


विविध जिल्हा परिषद शाळा व अंगणवाड्यांमध्ये विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य, छत्र्या, पाण्याच्या बाटल्या व खाऊचे वाटप; वाढदिवसाला सामाजिक बांधिलकीची अनोखी दिशा
वाढदिवस म्हणजे केवळ केक कापणे, फटाके उडवणे किंवा मित्रपरिवाराला मेजवानी देणे एवढ्यापुरताच मर्यादित न राहता, समाजाप्रती आपली जबाबदारी जपत तो प्रेरणादायी पद्धतीनेही साजरा करता येतो, याचे सुंदर उदाहरण सारडे विकास मंचाचे अध्यक्ष तथा सारडे गावच्या प्रसिद्ध ऑक्सिजन पार्कचे प्रेरणास्थान असलेले निसर्गप्रेमी व सामाजिक कार्यकर्ते नागेंद्र म्हात्रे यांच्या वाढदिवसानिमित्त पाहायला मिळाले.
रविवार, दि. १२ जुलै रोजी असलेल्या त्यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून शनिवारी, दि. ११ जुलै २०२६ रोजी त्यांच्या जिवलग मित्रांनी, हितचिंतकांनी, शिक्षकांनी, अधिकारी वर्गाने व महिला भगिनींनी रायगड जिल्ह्यातील विविध जिल्हा परिषद शाळा आणि अंगणवाड्यांमध्ये सामाजिक उपक्रम राबवत विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद फुलवला. विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य, छत्र्या, ओळखपत्रे (आयकार्ड), पाण्याच्या बाटल्या आणि खाऊचे वाटप करून वाढदिवसाला सामाजिक जाणिवेची अनोखी दिशा देण्यात आली.
या उपक्रमांतर्गत रा. जि. प. शाळा, पाले येथे हरिश्चंद्र म्हात्रे-पाले यांनी विद्यार्थ्यांना छत्र्या व खाऊचे वाटप केले. त्याच शाळेत आदर्श शिक्षक उपेंद्र ठाकूर –
खोपटे यांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना ओळखपत्रांचे वितरण करण्यात आले. सारडे अंगणवाडीत सुयश क्लासेसचे अध्यक्ष निवास गावंड यांनी विद्यार्थ्यांना पाण्याच्या बाटल्या भेट दिल्या.
रा. जि. प. शाळा, आवरे येथे तळोजा पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी विजय पाटील यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना खाऊचे वाटप करण्यात आले. राधाकृष्ण महिला ग्रुप, सारडे यांच्या महिला भगिनींनीही विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करून सामाजिक सहभाग नोंदवला.
रा. जि. प. शाळा, सारडे येथेल हॉटेल MDS चे मालक नितीन म्हात्रे व आतिश म्हात्रे यांनी विद्यार्थ्यांना खाऊचे वाटप केले. रा. जि. प. शाळा व अंगणवाडी, कडापे येथे प्रशांत म्हात्रे (कडापे) यांनी लहान मुलांना खाऊचे वितरण केले. तसेच रायगड जिल्हा परिषद शाळा, कोपरगाव येथे ‘युवक आधार’च्या पत्रकार ॲडव्होकेट रणिता ठाकूर यांच्या वतीने विद्यार्थ्यांना खाऊचे वाटप करण्यात आले.
या प्रसंगी रा. जि. प. शाळा पालेचे शिक्षक प्रशांत कोळी, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष नितीन म्हात्रे, उरणचे सुप्रसिद्ध निवेदक सुनील वर्तक, सदाबहार दोस्ती ग्रुप प्रतिष्ठानचे संतोष जोशी, जितेंद्र म्हात्रे, UFPO चे संचालक प्रकाश माळी, अमोल पाटील, ॲडव्होकेट रणिता ठाकूर, हितेश म्हात्रे, सारडे अंगणवाडीच्या सेविका संजीवनी म्हात्रे तसेच इतर कर्मचारी उपस्थित होते.
याशिवाय श्री राधाकृष्ण महिला ग्रुपच्या सुलक्षणा पाटील, भगवती पाटील, कविता गावंड आणि कल्पना पाटील यांनीही या उपक्रमात उत्स्फूर्त सहभाग नोंदवला.
हा संपूर्ण उपक्रम यशस्वी करण्यासाठी हरिश्चंद्र म्हात्रे, उपेंद्र ठाकूर, नितीन म्हात्रे आणि प्रकाश माळी यांनी विशेष परिश्रम घेतले.
यावेळी नागेंद्र म्हात्रे यांनी सर्व मित्रपरिवार, अधिकारी वर्ग, शिक्षक, महिला भगिनी व सहकाऱ्यांचे मनःपूर्वक आभार व्यक्त करताना सांगितले की, “वाढदिवस हा केवळ वैयक्तिक आनंदाचा दिवस नसून समाजाला काहीतरी परत देण्याची संधी आहे. आजच्या विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक जाणीव, सेवाभाव आणि माणुसकीची बीजे रुजावीत, या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आला. विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावरील आनंद हीच माझ्यासाठी सर्वात मोठी वाढदिवसाची भेट आहे.”
समाजाला सकारात्मक संदेश देणारा हा उपक्रम उपस्थितांनी कौतुकास्पद ठरवत, अशा सामाजिक पद्धतीने वाढदिवस साजरे करण्याची प्रेरणा प्रत्येकाने घ्यावी, अशी भावना व्यक्त केली.


Be First to Comment