सिटी बेल | उरण | घन:श्याम कडू |
शासनाने करंजा-रेवस पुलाला मंजुरी दिली असून लवकरच त्याची निविदा निघणार आहे. परंतु या पुलासाठी भराव करण्यात आलेल्या मातीचे अनधिकृतपणे उत्तखनन होत आहे. तरी सबधितांवर कारवाई करण्याची मागणी अलिबागचे आमदार महेंद्र दळवी यांनी केली आहे.
बॅरिस्टर ए. आर. अंतुले हे मुख्यमंत्री असताना त्यांनी करंजा-रेवस पुलाला मंजुरी देऊन कामास सुरुवात ही केली होती. परंतु मुख्यमंत्री पदावरून पायउतार होताच सदर पुलाचे काम आजतागायत रखडले होते.
राज्यात महाविकास आघाडीचे सरकार स्थापन होताच अलिबागचे आमदार महेंद्र दळवी यांनी पुन्हा पाठपुरावा सुरू केला. या पाठपुराव्याला यश येत आर्थिक निधीची तरतूद ही करण्यात आली आहे.
चाणजे मध्ये उरण परिसरातील सुप्रसिद्ध द्रोणागिरी देवीचे मंदिर आहे. या मंदिराच्या अगदी जवळ पुलासाठी मातीचा भराव करण्यात आला होता. सदर मातीचे गेल्यावर्षी अनधिकृतपणे उत्तखनन करून कोट्यवधी रुपयांची माती चोरून नेण्यात आली होती. आता पुन्हा यावर्षीही अनधिकृतपणे पुन्हा मातीचे उत्तखनन सुरू होते. यावेळी ग्रामस्थांनी या उखन्नामुळे द्रोणागिरी मंदिराला धोका असल्याचे सांगताच घटनास्थळी चाणजे सर्कल संतोष जाभले व तळाठी पाटील यांनी भेट देऊन काम थांबविले आहे. परंतु या संदर्भात कोणावरही गुन्हा दाखल झाला नसल्याने ग्रामस्थांची संशयाची सुई अधिकारी वर्गाकडे जात आहे.
करंजा-रेवस पुलासाठी उरणमधील महाविकास आघाडीतील घटक पक्ष किंवा इतर पक्ष, आजी माजी लोकप्रतिनिधी व सामाजिक संघटना पुढाकार घेताना दिसत नाही. मात्र अलिबागचे आमदार महेंद्र दळवी यांनी या संदर्भात आवाज उठवत याची तक्रार करून अनधिकृतपणे माती उत्तखनन करणाऱ्यांविरोधात कारवाई करण्याची मागणी उपविभागीय अधिकारी यांच्याकडे लेखी पत्राद्वारे केली आहे.








Be First to Comment