सरकारी मातीच्या भ्रष्टाचार विरोधात अमोद मुंढे यांचा भगीरथी लढा
सिटी बेल | रोहा | समीर बामुगडे |
रायगड जिल्ह्यातील पेण तालुक्यातील कामार्ली विभागात शेकडो ब्रास माती अवैधरित्या वापरल्याचे खळबळजनक प्रकरण सामाजिक कार्यकर्ते अमोद रामचंद्र मुंढे यांच्यामुळे उघडकीस आले आहे.
एका रस्त्याच्या कामासाठी बेकायदेशीर मार्गाने शेकडो ब्रास माती वापरली आहे. मात्र या कामात महसूल विभागाच्या डोळ्यात धुळ टाकत राजरोस अवैध काम झाले आहे. अमोद मुंढे यांनी सातत्याने या विषयाचा पाठपुरावा केला आहे. पण पेण तहसील कार्यालयाच्या प्रतिसादावरून कुंपणच शेत खात असल्याचे हळूहळू स्पष्ट होते आहे.
आंबेघर भागात मौजे धावटे येथील मातीचे खननं झाले.100 ब्रासची शासकीय रॉयल्टी भरून तब्बल 1000 ब्रासचे उत्खनन केले गेले. ज्या परिसरात उत्खनन झाले. तेथूनच हेटवणे मध्यम प्रकल्प उजवा तीर कालवा गेलेला आहे. त्याचे भान सोडा त्या कालव्याच्या जागेची माती देखील वापरण्यात आली आहे. म्हणजे किती खुलेआम साटेलटे या गैरकारभारात गुंतले आहेत. तक्रारदार या चुकीच्या कारभाराबाबतीत तहसीलदार तसेच प्रांत कार्यालयात पाठपुरावा करत आहे. सापोली येथे देखील अशीच मातीची निर्वेधपणे खुलेआम खोदाई झाली आहे. परवानगी पेक्षा कैकपटीने मातीची खोदाई तसेच गैरमार्गाने केलेले भराव. खरेतर पेण महसूल विभागाने याबाबतीत आपणहून कारवाई करणे अत्यावश्यक आहे. पण कारवाई सोडा संबंधीत घटनेत अवैध उत्खनन करणाऱ्यांना पाठीशी घालण्याचे घातकी तंत्र वापरले जात आहे.
आता तक्रारदार अमोद मुंढे यांनी पत्रकार परिषद घेऊन आपला हा लढा जाहीर केला आहे. रायगड जिल्हाधिकारी महेंद्र कल्याणकर यांच्या पर्यंत आता हा अकल्पनीय कारभार गेला आहे. माहिती अधिकार सह सर्व तक्रारी असताना “ताकास तुर” न लागु देता शुन्य कृती करणाऱ्या व शासनाचेच नुकसान करण्याच्या घटनेत जिल्हाधिकारी कोणती कारवाई करतात.याकडे पेणकर जनतेसह रायगडच्या जनतेचे लक्ष लागले आहे.








Be First to Comment