृदयविकार व अवकाळी पाऊस याविषयी सांगताना नेरुळ येथील शुश्रूषा हार्ट केयर व स्पेशालिटी हॉस्पिटलचे संचालक व हृदय शल्यविशारद डॉ. संजय तारळेकर म्हणाले, राज्यात आधीच कोविडने लोकांची घाबरगुंडी उडविली आहे. त्यात अवकाळी  पावसामुळे सर्दी, खोकला, ताप आणि घशात खवखवण्याचे प्रकार वाढले आहे. ही सर्व कोविडचीही लक्षणे असल्यामुळे मानसिक दडपण वाढत आहे. दमा, अस्थमा, किडनीचे विकार, लिव्हर, हदयविकार, फुप्फुसांचे आजार असणाऱ्या पेशंटनि जास्त काळजी घेणे गरजेचे आहे. ज्या नागरिकांना हृदयविकार असतात अथवा हृदयविकारावर शस्त्रक्रिया झालेल्या असतात त्यांना शुद्ध हवेची गरज असते , अशा दूषित वातावरणात गेल्यामुळे अशा रुग्णांना धाप लागणे, श्वास घेण्यास त्रास होणे, उच्च रक्तदाब असा त्रास होण्याची शक्यता असते म्ह्णूच अशा नागरिकांनी सध्या मॉर्निंग वॉक टाळावे, तसेच डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार आहार घेणे गरजेचे आहे कारण अशा कालावधीत पचनशक्ती कमी होते. घसादुखी, ताप, अंगदुखी, डोके दुखणे, उलटी ही लक्षणे आढळल्यास तातडीने डॉक्टरांकडे जाणे. हृदयविकार असणाऱ्या रुग्णांनी कोलेस्ट्रॉल, रक्तदाब आणि मधुमेह आटोक्यात ठेवण्याकरता औषधे घेत राहणे व तपासण्या करणे तितकेच गरजेचे आहे.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.