
व्हॅलेंटाईन डे : प्रेमाचे विकृतीकरण की
भारतीय संस्कृतीवर नियोजित आघात?
भारतीय संस्कृती ही त्याग, संयम आणि साधनेचा वारसा सांगणारी महान संस्कृती आहे. येथे प्रत्येक सण आणि उत्सवामागे एक सखोल अध्यात्मशास्त्र दडलेले आहे. दुर्दैवाने, आजची तरुण पिढी पाश्चात्त्यांच्या अंधानुकरणापायी ‘व्हॅलेंटाईन डे’ सारख्या संकल्पनांच्या जाळ्यात अडकत चालली आहे. हा केवळ एक ‘दिवस’ नसून, तो भारतीय कुटुंबव्यवस्थेवर, नैतिक मूल्यांवर आणि पर्यायाने हिंदु धर्मावर होत असलेले एक वैचारिक आणि सांस्कृतिक आक्रमण आहे.
१. देहबुद्धीचे उदात्तीकरण की आत्मबुद्धीचा जागर?
पाश्चात्त्यांची ‘व्हॅलेंटाईन डे’ची संकल्पना ही संपूर्णपणे ‘देहबुद्धी’वर (Body consciousness) आधारित आहे. यात केवळ शारीरिक आकर्षण आणि इंद्रियसुखाला अवास्तव महत्त्व दिले जाते. याउलट, भारतीय संस्कृती ‘आत्मबुद्धी’ (Soul consciousness) शिकवते. ज्याला आजची पिढी प्रेम म्हणते, ती खरे तर क्षणभंगुर ‘वासना’ (Lust) आहे. हिंदु धर्माने ‘प्रीती’ (Spiritual Love) सांगितली आहे. प्रीती म्हणजे निरपेक्ष प्रेम! जे शरीराकडे बघून नाही, तर समोरील व्यक्तीतील ईश्वराकडे (आत्मतत्वाकडे) बघून केले जाते, तेच शाश्वत असते. व्हॅलेंटाईन डे हा केवळ वासनेचे उदात्तीकरण करतो, तर हिंदु धर्म संयमातून ब्रह्मानंदाकडे नेतो.
२. हिंदु धर्मावरील सांस्कृतिक आणि नैतिक आघात.
‘व्हॅलेंटाईन डे’च्या निमित्ताने भारतीय बाजारपेठेत पाश्चात्त्य कंपन्यांचे कोट्यवधी रुपयांचे अर्थकारण दडलेले आहे. मात्र, या आर्थिक लुटीपेक्षाही भयानक आहे ती आपली ‘सांस्कृतिक लूट’. या दिवशी सार्वजनिक ठिकाणी होणारा स्वैराचार हा हिंदूंच्या ‘लज्जारक्षण’ या मूल्याला हरताळ फासणारा आहे. ‘व्हॅलेंटाईन डे’च्या नावाखाली तरुण पिढीला व्यसनाधीनता आणि अनैतिकतेच्या गर्तेत ढकलले जात आहे. ज्या भूमीत संयम आणि ब्रह्मचर्याचे महत्त्व सांगितले जाते, तिथे अशा ‘डे’ संस्कृतीचा उदोउदो होणे, हा हिंदु धर्माच्या मूळ तत्त्वांवर झालेला मोठा आघात आहे. ही एक प्रकारची ‘वैचारिक गुलामगिरी’ असून ती तरुण पिढीला आपल्या मुळांपासून तोडण्याचे काम करत आहे.
३. ३६५ दिवसांचे नाते की एका दिवसाचे नाटक?
पाश्चात्त्य देशांमध्ये जिथे कुटुंबव्यवस्था मोडकळीस आली आहे, तिथे नात्यांची आठवण करून देण्यासाठी ‘मदर्स डे’ किंवा ‘व्हॅलेंटाईन डे’ साजरा करावा लागतो. आमची संस्कृती ‘वसुधैव कुटुम्बकम्’ मानणारी आहे. आम्हाला प्रेमासाठी एका दिवसाच्या मुहूर्ताची गरज नाही. आई-वडील, बहीण-भाऊ, गुरु, राष्ट्र आणि धर्म यांच्यावर श्वासाच्या प्रत्येक क्षणी निरपेक्ष प्रेम करणे, ही आमची शिकवण आहे. एका गुलाबाच्या फुलात प्रेमाची व्याख्या सीमित करणे, हा मुळात प्रेमाचाच अपमान आहे. हिंदु धर्मात नाती ही ‘कॉन्ट्रॅक्ट’ (Contract) नसून ‘संस्कार’ आहेत.
