Press "Enter" to skip to content

आ. विक्रांत पाटील यांचा अभिष्टचिंतन सोहळा उत्साहात संपन्न


सभागृहात सर्वसामान्यांचे प्रश्न आ.विक्रांत पाटील सातत्याने मांडत असल्याने त्यांचे राजकीय भवितव्य उज्वल ः महसूलमंत्री ना.चंद्रशेखर बावनकुळे

पनवेल, दि.11 (वार्ताहर) ः सभागृहात सर्वसामान्यांचे प्रश्न आ.विक्रांत पाटील सातत्याने मांडत असल्याने त्यांचे राजकीय भवितव्य उज्वल असल्याचे व पुढील काळामध्ये त्यांच्या छातीवर हिरवा मानाचा बिल्ला तुम्हाला दिसेल हा माझा शब्द आहे असे गौरवोद्गार पनवेल शहरातील रॉयल गार्डन बँक्वेट हॉल येथे आ. विक्रांत बाळासाहेब पाटील यांचा अभिष्टचिंतन सोहळा महाराष्ट्र राज्याचे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी काढले.

या कार्यक्रमाला महाराष्ट्र राज्याचे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, आमदार योगेश टिळेकर, आमदार धैर्यशील कदम, जिल्हाधिकारी किशन जावळे, प्रांत पवन चांडक, तहसीलदार मिनल भामरे-भोसले, आण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील, कोकण म्हाडाचे माजी अध्यक्ष बाळासाहेब पाटील, जे.एम.म्हात्रे, प्रदेश कार्यकारिणी सदस्य सिद्धार्थ बांठीया, शिवसेना जिल्हाप्रमुख व नगरसेवक रामदास शेवाळे, नगरसेवक राजू सोनी, राजू शर्मा, आरिफ पटेल, तानाजी खंडागळे, प्रदीप देशमुख यांच्यासह मुंबई, नवी मुंबई व पनवेलमधील महानगरपालिकेचे नगरसेवक व विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला.

यावेळी प्रस्तावनेत बोलताना आ. विक्रांत पाटील यांनी गेल्या अनेक वर्षांपासून सामाजिक व राजकीय क्षेत्रात कार्य करत असताना पनवेलमधील नागरिक, मातृशक्ती, युवाशक्ती आणि राज्यभरातील सहकाऱ्यांनी दिलेले प्रेम, विश्वास व पाठबळ हीच लोकहितासाठी कार्य करण्याची प्रेरणा असल्याचे सांगितले. जनतेचा स्नेह आणि विश्वास यामुळे समाजाच्या विकासासाठी अधिक जोमाने कार्य करण्याची ऊर्जा मिळत असल्याचे त्यांनी नमूद केले.

अभिष्टचिंतन सोहळ्याच्या निमित्ताने महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते नागरिकांना विविध लोकोपयोगी वस्तूंचे वितरण करण्यात आले. यामध्ये सायकली, शिलाई मशीन, फूड प्रोसेसर, आटा चक्की, भात पेरणी यंत्र, छत्र्या, स्पीकर्स, महिलांसाठी साड्या, ग्लुकोमीटर, रेनकोट, सीएनजी कूपन तसेच आयुष्यमान भारत कार्ड यांचा समावेश होता. शासनाच्या विविध योजनांचा लाभ आणि आवश्यक मदत समाजातील प्रत्येक घटकापर्यंत पोहोचविण्याचा हा प्रयत्न असल्याचे यावेळी सांगण्यात आले.

यावेळी ना.चंद्रशेखर बावनकुळे यांनी विक्रांत पाटील यांच्या कार्याचे कौतुक करत समाजातील सर्व स्तरातील लोकांना न्याय देण्याचा त्यांचा प्रामाणिक प्रयत्न नेहमीच दिसून आला आहे. सभागृहात येवून त्यांना वर्ष झाले आहे तरी त्यांनी जे-जे विषय मांडले आहेत ते सर्वसामान्यांच्या हिताचे होते व त्यांनी न्याय मिळवून दिला आहे. त्यामुळेच रायगड जिल्ह्याचे कलेक्टर, प्रांत व तहसीलदार यांना मी आदेश दिले आहेत की विक्रांत पाटील जे प्रश्न त्यांच्यासमोर मांडतील त्या प्रश्नांना न्याय मिळवून द्यावा व त्यांना योग्य सहकार्य करावे. सिडको, नैना या महत्वाच्या प्रश्नांकडे सुद्धा विक्रांत पाटील यांनी सातत्याने पाठपुरावा करून तो सोडविण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळेच आज एवढ्या मोठ्या सभागृहात भरगच्च गर्दी दिसून येत आहे हीच त्यांच्या कामाची पोवपावती आहे, असेही त्यांनी गौरवोद्गार काढले.

कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनाबद्दल उपस्थित मान्यवर, पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते, हितचिंतक आणि पनवेलकर नागरिकांचे आ. विक्रांत पाटील यांनी आभार मानले. तसेच पनवेलच्या सर्वांगीण विकासासाठी आणि प्रत्येक नागरिकाच्या हितासाठी भविष्यातही पूर्ण निष्ठेने व समर्पित भावनेने कार्यरत राहण्याचा निर्धार व्यक्त केला.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.