वंदनाताई मोरे यांनी व्यक्त केला विश्वास 🔶🔶🔷🔷
सिटी बेल लाइव्ह / पाली/बेणसे (धम्मशिल सावंत) 🔷🔶🔶🔷
मराठा समाज बांधवांच्या प्रदीर्घ संघर्ष व लढ्याला यश मिळत समाजाला आरक्षण मिळाले होते. मात्र आता सुप्रीम कोर्टाने मराठा आरक्षणाला स्थगिती दिल्याने मराठा समाज बांधवांमध्ये असंतोष पसरला आहे. पुढील आंदोलनाची दिशा ठरवून योग्य भूमिका निश्चित करण्यासाठी कोल्हापूर येथे मराठा आरक्षण प्रश्नावर गोलमेज परिषद आयोजित करण्यात आली आहे. ही गोलमेज परिषद लक्षवेधी व ऐतिहासिक ठरेल असे प्रतिपादन मराठा आरक्षण समनव्य समिती अध्यक्षा तथा ताराराणी ब्रिगेड महाराष्ट्र्र प्रदेशाध्यक्ष शिवमती वंदनाताई मोरे यांनी केले. पाली सुधागड येथे वंदनाताई मोरे यांनी मराठा आरक्षण स्थगिती या विषयावर आपली भूमिका स्पष्ट केली.
मराठा समाजाला आरक्षण मिळावे या प्रमुख मागणीसह अन्य मागण्या घेऊन मराठा समाजबांधवांनी राज्यभरात मागील 25 वर्षापासून व्यापक स्वरूपाचे आंदोलन पुकारले आहे. मराठा समाजाच्या सर्वांगीण उन्नतीसाठी आरक्षण ही काळाची गरज असल्याचे ओळखून मराठा समाजबांधवांनी आजवर 58 मूक मोर्चे, क्रांती मोर्चे, रास्ता रोको, उपोषण आदी स्वरूपाचे आंदोलन केले. या आंदोलनादरम्यान 50 मराठा बांधवांनी आपल्या प्राणाचे बलिदान दिले. मराठा समाजाच्या प्रदीर्घ संघर्षानंतर मराठा समाजाला आरक्षण मिळाले होते. मात्र आरक्षणाच्या विरोधात षडयंत्र रचून सुप्रीम कोर्टात याचिका दाखल करून मराठा समाजाच्या आरक्षणाला सुप्रीम कोर्टाने स्थगिती दिली आहे. त्यामुळे मराठा समाजातील मुले मुली यांचे नोकरी व शिक्षणाचे मार्ग बंद झाले आहेत. त्यामुळे सबंध मराठा समाजात संताप व असंतोष पसरलेला आहे. राज्यव्यापी गोलमेज परिषदेमध्ये मराठा आरक्षण संदर्भात विविध मागण्या व प्रश्नांवर सविस्तर चर्चा होणार असून मराठा आरक्षण समन्वय समितीचे अध्यक्ष विजयसिंग महाडिक व मराठा आरक्षण संघर्ष समिती चे अध्यक्ष सुरेशदादा महाडिक पुढील आंदोलनाची दिशा ठरवणार आहेत.
सदर गोलमेज परिषदेस सुधागड, रायगड, ठाणे, नवी मुंबई, मुंबई सह राज्यातील विविध जिल्ह्यातील पदाधिकारी उपस्थित राहणार असल्याची माहिती वंदनाताई मोरे यांनी यावेळी दिली.






Be First to Comment