४. ‘यूज अँड थ्रो’ संस्कृती विरुद्ध सात जन्मांचे बंधन.
आजची ‘डे संस्कृती’ म्हणजे मानवी भावनांचा बाजार झाला आहे. पाश्चात्त्य संस्कृती ‘Use and Throw’ (वापरा आणि फेकून द्या) या तत्त्वावर चालते, ज्यामुळे तिथे नाती टिकत नाहीत आणि घटस्फोटांचे प्रमाण प्रचंड आहे. आजचा ‘व्हॅलेंटाईन’ उद्या बदललेला असतो. याउलट, भारतीय संस्कृती ‘त्याग आणि समर्पण’ शिकवते. येथे पती-पत्नीचे नाते हे केवळ शारीरिक गरजांवर आधारित नसून ते ‘सात जन्मांचे बंधन’ मानले जाते. क्षणिक सुखासाठी आयुष्य उद्ध्वस्त करणाऱ्या या विकृत संस्कृतीची भारतीयांना गरज नाही.
५. आनंदाची खरी व्याख्या : भोग की त्याग?
अध्यात्मशास्त्र सांगते की, सुख हे उपभोगण्यात (Bhoga) नसून त्यागात (Tyaga) आहे. तरुण पिढीला वाटते की, महागड्या हॉटेल्समध्ये जाणे किंवा पबमध्ये पार्ट्या करणे म्हणजे आनंद; पण हा आनंद ‘राजसिक-तामसिक’ स्वरूपाचा असून त्याचा शेवट दुःखातच होतो. याउलट, साधना करून मिळणारा ‘आनंद’ हा सात्त्विक असतो. आई-वडिलांच्या चरणी नतमस्तक होऊन जे ‘सात्त्विक समाधान’ मिळते, ते पाश्चात्त्य उत्सवांमध्ये कधीच मिळू शकत नाही. म्हणूनच आपण ‘व्हॅलेंटाईन डे’ ऐवजी ‘मातृ-पितृ पूजन दिन’ साजरा करून आपल्या संस्कृतीचे रक्षण केले पाहिजे.
६. ‘कृती’ आणि ‘साधना’ हीच काळाची गरज.
नुसता निषेध करून चालणार नाही, तर आपल्याला ‘कृती’ करावी लागेल. सनातन संस्था ही स्वधर्म अभिमान जागृत करण्याचे कार्य करते. तरुणांनी पाश्चात्त्य विकृतीला बळी न पडता, धर्माचरण करायला हवे. जेव्हा आपण साधना करतो, तेव्हाच आपल्याला खऱ्या आणि खोट्या प्रेमातील फरक समजतो. आपल्यातील ‘प्रेमभाव’ वाढवण्यासाठी ईश्वराची भक्ती करणे आवश्यक आहे, कारण ईश्वर हाच प्रेमाचा खरा उगम आहे.
भारताला हवी ‘राधे-कृष्णाची’ ओढ!
आमचा विरोध प्रेमाला नाही, तर प्रेमाच्या नावाखाली चाललेल्या ‘स्वैराचाराला’ आणि ‘धर्मावरील आघाताला’ आहे. भारताला आज ‘रोमियो-ज्युलिएट’च्या विकृत आणि आत्मघातकी प्रेमाची नाही, तर श्रीकृष्ण आणि राधेच्या ‘आत्मिक’ आणि ‘दिव्य’ प्रेमाची गरज आहे. युवा पिढीने या सांस्कृतिक आक्रमणाला ओळखून आपल्या महान हिंदु संस्कृतीचे पालन करणे, हीच राष्ट्ररक्षणाची पहिली पायरी आहे.
- श्री. नारायण नाडकर्णी, गोवा, सनातन संस्था. (संपर्क क्र. : ९८३४२ ८०८८१)





Be First to Comment