Press "Enter" to skip to content

जिल्हाध्यक्ष डॉ. श्रुती म्हात्रे यांच्या नेतृत्वाखाली आयोजन

पनवेल जिल्हा काँग्रेसतर्फे भारत रक्षक BLA-2 SIR प्रशिक्षण शिबिर उत्साहात संपन्न

पनवेल : पनवेल जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने भारत रक्षक BLA-2, १८८ पनवेल विधानसभा मतदारसंघाचे SIR प्रशिक्षण शिबिर आज आद्य क्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके नाट्यगृह, पनवेल येथे उत्साहात पार पडले. पनवेल जिल्हा काँग्रेसच्या नवनिर्वाचित जिल्हाध्यक्ष डॉ. श्रुती शाम म्हात्रे यांच्या नेतृत्वाखाली या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.

या शिबिरामध्ये प्रमुख मार्गदर्शक व प्रशिक्षक म्हणून ॲड. अरविंद द्विवेदी यांनी उपस्थित सुमारे ५०० BLA-2 कार्यकर्त्यांना सविस्तर मार्गदर्शन केले. त्यांनी BLA-2 ची भूमिका, जबाबदाऱ्या आणि मतदारांच्या अधिकारांच्या संरक्षणासाठी करावयाच्या कार्याची माहिती दिली. बिहार आणि पश्चिम बंगालमध्ये सत्ता मिळविण्याच्या उद्देशाने भाजपने निवडणूक आयोगाला हाताशी धरून लाखो अधिकृत मतदारांची नावे मतदार यादीतून वगळल्याचा आरोप त्यांनी यावेळी केला.

कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे व मार्गदर्शक म्हणून महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे प्रवक्ते हनुमंत पवार उपस्थित होते. त्यांनी विविध विषयांवर मार्गदर्शन करताना, “आपण केवळ काँग्रेस पक्षाचे BLA-2 नसून देशातील पीडित व सर्वसामान्य नागरिकांच्या मतदानाच्या अधिकाराचे संरक्षण करणारे खरे भारत रक्षक आहोत,” असे प्रतिपादन केले.
पनवेल महानगरपालिकेचे नगरसेवक हरीश केणी यांनी लोकसभा ते नगरपरिषद सभागृहापर्यंत भाजप हुकूमशाही पद्धतीने विरोधी पक्षातील लोकप्रतिनिधींचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करत असल्याची टीका केली.

जिल्हाध्यक्ष डॉ. श्रुती म्हात्रे यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात सांगितले की, आंतरराष्ट्रीय पातळीवर पनवेल शहराची वाढत्या लोकसंख्येचे शहर म्हणून ओळख निर्माण होत आहे. जिल्ह्यातील प्रत्येक शहर आणि मतदान केंद्रापर्यंत काँग्रेसची विचारधारा पोहोचवून पक्ष संघटना अधिक मजबूत करण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला.
जिल्हा कार्याध्यक्षांनी उपस्थितांचे आभार मानले. तसेच पक्षाच्या पुढील वाटचाली व नियोजनाबाबत काँग्रेस चे जिल्हा प्रवक्ते अजय कापरे यांनी पत्रकारांना माहिती दिली. डॉ. श्रुती म्हात्रे यांच्या नेतृत्वाखाली “हर घर काँग्रेस” हा अभिनव उपक्रम येत्या काळात राबविण्यात येणार असून, त्याद्वारे गावागावांमध्ये काँग्रेसची विचारधारा व संघटन अधिक बळकट करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

यावेळी देशातील काँग्रेस संघटनेच्या बळकटीकरणाबाबतही माहिती देण्यात आली. काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी तसेच महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या मार्गदर्शनाखाली गावापासून ते दिल्लीपर्यंत पक्ष संघटना अधिक सक्षम करण्यासाठी विविध उपक्रम राबविण्यात येत असल्याचे वक्त्यांनी सांगितले. बूथ स्तरावरील संघटन, युवक व महिला सहभाग, सामाजिक प्रश्नांवरील जनआंदोलने आणि लोकशाही मूल्यांच्या संरक्षणासाठी काँग्रेस पक्ष सातत्याने कार्यरत असल्याचेही यावेळी नमूद करण्यात आले.

या कार्यक्रमाला प्रमुख मार्गदर्शक ॲड. अरविंद द्विवेदी, पक्ष प्रवक्ते हनुमंत पवार, जिल्हाध्यक्ष डॉ. श्रुती म्हात्रे, नगरसेवक हरीश केणी, नगरसेवक लतिफ शेख, नगरसेवक लीना कातकरी, मा .नगरसेवक रवी म्हात्रे जिल्हा निरीक्षक डॉ. झिशान सिद्दिकी, कार्याध्यक्ष शशिकला सिंग, जिल्हा प्रवक्ते अजय कापरे, उपाध्यक्ष चेतन म्हात्रे, उपाध्यक्ष अमित दवे, शंभू म्हात्रे आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी डॉ. श्रुती म्हात्रे, हरीश केणी, लतिफ शेख, लीना कातकरी, शशिकला सिंग, चेतन म्हात्रे, अमित दवे आणि शंभू म्हात्रे यांनी विशेष परिश्रम घेतले.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.