Press "Enter" to skip to content

केंद्रीय पथकाने घेतला संगणकीय सादरीकरणाद्वारे आढावा

चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानी संदर्भात जिल्हा प्रशासनाने केलेल्या कार्यवाहीचा आढावा 🔷🔶🔶🔷

सिटी बेल लाइव्ह / रायगड (धम्मशिल सावंत) 🔶🔷🔶🔷

रायगड व रत्नागिरी जिल्ह्यात दि.3 जून रोजीच्या निसर्ग चक्रीवादळामुळे जिल्ह्यात गावोगावी मोठ्या प्रमाणावर नागरिकांच्या मालमत्तेचे, फळबागांचे नुकसान झाले होते. या झालेल्या नुकसानीबाबत प्रशासनाकडून करण्यात आलेल्या कार्यवाहीचा आढावा घेण्यासाठी व नुकसानीची पाहणी करण्याकरिता केंद्र शासनाच्या आंतर मंत्रालयीन पथकातील सदस्य सहसचिव (प्रशासन व सीबीटी), एनडीएमच, एमएचए, नवी दिल्ली रमेशकुमार गंटा (भाप्रसे), सल्लागार अर्थ मंत्रालय (खर्च), नवी दिल्ली आर.बी.कौल, संचालक, उर्जा मंत्रालय, सीईए, नवी दिल्ली एन.आर.एल.के. प्रसाद, उपसचिव, ग्रामीण विकास, नवी दिल्ली एस.एस.मोदी, संचालक, कृषी मंत्रालय, नागपूर आर.पी.सिंग, कार्यकारी अभियंता, क्षेत्रीय कार्यालय, रस्ते वाहतूक व महामार्ग, मुंबई तुषार व्यास हे रायगड जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले होते.

दौऱ्याच्या प्रांरभी या पथकाने अलिबाग तालुक्यातील रेवदंडा व वरसोली या ठिकाणी प्रत्यक्ष पाहणी करुन तेथील नुकसानग्रस्त नागरिकांशी संवाद साधून प्रशासनाकडून देण्यात आलेल्या मदतीबाबतची माहिती जाणून घेतली.
पाहणी दौऱ्यानंतर अलिबाग सोगाव येथील आऊट पोस्ट हॉटेल येथे आयोजित केलेल्या बैठकीत जिल्हाधिकारी रायगड श्रीमती निधी चौधरी व जिल्हाधिकारी रत्नागिरी लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी संगणकीय सादरीकरणाद्वारे दोन्ही जिल्ह्यात प्रशासनाकडून केलेल्या कार्यवाहीबाबतची माहिती केंद्रीय पथकाला दिली.

यावेळी केंद्रीय पथकातील सदस्यांनी जिल्हाधिकारी,रायगड निधी चौधरी व जिल्हाधिकारी रत्नागिरी लक्ष्मीनारायण मिश्रा यांना सूचना दिल्या की, चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानीच्या भरपाईपासून कोणीही वंचित राहणार नाही याची दक्षता घेण्यात यावी. कृषी विभाग, मत्स्य विभाग, महसूल विभाग, महावितरण या संबंधित सर्व विभागांच्या क्षेत्रीय स्तरावरील अधिकाऱ्यांनी जनतेच्या झालेल्या नुकसानीची तत्परतेने नोंद घेऊन त्या त्या विभागांनी आपली जी काही कामे असतील ती पूर्ण करुन घ्यावीत असेही सांगितले.

निसर्ग चक्रीवादळाच्या या आपत्तीमध्ये जिल्हा प्रशासनाने घेतलेल्या खबरदारीमुळे अत्यंत कमी जीवितहानी झाली, संपर्क यंत्रणा अत्यंत कमी वेळात सुरू करण्यात यश मिळविले तसेच वाहतुकीसाठी रस्ते अत्यंत कमी वेळात खुले करण्यात आले, वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी युद्धपातळीवर काम सुरू करण्यात आले, गरजूंना अत्यंत तातडीने अन्नधान्याचा पुरवठा करण्यात आला, त्याबद्दल जिल्हा प्रशासनाचे विशेष अभिनंदन केले.

यावेळी रायगड जिल्हाधिकारी श्रीमती निधी चौधरी, रत्नागिरी जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांच्यासह मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.किरण पाटील, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.सुहास माने, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी पांडुरंग शेळके, कार्यकारी अभियंता सा.बा. विभाग, अलिबाग आर.एस. मोरे, कार्यकारी अभियंता,विद्युत महावितरण श्री.पाटील, उपविभागीय अधिकारी शारदा पोवार, तहसिलदार सचिन शेजाळ, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी सागर पाठक, तहसिलदार विशाल दौंडकर, तसेच रायगड व रत्नागिरी जिल्ह्यातील विविध शासकीय विभागाचे वरिष्ठ अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.