भारत विकास परिषदेचा वर्धापनदिन संपन्न
श्रीनिवास काजरेकर
पनवेल
समाजकार्यासाठी अग्रेसर असलेल्या भारत विकास परिषद या संस्थेच्या पनवेल शाखेचा प्रथम वर्धापनदिन उत्साहात संपन्न झाला. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ऑनलाईन स्वरुपात संपन्न झालेल्या या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून अभियंता मिलिन्द जोशी, परिषदेचे राष्ट्रीय सचीव सुरेश जैन, राष्ट्रीय उपाध्यक्ष (पश्चिम विभाग) उमेश राठी, राष्ट्रीय सचीव लक्ष्मीनिवास जाजू, कोकण प्रांत अध्यक्ष शरद माडिवाले आदी मान्यवर उपस्थित होते.
प्रसिद्ध शास्त्रीय गायिका प्रवरा जोशी यांनी आपल्या सुरेल आवाजात संपूर्ण वन्देमातम गायन करून कार्यक्रमाचा प्रारंभ केला. त्यानंतर डॉ. कीर्ती समुद्र व शुभांगी भिडे यानी अहवालवाचन केले. नंतर परिषदेचे पनवेल शाखेचे अध्यक्ष गिरीश समुद्र यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना वर्षभरात संपन्न झालेल्या उपक्रमांचा आढावा घेतला.
प्रमुख अतिथी मिलिन्द जोशी आपल्या भाषणात म्हणाले, प्रत्येक कालखंड विविध प्रश्न निर्माण करतो. त्या प्रश्नांना भिडणे महत्वाचे असते. विद्वत्ता, चारित्र्य हे प्रतिष्ठेचे निकष कालबाह्य होवून आर्थिक सुबत्तेला प्रतिष्ठा प्राप्त झाली आहे. मानवता, माणुसकी हे शब्द नष्ट होवून नफातोटा वगैरे शब्द कानी पडत आहेत. या पार्श्वभूमीवर ही संस्था मानवतेची पूजा बांधण्याचे महान कार्य करत आहे. परिषदेचे संवेदनशीलता जपलेली असून सर्वसामान्य मनुष्याची शक्ती जागृत करण्याचे काम संस्था करत आहे असे प्रशंसोद्गार मिलिन्द जोशी यानी काढले.
राष्ट्रीय संघटन सचीव सुरेश जैन यानी कार्यकर्त्याना मार्गदर्शन केले. राष्ट्रीय शाखेच्या सर्व अपेक्षा पनवेल शाखेने अल्पावधीतच पूर्ण केल्याबद्दल तसेच कोरोनाच्या पार्श्वभूमीवरही पूर्ण शक्तिनिशी संस्था कार्यरत असल्याबद्दल त्यानी सर्व कार्यकर्त्यांचे विशेष कौतुक केले. विविध संकटांमधे समाजाला आश्वस्त करण्याचे काम पनवेल शाखेने केल्याचे गौरवोद्गार जैन यानी काढले. अॅनॅमियामुक्त भारत हे महाअभियान परिषदेच्या वतीने राबविण्यात येत असून त्यामधे योगदान देण्याचे आवाहन त्यानी केले. महिलांमधे आत्मविश्वास वाढून आत्मनिर्भरता येण्यासाठी आपल्या अंगी असलेल्या विविध कलांचा वापर करून छोट्या उद्यागांवर भर देण्याचे आवाहन त्यानी महिलावर्गाला केले. याकामी परिषद सर्वतोपरी सहाय्य करेल असे आश्वासन त्यानी दिले.
परिषदेचे राष्ट्रीय उपाध्यक्ष (पश्चिम विभाग) उमेश राठी तसेच कोकण प्रांत अध्यक्ष शरद माडिवाले यांनीही आपल्या मनोगतांमधून समर्पित भावनेने विविध प्रकल्प हाती घेवून ते परिपूर्ण केल्याबद्दल पनवेल शाखेचे कौतुक केले.
हा सोहळा संपन्न करण्यासाठी अक्षय गायकर, वरुण व आकाश केळकर, डॉ. कीर्ती समुद्र, आभा जांबेकर, शुभांगी भिडे, प्राची भिडे यानी मोलाचे योगदान दिले. सचीव कमांडर दिपक जांबेकर यानी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.

चौकट..
समाजकार्याचा वसा घेवून भाारत विकास परिषद कार्यरत आहे. सीमेवर लढणाऱ्या वीर जवानांसाठी येत्या दिवाळी मधे दहा हजार पौष्टिक लाडू पोहोचवण्याचा संकल्प आम्ही सोडलेला आहे.
गिरीश समुद्र, अध्यक्ष,
भा. वि. प. , पनवेल शाखा







Be First to Comment