रिलायन्स नागोठणे कंपनी क्षेत्रातील स्थानिक भूमिपुत्र, प्रकल्पग्रस्तांच्या सहनशीलतेचा उद्रेक 🔷🔶🔷🔶
व्यवस्थापन अधिकाऱ्यांच्या प्रतिकात्मक पुतळ्यावर जोडेमारो आंदोलन करीत काढली भव्य रॅली 🔶🔷🔷🔶
सिटी बेल लाइव्ह / पाली/बेणसे (धम्मशिल सावंत) 🌟💠🌟💠
आशिया खंडातील सर्वात मोठ्या प्रकल्पात समाविष्ठ असलेल्या पूर्वीची आयपीसीएल व आताची रिलायन्स नागोठणे कंपनी क्षेत्रातील प्रकल्पग्रस्त, नलिकाग्रस्त हक्काच्या नोकऱ्या मिळविण्यासाठी रक्ताचे पाणी करीत आहेत. रिलायन्स नागोठणे कंपनी क्षेत्रातील स्थानिक भूमिपुत्र, प्रकपग्रस्तांच्या मागण्यांची पूर्तता होत नसल्याने त्यांच्या सहनशीलतेचा उद्रेक झाल्याचे दिसून आले. पंचक्रोशीतील मौजे चोळे ते नागोठणे क्षेत्रातील सर्व प्रकल्पग्रस्त, नलीकाग्रस्त, कंत्राटी कामगार, कायमस्वरूपी कामगार, निवृत्त कामगार, सुशिक्षित बेरोजगार, सामाजिक कार्यकर्ते, भुमिपुत्र आदींनी रविवारी मुंढाणी फाटा (शिहु) येथे लोकशासन आंदोलन संघर्ष समितीच्या माध्यमातून भव्य रॅली काढून निषेध दर्शविला.

दरम्यान रिलायन्स व्यवस्थापन अधिकाऱ्यांच्या प्रतिकात्मक पुतळ्यावर जोडेमारो आंदोलन करीत परिसरात भव्य रॅली काढली. आंदोलन सायंकाळी उशिरापर्यंत सुरूच होते.
लोकशासन आंदोलन संघर्ष समितीच्या माध्यमातून व उच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती बी.जी.कोळसे पाटील यांच्या लढाऊ व सक्षम नेतृत्वात नोकऱ्यांसाठी प्रखरपणे लढा देत आहेत. यावेळी स्थानिक भूमिपुत्र व प्रकल्पग्रस्तांच्या गगनभेदी घोषणांनी परिसर दणाणून निघाला. यावेळी पोलीस उपविभागीय अधिकारी किरण कुमार सुर्यवंशी यांच्या मार्गर्शनाखाली पोलीस निरीक्षक दादासाहेब घुटुकडे यांनी रॅलीला अटकाव करण्याचा प्रयत्न केला, मात्र जिद्दी ने पेटून उठलेल्या महिला आंदोलन कर्त्यांनी पोलीस वाहनाच्या समोर ठिय्या आंदोलन केले, आता न्याय मिळाल्याशिवाय लढा थांबणार नाही असे ठणकावून सांगितले. स्थानिक भूमिपुत्रांच्या शेत जमिनीवर कंपनी चा डोलारा थाटला आहे मात्र येथील प्रकल्पग्रस्त नोकरीत सामावून घ्यावे यासाठी वर्षानुवर्षे आंदोलने करून न्यायाच्या प्रतीक्षेत आहेत, रिलायन्स नागोठणे कंपनीने प्राधान्य प्रमाणपत्र धारक, नलिकाग्रस्त शेतकरी यांना नोकरीत समाविष्ट करून घ्यावी या प्रमुख मागणीसह इतर मागण्या घेऊन अनेकदा संविधानिक व शांततेच्या मार्गाने मोर्चे, आंदोलने , रास्ता रोको, जाहीर प्रवेशद्वार सभा, प्रांताधिकारी, जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक देत व्यापक स्वरूपाचे लढे उभारण्यात आले.

मात्र रिलायन्स व्यवस्थापन व प्रशासनाकडून प्रकलपग्रस्तांच्या मागण्यांवर अद्याप कोणताही समाधानकारक तोडगा काढला नसल्याने आता जिंकू किंवा मरू या निर्धाराने आम्ही लढा देत असल्याचे राजेंद्र गायकवाड यांनी यावेळी सांगितले. या रॅली दरम्यान प्रकल्पग्रस्तांच्या सहनशीलतेचा उद्रेक झाल्याचे पहावयास मिळाले. आपल्याला जलद न्याय मिळावा, आता अधिक प्रतीक्षा नको या भावनेतून आंदोलनाची ठिणगी पडल्याचे दिसते.
या जोडेमारो रॅली प्रसंगी लोकशासन आंदोलन समितीचे राजेंद्र गायकवाड, गंगाराम मिनमीने, शशांक हिरे, सुरेश कोकाटे, प्रमोदिनी कुथे, जनार्दन घासे, उषा बडे, गुलाब शेलार, नीता बडे, मोहन पाटील, चेतन जाधव, बळीराम बडे, रूपा भोईर आदींसह प्रकल्पग्रस्त, नलिकाग्रत शेतकरी मोठ्या संख्यने उपस्थित होते.






Be First to Comment