धुप प्रतिबंधक बंधार्यांचा अभाव व वाळू माफियांमुळे नांदगावच्या समुद्र किनार्यांची धुप
सिटी बेल | अलिबाग | अमूलकुमार जैन |
ग्रोयन्स पध्दतीच्या धुप प्रतिबंधक बंधार्याचा अभाव व किनार्यावर मोठमोठे खड्डे खणून राजरोसपणे चोरी करणार्या वाळू माफियांमुळे नांदगावच्या समुद्रकिनार्याची धुप झाली आहे.
निसर्ग व तोक्ते वादळांबरोबर समुद्राला येत असलेल्या उधाणाच्या भरतीच्या भल्यामोठ्या लाटांच्या तडाख्यामुळे या किनार्यावर यापूर्वी असलेल्या वाळूच्या टेकड्या उध्वस्त होत असून समुद्र आपली मर्यादा ओलांडून आत घुसु लगला आहे. शासनाच्या दुर्लक्षामुळे या किनारपट्टीचे सौंदर्य धोक्यात येऊन ती दिवसेंदिवस विद्रुप होत आहे.

या समुद्रकिनारी तिसचाळीस वर्षापूर्वी दोन तिन छोटे दगडी बंधारे बांधण्यातआले होते.परंतु समुद्राच्या वाढत्या अतिक्रमणापुढे व दगडांच्या चोरीमुळे ते कुचकामी ठरले त्या नंतर उर्वरित किनारा तसाच राहिला आहे. स्थानिक लोकप्रतिनिधी व शासनाकडे अनेक अर्ज विनंत्या करुनही कोणी फारसे गांभिर्याने घेतलेले नाही.
यापूर्वी या किनार्यावर मोठमोठी केतकीची बने अस्तित्वात होती.किनार्यावर धडकणार्या लाटांचा मारा थोपविण्याचे व वार्याने उडणार्या वाळूला रोखून धरण्याचे काम ही बने करीत होती तसेच कीनार्यालगतच्या नारळ सुपारीच्या बागायतींचे रक्षणही ती करीत होती.परंतु येथिल बहुतांशी बागायतदारांनी अशा बागायतींच्या किनार्यालगतच्या जागेची विक्री मुंबईतील धनिक मंडळींना केल्यामुळे त्यांनी आपल्या बंगल्यांच्या उभारणी करिता त्यांची कत्तल केली परिणामी किनारपट्टी उघडी पडली.त्यातील काहीनी त्यांच्या मिळकतीच्या संरक्षणार्थ दगडी बंधार्यांसह सिमेंट काॅक्रिटचे भलेमोठे बंधारे बांधून पाण्याचे आक्रमण थोपवून धरले आहे.परंतु गोरगरिबांच्या बागांतून आता अधिक वेगाने समुद्राचे पाणी घुसत आहे.तर येथे असणार्या दोन हिंदू स्मशानभूमी देखिल उध्वस्त होण्याच्या मार्गावर आहेत.
पाण्याच्या अतिक्रमणामुळे येथिल बागांतील नारळ सुपारीची झाडे जमीनदोस्त होत आहेत.मुरुडच्या वनखात्याने अनेक वर्षापूर्वी किनार्यावरील मोकळ्या जागेत सामाजिक वनिकरणांतर्गत लावलेली सुरुची बनेही पुरती उध्वस्त झाली आहेत एवढेच नव्हे तर तुटलेल्या वाळूच्या टेकड्याखालून आता पूर्वी किनारी दफन केलेल्या मृतदेहांचे कुजलेल्या हाडांचे सांगाडे वाळू घसरुन बाहेर पडत आहेत.

स्थानिक महसूल अधिकार्यांच्या दुर्लक्षामुळे या परिसरातील अनेक वाळू माफिया आपल्या बैलगाड्या, ट्रक,टेंपो आणि जेसिबी लावून देखिल वाळूची तस्करी करीत आहेत.अशा गाड्या पकडल्यावर स्थानिक लोक प्रतिनिधी दूरध्वनीव्दारे त्यांची वकिली करतांना दिसून येतात.या वाळू माफियांनी वाळू खोदून काढतांना केलेल्या खड्ड्यांमुळेही किनार्याची धूप होत आहेच शिवाय किनाराही बकाल होत आहे.
दरम्यान येथून जाणारा सागरी महामार्ग जर किनारपट्टी लगतच्या जागेतून गेल्यास किनारपट्टीचे संरक्षण होऊ शकेल व किनार्याचे सौंदर्यही वाढण्यास मदत होईल. तशा दृष्टीकोनातून विद्यमान खासदार सुनिल तटकरे यांनी पाहणीही केली होती.मात्र ते जास्त खर्चिक होऊ शकेल.पण एका दगडात दोन पक्षी मारता येतील.मात्र या गोष्टीला वेळ लागणार असल्याने सद्यस्थितीत किनार्याची धुप रोखणे गरजेचे आहे.








Be First to Comment