Press "Enter" to skip to content

भोकरपाडा जलशुद्धीकरण केंद्राला मिळणार अखंडित वीज पुरवठा

एक्सप्रेस फिडरचे काम अंतिम टप्प्यात 🔶🔷🔷🔶

सिटी बेल लाइव्ह / रसायनी-राकेश खराडे 🔶🔶🔷🔷

पनवेल शहरासह सिडको वसाहतीला पाणीपुरवठा करणाऱ्या महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या भोकरपाडा येथील जलशुद्धीकरण केंद्राला अखंडित वीज पुरवठा यापुढे होणार आहे. त्यासाठी स्वतंत्र एक्सप्रेस फिडर बसवण्यात आला आहे. हे काम अंतिम टप्प्यात असून पुढील महिन्यात फिडर कार्यान्वित होईल अशी माहिती एम जे पीच्या इलेक्ट्रिकल विभागाकडून सांगण्यात आले. आमदार प्रशांत ठाकूर यांनी या संदर्भात वारंवार पाठपुरावा केला होता.

पनवेल परिसराला महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडून दररोज 80 एमएलडी पाणीपुरवठा केला जातो. त्यामध्ये पनवेल शहर, नवीन पनवेल, कलंबोली, करंजाडे या परिसराचा समावेश आहे. 
पातळ गंगा नदीतून वायाळ येथून पाणी उपसून ते भोकरपाडा जलशुद्धीकरण केंद्रात शुद्ध केले जाते. आणि तेथून पाणी पनवेल परिसरात आणले जाते. दरम्यान ही वाहिनी जीर्ण व जुनाट झाल्याने अगोदरच चाळीस टक्के पाणी गळती होत आहे. त्यामुळे सहाजिकच मागणीच्या तुलनेत पनवेल परिसराला कमी पाणी मिळते.

महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडून पाणी घेऊन सिडको ते वसाहतीतील रहिवाशांना पुरवते. दरम्यान वर्षभर पाणीटंचाईला रहिवाशांना सामोरे जावे लागत आहे. त्यातच वारंवार शटडाऊन घेतला जात असल्याने पनवेलकरांच्या तोंडचे पाणी पळत आहे. विशेष करून नवीन पनवेल परिसरात मोठ्या प्रमाणात पाणी टंचाईला सामोरे जावे लागत आहे.

पावसाळ्यात झाडे पडून वीजपुरवठा खंडित होण्याचे प्रमाण जास्त आहे. या सर्व पार्श्वभूमीवर आमदार प्रशांत ठाकूर यांनी राज्याचे तत्कालीन पाणीपुरवठा मंत्री बबनराव लोणीकर यांच्याकडे पाठपुरावा केला होता. यासंदर्भात मंत्रालयात बैठकाही घेण्यात आल्या होत्या, संबंधित जुनाट जलवाहिन्या बदलण्याबरोबरच भोकरपाडा जलशुद्धीकरण  व पाणी उपसा केंद्रासाठी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडून स्वतंत्र एक्सप्रेस वीज फिडर टाकण्याबाबत मागणी करण्यात आली होती.

त्यानुसार एमजेपीच्या वरिष्ठ कार्यालयाकडून परवानगी देण्यात आली. प्रशासकीय आर्थिक मंजुरी ठेकेदार नियुक्त करण्यात आला. हे काम अगोदर होणे अपेक्षित होते. मात्र लॉक डाऊन त्यामध्ये व्यक्ती आल्याचे इलेक्ट्रिकल विभागाकडून सांगण्यात आले.


नगरसेवक संतोष शेट्टी यांचा अखंडित पाठपुरावा सुरू


नवीन पनवेल याठिकाणी मागणीप्रमाणे पाणीपुरवठा होत नाही. वीज पुरवठा खंडित होत असल्याने एम जे पी कडून वारंवार कडून घेतला जातो. पावसाळ्यात सातत्याने ही समस्या भेडसावत आहे. आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मागणीनुसार एक्सप्रेस फिडर त्वरीत व्हावा याकरीता पनवेल मनपाचे नगरसेवक संतोष शेट्टी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या अधिकार्‍यांकडे सातत्याने पाठपुरावा करत आहेत. त्या पार्श्वभूमीवर आ. ठाकूर यांनी काही दिवसांपूर्वी एम जे पी इलेक्ट्रिकल विभागाचे कार्यकारी अभियंता व्हि.के सूर्यवंशी, उप अभियंता सुरेंद्र भोसले यांच्याशी चर्चा केली. त्याचबरोबर शेट्टी यांनीही शुक्रवारी संबंधित अधिकाऱ्यांशी संपर्क साधून लवकरात लवकर काम करण्याची मागणी केली. वीस दिवसांच्या आत काम पूर्ण झाले नाही तर भारतीय जनता पक्षाच्या वतीने आंदोलन करण्यात येईल असा इशारा संतोष शेट्टी यांनी दिला आहे.

साडेसहा किमी अंतर वाहिन्या टाकल्या

भोकरपाडा आणि वायाळ यादरम्यान साडेसहा किमी अंतरावर वीजवाहिन्या टाकण्यात आल्या आहेत. फक्त क्रॉसिंगचे काम उर्वरित राहिलेले आहे. महावितरण कंपनीकडून परवानगी मिळाल्यानंतर हे काम मार्गे लावण्यात येईल. असे महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडून सांगण्यात आले. सध्या पाताळगंगा फिडर मधून वीज पुरवठा केला जात आहे. आता एक्सप्रेस फिडरमधुन वीज दिली जाणार आहे. यासाठी 3.81 कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.