सिटी बेल | उरण |
पत्रलेखन संकल्पना सध्या कुठतरी हरवत चालली आहे. घरोघरी सर्वांना सुखदुःखाच्या गोष्टी पोहोचवणारे पोस्टमन काका आजकाल कुठे दिसत नाहीत. पण ह्याच विषयाला पुन्हा एकदा संजीवनी देण्याचे काम वर्डालय मीडिया अँड पब्लिकेशन हाऊसने केले आहे. ११ जुलै २०२१ रोजी ह्या पब्लिकेशन हाऊस तर्फे खुली पत्रलेखन स्पर्धा आयोजित केली होती. ह्या स्पर्धेत वाचकांच्या आवडीचे पत्र ह्या कॅटेगरीमध्ये आवरे गावच्या महेंद्र गुरुनाथ पाटील ह्या आगरी मुलाने प्रथम क्रमांक पटकावला आहे.
ह्या पत्रलेखन स्पर्धेत अनेक विषय दिले गेले होते. ह्यात पावसाळा पत्र, महापुरुषाला पत्र, नकार दिलेल्या प्रेयसी/प्रियकराला पत्र, विठ्ठलाला पत्र, वृद्धाश्रमातून आपल्या मुला/मुलीस पत्र असे विषय होते. स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत फक्त महाराष्ट्र नाही तर संपूर्ण जगातून ५०० हून अधिक पत्र वर्डालय मीडियाच्या पेटीत जमा झाली. ह्या स्पर्धेतून टॉप ६० अशा स्पर्धकांना निवडण्यात आले.
संपूर्ण महाराष्ट्रातून झालेल्या ह्या पत्रलेखन स्पर्धेत एका आगरी मुलाचे हे यश पाहून संपूर्ण उरण तालुका त्याला शुभेच्छा देत आहे. महेंद्र गुरुनाथ पाटील ने नकार दिलेल्या प्रेयसीस पत्र ह्या विषयावर पत्र लिहिले होते. वाचकाच्या पसंतीचे पत्र म्हणून त्याला पहिलं पारितोषिक मिळालं. हे पारितोषिक कविवर्य मा. इंद्रजित भालेराव सर (सुप्रसिद्ध मराठी साहित्यिक ) यांच्याकडून मिळाले.
महेंद्र पाटील बद्दल सांगायचं झालं तर तो एक उत्तम लेखक आहे हे खूप कमी लोकांना माहीत आहे. त्याने आतापर्यंत ५०० हून अधिक कथांचे लेखन केलं आहे. पाटीलजी म्हणून सोशल मीडियावर तो लोकप्रिय आहे. उरण तालुक्यातील आवरे गावात असा लेखक आहे आणि आपल्याला हे माहीत देखील नाही हे दुर्दैव. महेंद्र पाटील ह्याला पुढील वाटचालीस खूप साऱ्या शुभेच्छा.
Be First to Comment