सिटी बेल | उरण | वैशाली कडू |
रायगड जिल्ह्यातील उरण तालुक्यातील आवरे गावचे सुपुत्र, एक उपक्रमशील शिक्षक व उरण सारडे येथे जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेवर कार्यरत असणारे नाविन्यपूर्ण शिक्षण देण्यात ज्यांना महारथ हाशील आहे असे अवलिया शिक्षक कौशिक ठाकूर यांनी शिक्षण क्षेत्रात केलेल्या अतुलनीय आणि उल्लेखनीय कामगिरी केली. त्याबद्दल रायगड जिल्हा परिषद ( प्राथमिक) च्या वतीनं आदर्श शिक्षक या पुरस्काराने मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले.
त्यांनी आपल्या शिक्षकी पेशाला न्याय देत नवंसंकल्पनेनं सतत १९ वर्षे विज्ञान प्रदर्शनात सहभाग नोंदवत सतत २ वर्ष राज्यस्तरीय नवोपक्रम स्पर्धेत, जिल्हा सर्वोत्तम पाच मध्ये येण्याचा मान मिळवत शैक्षणिक साहित्य निर्मिती मध्ये तालुक्यात तब्बल ६ वेळा प्रथम क्रमांक, ३ वेळा तालुक्यात द्वितीय क्रमांक, ३ वेळा तालुक्यात तृतीय क्रमांक पटकविणारी शाळा आणि शिक्षक ज्यांच्या स्वप्नातील रायगड जिल्ह्यातील पहिली डिजिटल शाळा म्हणून नावारूपाला येणारी पहिली शाळा, रायगड जिल्ह्यातील जिल्हा परिषद शाळेमध्ये परिसर अभ्यासातील विविध संकल्पना स्पष्ट करण्यासाठी पहिलं नाविन्यपूर्ण शैक्षणिक संग्रहालय सुरु करणारी नाविन्यपूर्ण शाळा, विद्यार्थ्यांच्यां पाठीवरचे ओझे कमी नाही तर नाहीसंच करणारी पहिली दप्तर मुक्त शाळा, तल्यावरची शाळा, स्मशानावरची शाळा, विज्ञानाची सांगड घालत विद्यार्थ्यांना आकाश गंगेचं दर्शन घडविण्यासाठी घेतलेली रात्रीची शाळा मुलांना शालेय शिक्षणासोबत व्यावहारिक ज्ञान मिळावं म्हणून आनंदबाजार, विज्ञान बुरकुंडी, पोपटी संमेलन, गणित अध्यापन वर्ग सोबतच विद्यार्थ्यांनां पर्यावरणाप्रति जागरूक करत टाकाऊ पासून टिकाऊ कसं तयार करता येईल म्हणून टायर गार्डन, स्टडी गार्डन तयार करत नवंसंकल्पना राबवत जिल्हा व तालुका व केंद्र पातळीवर तज्ञमार्गदर्शक म्हणून ज्यांनी कार्य केले.
आवरे गावात ६ वेळा रक्तदान शिबिर ६ वेळा नेत्रचिकित्सा शिबिरांचे आयोजन करून गरीब गरजूवंत लोकांना मदतीचा हात पुढे करणारे ,त्याच सोबत रक्तदान हेच सर्व श्रेष्ठ दान हे ज्यांनी कृतीतून करून दाखवत तब्बल ३३ वेळा स्वतः रक्तदान करणारे दानशूर व्यक्तीमत्व, विविध उपक्रमांद्वारे ओसाड माळरानावर कमीतकमी ५००० (पाच हजार) पेक्षा जास्त वृक्षांची लागवड करून त्यांचे संगोपन आणि संवर्धन करून निसर्गाप्रति आपली कृतज्ञाता व्यक्त करणारे निसर्गप्रेमी व्यक्तीमत्व तसेच वाचन संस्कृती वाढावी म्हणून कै.मधुकर ठाकुर वाचनालयाची स्थापना करणारे, वाचनप्रेमी सोबतच हिंदवी स्वराज्याचे संस्थापक श्री छत्रपती शिवाजी महाराजांनी स्थापन केलेल्या स्वराज्याची राजधानी दुर्गराज रायगड ची तब्बल ५४ वेळा वारी केलेला शिवभक्त दुर्गमावळा असे कौशिक ठाकूर सर. हे सर्व कार्य ते निस्वार्थी भावनेने करीत आलेले आहेत.
कौशिक ठाकूर यांच्या कार्याची दखल घेऊन काल कर्जत येथील कार्यक्रमात राज्यमंत्री तथा पालकमंत्री आदीतीताई तटकरे, आमदार बाळाराम पाटील, जिप अध्यक्षा योगिता पारधी, जिप उपाध्यक्ष सुधाकर घारे व इतर मान्यवरांच्या उपस्थितीत आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. आदर्श शिक्षक पुरस्काराने कौशिक ठाकूर यांना सन्मानित करताच त्यांच्यावर जिल्हाभरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.







Be First to Comment