किनेश्वरवाडी पेढावाडीपर्यंत रस्ता करण्यासाठी मतदारांचा पक्ष विचारात घेतला नाही – आमदार भरत गोगावले
सिटी बेल | पोलादपूर | शैलेश पालकर |
तालुक्यातील जनतेने आमदारकीची तीन वेळा संधी देण्यासाठी भरघोस मतदान केल्यामुळे आपण ज्यांनी मतदान केले नाही, अशांसाठीही विविध योजनांच्या माध्यमातून विकासकामे करण्याचा निर्णय घेतला आहे. किनेश्वरवाडी ते पेढावाडीपर्यंतचा 1 कोटीचा रस्ता करताना आपले यामध्ये मतदार किती आणि या भागातील किती मतदारसंख्या अनुकूल होईल, याचा विचार आपण केला नाही. यामुळेच ग्रामस्थांनी शिवसेनेमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतला असल्याचे आ.भरत गोगावले यांनी खात्रीपूर्वक सांगितले.
याप्रसंगी व्यासपिठावर शांताराम गोळे, सरपंच मच्छिंद्र सुकाळे, राजिप सदस्य चंद्रकांत कळंबे, तालुकाप्रमुख निलेश अहिरे, वाकण विभागप्रमुख संजय मोदी, माजी तालुकाप्रमुख अंकुश सकपाळ, राजेश डांगे, ज्येष्ठ शिवसैनिक दशरथ उतेकर, विभागप्रमुख अनिल दळवी, किनेश्वरवाडीतील दिनकर दाभेकर बुवा, नारायण पवार, तानाजी पवार, रवींद्र कोंडाळकर, दगडू पवार व रामचंद्र ग.पवार तसेच संपर्क कार्यालयप्रमुख सुनील तळेकर आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी असंख्य महिला पुरूष कार्यकर्त्यांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा त्याग करून शिवसेनेमध्ये प्रवेश केला.
याप्रसंगी ग्रामपंचायत सदस्या सोनल संदीप पवार, पार्वती पवार, माया पवार, संगिता पवार, जनाबाई दाभेकर, सीताबाई दाभेकर, चंद्रा दाभेकर, पंडा दाभेकर, रंजना उतेकर, रंजना पवार, मंदा उतेकर, अनिता पवार, द्रौपदी कोंडाळकर, शिल्पा उतेकर, जिजाबाई पवार, सखुबाई गायकवाड, संगिता उतेकर, नारायण दाभेकर, नारायण उतेकर, लक्ष्मण दाभेकर, गोपाळ हरी पवार, किसन पवार, रामचंद्र जाधव, सहदेव पवार, शिवाजी पवार, चिमाजी गायकवाड तसेच अन्य काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते मोठया संख्येने शिवसेनेमध्ये सामील झाले.

आ.गोगावले यांनी, रस्त्याचे उदघाटन करायला येऊ. जिल्हा नियोजन मंडळाच्या बैठकीतून काही मिळवता आल्यास प्राधान्याने या भागातील उर्वरित कामे पूर्ण करण्यासाठी सक्रीय राहू, असे यावेळी सांगितले.
तालुकाप्रमुख निलेश अहिरे प्रास्ताविकात कुमठेकर महाराज यांनी आधी कोणत्यातरी पक्षाला शब्द दिल्याप्रमाणे मतदानावेळी सोबत नसू, असे सांगितले. पण आता आ. गोगावले यांनी 1 कोटींचा रस्ता देणार आणि अन्य कामे करणार आहोत, असे सांगितल्याने ग्रामस्थांचे मतपरिवर्तन मोठया प्रमाणात झाले आहे. या भागातून पंचायत समिती व जिल्हा परिषदेत निवडून दिले ते अतिवृष्टीकाळात मतदार जीवंत आहेत अथवा नाहीत हे पाहायलाही आले नाहीत, अशी टीका यावेळी अहिरे यांनी केली.
चंद्रकांत कळंबे यांनी, किनेश्वरवाडी गावात आल्यावर जो राष्ट्रवादी काँग्रेसचा फलक दिसतो तो पुसट झाला आहे; आता त्यावर शिवसेना लिहिणे बाकी आहे. कडेला भगवा झेंडा फडकला आहेच. प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेचा रस्ता मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेत सामील केला. नळपाणी योजना, अंगणवाडी इमारत व अंतर्गत रस्ते करायचे आहेत. शांताराम गोळे यांना पेढावाडीपासून बिनविरोध सरपंच केले होते. आता पुर्वीच्या शिवसैनिकांनी पुन्हा शिवसेनेत प्रवेश केला हा आनंद आहे, असे सांगितले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शांताराम गोळे यांनी केले.







Be First to Comment