प्रवाहाच्या विरोधात काम करण्याची ताकद आमच्यात आहे – काँगेस जिल्हाध्यक्ष महेंद्र घरत
सिटी बेल | पेण | अनिस मनियार |
प्रवाहाच्या विरोधात काम करण्याची ताकद आमच्यात असुन जिल्हाभरात कार्यकर्त्यांना बळ देऊन काँग्रेस पक्षाला गतवैभव प्राप्त करून देण्याची काम पुढील काळात करणार असल्याची ग्वाही काँग्रेसचे नवनिर्वाचित जिल्हाध्यक्ष महेंद्र घरत यांनी पेणमध्ये दिली.
पेण तालुका काँग्रेसच्या वतीने काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष महेंद्र घरत यांच्या सत्कार सोहोळ्याचे आयोजन गांधी मंदिर येथील सभागृहात करण्यात आले होते. यावेळी काँग्रेस कार्यकर्त्यांनी पेणमधून रॅली काढली होती.
या कार्यक्रमास काँग्रेस महिला जिल्हाध्यक्ष अँड. श्रद्धा ठाकूर, काँग्रेस प्रदेश सरचिटणीस चंद्रकांत पाटील, प्रदेश सरचिटणीस नंदा म्हात्रे, जिल्हा उपाध्यक्ष मिलिंद पाडगांवकर, ज्येष्ठ नेते अँड. विठ्ठलराव गावंड, अँड. बापूसाहेब नेने, अँड. जे. टी. पाटील, राजाभाऊ ठाकुर, योगेश मगर, महादेव कटेकर, अशोक मोकल, शहर अध्यक्ष प्रविण पाटील, किसान मोर्चा अध्यक्ष सूर्यकांत पाटील, राजेद्र म्हात्रे, परशुराम म्हात्रे, अखलाक सिलहोत्री, सद्दाम दफेदार, नाना म्हात्रे, अशोक मुंढे, प्रकाश मोकल, हिदू कुवारे आदींसह मान्यवर उपस्थित होते.
यावेळी बोलताना जिल्हाध्यक्ष महेंद्र घरत यांनी सांगितले कि, देशातील राजकारण एक वेगळ्या दिशेने चालले असून सर्व सामन्यांच्या मनात केंद्र सरकारच्या विरोधात एक चीड निर्माण झाली असुन प्रत्येकाला आता काँग्रेसचे सरकार हवे असल्याची भावना निर्माण झाली आहे. राज्यात नाना पटोले सारखे खंबीर नेतृत्व आपल्या पाठीशी ठाम असून येत्या काळात आहे त्यांच्या आदेशनुसार जे आपल्या बरोबर येतील त्यांना बरोबर घेऊन काम करायचे जे येणार नाहीत त्यांना त्यांच्या परिस्थितीवर सोडून द्यायचे असे धोरण अवलंबिले असून पक्ष वाढीसाठी प्रत्येक कार्यकर्त्याने योगदान दिले पाहिजे. कारण काँग्रेस हा एक विचारधारेचा पक्ष, सर्वधर्म समभाव जोपासणारा पक्ष आहे. या पक्षामध्ये अनेक ज्येष्ठ कार्यकर्त्यांचे योगदान असुन नवतरुणांनाही पक्षाचे ध्येय धोरण समजावून त्यांना पक्षात सामावून घेतले पाहिजे असे यावेळी महेंद्र घरत यांनी सांगितले.

पेणमधील काँग्रेस कार्यकर्ते चांगल्या प्रकारे काम करीत असुन चक्रीवाद, कोरोना संकट, शेतकऱ्यांचे प्रश्न, मच्छिमारांचा मोबदला अशा अनेक गोष्टींसह सर्व सामान्यांच्या अडी- अडचणी सोडविण्याचे काम पदाधिकाऱ्यांनी केले असल्याचे सांगत यावेळी महेंद्र घरत यांनी त्यांचे अभिनंदन केले. तसेच आगामी काळात पेण तालुकाध्यक्ष पदाचा तिढाही लवकरच सोडविण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी प्रदेश सरचिटणीस चंद्रकांत पाटील व नंदा म्हात्रे यांनी आपल्या मनोगतातून पक्ष वाढीसाठी सदैव कार्यरत असल्याचे सांगून तालुक्यात काँग्रेस पक्ष वाढविण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे सांगितले. कार्यक्रमाचे सूत्र संचालन राजू म्हात्रे यांनी केले.
यावेळी झालेल्या पत्रकार परिषदेत जिल्हाध्यक्ष महेंद्र घरत यांनी सोमवार २७ सप्टेंबर रोजी होणाऱ्या भारत बंद आंदोलनात काँग्रेस पक्ष सक्रिय सहभाग घेणार असून केंद्र शासनाने शेतकरी, कामगार विरोधी कायदे रद्द करावे अशी मागणी यावेळी करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच पेण तालुक्यातील ङोलवी एमआयडीसी प्रकल्पग्रस्त यांचे प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्नशील राहू असे शेवटी ते म्हणाले.







Be First to Comment