ग्रामस्थांनी लोकवर्गणीतून स्वखर्चाने संपूर्ण मूळ व विस्तारीत गावठाणक्षेत्राचे केले सर्वेक्षण
सिटी बेल | उरण | विठ्ठल ममताबादे |
ग्रुपग्रामपंचायत चिर्ले मधील चिर्ले गावाचा मूळ गावठाण क्षेत्र व नैसर्गिकरीत्या वाढत्या कुटुंब संख्येमुळे ग्रामस्थांनी बांधलेली विस्तारीत गावठाण क्षेत्रातील सर्व घरे,तसेच चिरले साईनगरवाडीतील विस्तारीत गावठाणास मान्यता देऊन तेथील सर्व घरे नियमित करून घरांना प्राॅपर्टी कार्ड ग्रामस्थ व ग्रुपग्रामपंचायतीच्या नावे करण्यासाठी मूळ गावठाण व विस्तारीत गावठाणाचा सिमांकित नकाशा मान्य करून गावठाणविस्तारास मान्यता देणेसाठी दिनांक १५\०९\२०२१ रोजी चिर्ले ग्रामपंचायत व ग्रामस्थांच्या वतीने संदेश ठाकूर,सुरेश ठाकूर,ॲड. चंद्रकांत मढवी यांनी गावठाणविस्ताराचा प्रस्ताव जिल्हाधिकारी रायगड यांना सादर केला.
मागील ७० वर्षे चिर्ले गावाचा गावठाणविस्तार झालाच नाही.१९७० नंतर वाढती लोकसंख्या व कुटुंबसंख्येप्रमाणे नियमानुसार दर १० वर्षांनी २०० मिटर गावठाणविस्तार होणे कायद्यानुसार आवश्यक होते. चिर्ले गावाचा मूळ गावठाक्षेत्र ७० वर्षांपूर्वीचा म्हणजे फक्त ५ एकर क्षेत्रात आहे.वास्तविक दर १० वर्षांनी २०० मीटर प्रमाणे किमान ०५ वेळातरी गावठाणविस्तार होणे आवश्यक होता परंतु तो झालाच नाही.वाढत्या कुटुंब गरजेनुसार ग्रामस्थांनी मूळ गावठाणाबाहेर रीतसर ग्रुपग्रामपंचायतीच्या परवानगीने घरे बांधली.त्यामुळेच विस्तारीत गावठाणक्षेत्र हे अंदाजे ५४ एकर जमिनीवर वाढले आहे.
आज चिर्ले गाव व साईनगरवाडीत घरांची संख्या ८३० एवढी आहे.तर चिरले गाव व साईनगरवाडीतील लोकसंख्या जनगणनेनुसार २८१८ एवढी आहे.म्हणूनच चिर्ले ग्रामस्थ व सर्वपक्षीय पदाधिकाऱ्यांनी एकत्रित बैठका घेऊन गावठाणविस्ताराचा प्रस्ताव जिल्हाधिकारी रायगड यांना देण्यासाठी एकमुखाने निर्णय घेण्यात आला व ग्रामपंचायतीने ठराव मंजूर केला.त्यासाठी सर्वप्रथम ग्रामस्थांनी लोकवर्गणीतून स्वखर्चाने संपूर्ण मूळ व विस्तारीत गावठाणक्षेत्राचे सर्वेक्षण करून गावाचे सिमांकण कले.सर्वेक्षण करणे,लागणारी कागदपत्रे व प्रस्ताव तयार करण्याची जबाबदारी ग्रामपंचायत व ग्रामस्थांनी अत्यंत विश्वासाने संदेश ठाकूर,सुरेश ठाकूर,ॲड. चंद्रकांत मढवी यांच्यावर सोपविण्यात आली व ती त्यांनी पार पाडली.तेवढीच मोलाची साथ त्यांना चिरले गावातील सर्व ग्रामस्थांनी दिली आणि गावठाणविस्ताराचा प्रस्ताव जिल्हाधिकारी रायगड यांना सादर करण्यात आला.
१९८४ साली जेव्हा सिडकोने ९५ गावांच्या जमीनी संपादीत केल्या तेव्हाच सिडको आणि जिल्हाधिकारी यांनी गावांचा गावठाणविस्तार करून पुनर्वसन करून सुखसुविधा देणे आवश्यक होते ती त्यांची जबाबदारीच होती.परंतु सिडकोने चिरले गावाचा कोणत्याही प्रकारचे पुनर्वसन व गावठाणविस्तार केलाच नाही.जिल्हाधिकारी तथा शासनाने ग्रुपग्रामपंचायत चिरले व ग्रामस्थांच्या मागणीचा अत्यंत संवेदनशीलपणे विचार करून चिरले गाव व साईनगरवाडीतील गावठाण विस्ताराला कोणत्याही अटीशर्ती शिवाय मान्यता द्यावी.ग्रामस्थांनी गावठाणाबाहेरील स्वतःच्याच अकृषिक जागेत दुसऱ्याकडून विकत घेतलेली जमीन गावालगतच्या ग्रुपग्रामपंचायत अधिकार क्षेत्रातील सरकारी परीघ,गायरान जमीनीवर बांधलेली सर्व घरे,बांधकामे नियमित करून चिर्ले गाव व साईनगरवाडीचा गावठाण विस्ताराचा प्रस्ताव मंजूर करावा.अशी मागणी जिल्हाधिकाऱ्यांना करण्यात आली.
Be First to Comment