सुधागड तालुक्यातील राजेंद्र राऊत यांच्या शेतातील आंब्याच्या झाडाला लगडले आंबे
सिटी बेल लाइव्ह / पाली/बेणसे.(धम्मशिल सावंत) 🔷🔶🔶🔷
फळांचा राजा म्हणून आंब्याची खास ओळख आहे. आंब्याचा एक विशिष्ट हंगाम असतो. हंगाम संपला की आंबा कुठे नजरेत पडत नाही. अशातच सप्टेंबर महिन्यात आंब्याच्या झाडाला आंबे आले हे ऐकल्यावर कोणालाच विश्वास बसणार नाही. पण हे सत्य आहे.! कारण सुधागड तालुक्यातील राजेंद्र राऊत यांच्या शेतातील आंब्याच्या झाडाला मोठाले आंबे लगडले आहेत.

कुतूहलाने हे आंबे पहाण्यासाठी नागरिक शेताकडे आवर्जून जात आहेत. राजेंद्र राऊत यांनी राजकारण व समाजकारणासोबत कृषी क्षेत्राकडे विशेष लक्ष दिले आहे. त्यांनी आपल्या शेतात फळे, फुले, भाज्या लागवडीचे नवनवीन प्रयोग यशस्वी करून दाखविले. त्यांनी आपल्या शेतात आंबा वृक्षलागवड केली असून त्याची वैशिष्ट्ये आगळीवेगळी असल्याचे दिसते.
पावसाळ्यात बाजारात येणारे आंबे दक्षिण भारतामधून म्हणजे कर्नाटक, बंगळुरू, तामिळनाडूमधून आणि उत्तर भारतातील लखनऊ, अलाहाबाद, बिहारमधून मुंबईच्या बाजारात येतात. मात्र रायगडात अशाप्रकारचे आंबा पिकाचे उत्पादन क्वचित पहावयास मिळते. त्यामुळे सुधागडात आलेल्या पावसाळी आंब्याविषयी सर्वत्र कुतूहल व आश्चर्य व्यक्त होत आहे.
राजेंद्र राऊत यांनी सांगितले की आंब्याची ही प्रजाती उशिरा फळ येणारी आहे. साधारण जूनमध्ये या झाडाला मोहोर आला. त्यानंतर पावसामुळे आंब्याचे नुकसान नको म्हणून काही आंब्याना आवरण घातले होते. आणि आता हे आंबे चांगले तयार झाले आहेत. त्यामुळे आंब्याचा हंगाम नसतांना देखील आंब्याची चव चाखायला मिळत आहे. असे देखील राजेंद्र राऊत म्हणाले.







Be First to Comment