Press "Enter" to skip to content

अलिबाग एसटी बसस्थानक येथे काँग्रेस व आप पक्षातर्फे निदर्शने

भविष्यात काँग्रेसतर्फे मोठे जनआंदोलन उभारणार : ऍड. प्रवीण ठाकूर यांचा इशारा

सिटी बेल | अलिबाग | अमूलकुमार जैन |

केंद्र सरकारने लागू केलेले तीन कृषी कायदे रद्द करावेत या मागणीसाठी तसेच बेरोजगारी, वाढते इंधन दर, महागाई याबाबत मोदी सरकारने ठोस कार्यवाही केली नाही तर भविष्यात काँग्रेसतर्फे मोठे जनआंदोलन करण्यात येईल असा इशारा महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे सचिव ऍड.प्रवीण मधुकर ठाकूर यांनी अलिबाग येथे दिला.

संयुक्त किसान मोर्चा आणि डाव्या पक्षांनी सोमवारी, २७ सप्टेंबर २०२१ला पुकारलेल्या ‘भारत बंद’ला अलिबाग एसटी बसस्थानक येथे काँग्रेस व आप पक्षातर्फे निदर्शने करण्यात आली त्यावेळी ते बोलत होते.

आपचे पदाधिकारी दिलीप जोग, मनोज घरत, काँग्रेसचे युवानेते राजाभाऊ ठाकूर, जिल्हा उपाध्यक्ष अनंत गोंधळी, प्रभाकर राणे, शैलेश घरत, दत्ता सुतार, कृष्णा भोपी, श्रीकांत नाईक, सुजय घरत, आकाश राणे, वसीम साखरकर, कविता ठाकूर, नमिता ठाकूर, प्रसाद गायकवाड, स्वप्नील पडवळ, मानस कुंटे, विकास पोरे, प्रसाद थळे, संतोष पेडणेकर, सुराराम माळी आदी उपस्थित होते.

केंद्रातील भारतीय जनता पक्षाचे सरकार हे शेतकरी, कामगारविरोधी सरकार असून महागाई, बेरोजगारीचा प्रश्न सोडवण्यातही मोदी सरकार सपशेल फेल ठरले आहे. देशातील शेतकऱ्यांना उद्ध्वस्त करणारे तीन काळे कृषी कायदे, कामगारविरोधी कायदे, वाढती बेरोजगारी, महागाईच्या मुद्द्यावर जनतेत तीव्र असंतोष आहे. देशातील जनता समस्यांचा सामना करत असताना झोपेचे सोंग घेतलेल्या केंद्रातील मोदी सरकारला जागे करण्यासाठी काँग्रेसने या बंदला पाठिंबा दिला आहे अशी माहिती काँग्रेसचे युवा नेते राजाभाऊ ठाकूर यांनी यावेळी दिली.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.