सिटी बेल | उरण | विठ्ठल ममताबादे |
रायगड जिल्ह्यात कोरोना विषयक जनजागृती, कोविशिल्ड लसीकरण मोहीम, तोक्ते चक्रीवादळ अशा ठिकाणी आपल्या जीवाची पर्वा न करता निरपेक्ष भावनेने विलास पाटील यांनी स्वतःला या कार्यात जनसेवेसाठी झोकून दिले. त्यांच्या या कार्याची दखल घेत महाराष्ट्र शासनातर्फे स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून नागरी संरक्षण महाराष्ट्र राज्य सचिवालय मुंबई यांच्या दालनात सेवाव्रती विलास गजानन पाटील यांचा डॉ के. वेंकटेशम (IPS, DGP )संचालक नागरी संरक्षण महाराष्ट्र राज्य यांच्या हस्ते प्रमाणपत्र देऊन विशेष सत्कार करण्यात आला.

देशात व राज्यात सर्वत्र कोविड -19 ने हाहाकार माजला असताना घरातून बाहेर पडणे धोकादायक असताना अश्या परिस्थितीत विलास पाटील (लिपिक -टंकलेखक)यांनी रायगड जिल्ह्यात नागरिकांसाठी नागरी संरक्षण दलातर्फे सुरु केलेल्या कोविड 19 लसीकरण केंद्राच्या लसीकरणामध्ये जिल्हादंडाधिकारी व नियंत्रक नागरी संरक्षण रायगड जिल्हा,उपनियंत्रक नागरी संरक्षण रायगड जिल्हा , तहसीलदार उरण यांच्या आदेशानुसार टोकन पद्धत वापरून लिपिक वर्गीय कर्मचारी असूनही गर्दीचे नियोजन उत्तम प्रकारे केले.त्याचप्रमाणे तोक्ते वादळामुळे पडलेल्या झाडांना हटविणे,इमारतीवर वाकलेल्या झाडांच्या छाटणीसाठी स्थानिक प्रशासनास बहुमोलाचे सहकार्य केले. या बद्दल उरण तहसील कार्यालया मार्फतही विलास पाटील यांचा सत्कार करण्यात आला आहे.

विलास पाटील हे ‘अखिल कराडी समाज महाराष्ट्र’ व ‘उरण तालुका कराडी समाज’ या कराडी समाजाच्या संघटनेचे मुख्य सचिव आहेत. कराडी समाजाच्या प्रगतीसाठी ते रांत्रदिवस झटतात. महाड मधील पूरग्रस्तांना देखील आपली सामाजिक बांधिलकी जपत त्यांनी सहकार्य केले आहे.अशा या सेवाव्रती, मनमिळावू व्यक्तिमत्व असलेल्या विलास गजानन पाटील यांचा शासनातर्फे सत्कार करण्यात आला असून ही त्यांच्या कार्याची पोहोचपावती आहे असे जनतेतून मत व्यक्त होत असून ‘अखिल कराडी समाज महाराष्ट्र’ या संघटनेचे सर्व पदाधिकारी सदस्य तसेच महाराष्ट्रातील जनतेने, विलास पाटील मित्र परिवार, कुटुंबियांनी त्यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.









Be First to Comment