अन्यथा पनवेल मधील शेतकरी, व्यापारी, माथाडी कामगारांचा महानगरपालीकेवर मोर्चा
सिटी बेल लाइव्ह / पनवेल #
कोरोना चा प्रसार होऊ नये याकरता महानगरपालिकेने बंद केलेली पनवेल कृषि उत्पन्न बाजार समिती पुन्हा सुरू करावी अशी मागणी पनवेल मधील शेतकरी, व्यापारी तसेच माथाडी कामगार संघटनेने महानगर पालिका आयुक्तांकडे केली आहे.
याबाबत आयुक्तांना देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की,
कृषि उत्पन्न बाजार समीती तीन महिने लॉकडाऊन झाल्यामुळे बंद आहे. आपण दिलेल्या आदेशामुळे आम्ही प्रत्येक व्यापाऱ्यांनी, शेतकरी – माथाडी कामगार यांनी आपल्या नियमांचे पालन केलेले आहे. परंतु आता आमची आर्थिक परीस्थीती खूप हालाखीची झालेली आहे. सर्व शेतकरी वर्गाचा आजच्या घडीला भाजीपाला तयार होवून विक्री होत नसल्यामुळे माल
शेतीतच सडून जात आहे. शेतकऱ्याला देशाचा पोशिंदा जर म्हणत असाल तर खऱ्या अर्थाने त्याला न्याय मिळत आहे का ?
व्यापारी व माथाडी वर्गाचीही तीच अवस्था आहे. ही बाजार समिती आपण सोमवार दिनांक २०/०७/२०२० रोजी चालू करण्याचे आदेश द्यावेत. कारण श्रावण महिना सुरू होत असल्यामुळे भाजीपाल्याचा वापर करणारे अनेक नागरीक आहेत त्यामुळे विचार करा !
आता आमच्या हया सर्व गोष्टी हाताबाहेर गेल्या आहेत. आमचा शेतकरी, व्यापारी, माघाडी कामगार व इतरांची रोजी रोटी चालू झाली नाहीतर आम्हावर उपासमारीचे संकट येईल. आम्हाला महानगरपालीकेवर मोर्चा काढण्याशिवाय पर्याय राहणार नाही. मग आम्हा सर्वांवर जी काही कारवाई करायची ती करा आम्ही सामोरे जाण्यास तयार आहोत असा इशारा देखील या निवेदनात देण्यात आला आहे.
सदर निवेदन कृषि उत्पन्न बाजार समीती, पनवेल शेतकरी, व्यापारी व माथाडी संघटना यांच्या तर्फे मनोहर गणपत मुंबईकर, रमाकांत हाशा गरूडे, सागर गजानन चव्हाण, दिपक अच्छेलाल सोनकर, वैभव चंद्रकात पगडे, मयुर देवीदास कराळे, विजय पोपट शिंदे यांनी दिले आहे.






Be First to Comment