घरातील सर्वजच श्रीगणेश दर्शंनाला गेल्याने बचावले
सिटी बेल | रसायनी | राकेश खराडे |
भिलवले आदिवासीवाडीतील अशोक शंकर वाघमारे यांचे घर भरपावसात जागेवर बसले,मात्र घरातील सर्वजण गणपतीची आरती व दर्शनाला गेल्याने जिवितहानी झाली नाही. म्हणतात देव तारी त्याला कोण मारी !
हवामान खात्याने दिलेला अंदाज दररोज खरा ठरत आहे, त्यामुळे घडणाऱ्या घटनांनी सर्वसामान्य लोकांना भीतीदायक वाटत आहे.काल सायंकाळ पासून जोरदार पाऊस व वारा सुरू झाला होतो,या जोरदार पाऊस व वाऱ्याने भिलवले आदिवासी वाडीतील अशोक शंकर वाघमारे यांचे घर उडून न जाता जागेवरच बसले, त्यामुळे मोठी आर्थिक हानी झाली आहे.
या घरातील चार मुले,बायका व पुरुष शेजारील घरात गणरायाचे दर्शन व आरती घेण्यासाठी गेले होते. त्यामुळे घरातील सर्व सदस्य गणरायाच्या कृपेने सुखरूप आहेत.ही माहिती मिळताच भिलवले गावचे पोलीस पाटील अनंत ठोंबरे यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली व महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांना झालेली घटना भ्रमणध्वनी वरून सांगितली.
चौक चे मंडळ अधिकारी किरण पाटील, वावंढळ तलाठी अमोल बोराटे,वावर्ले तलाठी मुदगण हे घटनास्थळी पोहचले,रात्री या अपघातग्रस्त कुटुंबाची जेवणाची सोय व सकाळी नाश्ताची सोय पोलीस पाटील अनंत ठोंबरे यांनी केली.आज सकाळी भिलवले समाजमंदिर येथे कुटुंबाला रहाण्याची सोय उपलब्ध करून दिली आहे,तर त्यांना जेवण साहित्य व जीवनावश्यक वस्तूंच्या रूपाने किरण पाटील,अमोल बोराटे,मुदगण यांनी मदत दिली आहे.आज सार्वजनिक सुट्टी असतानाही तातडीने पंचनामे करून खालापूर कार्यालयात पाठविण्यात आले आहेत.
Be First to Comment