काँग्रेस सक्षम करण्यासाठी सक्रिय नसलेल्या पदाधिकाऱ्यांना बदलणे गरजेचे आहे — चारुशीला टोकस
सिटी बेल | कर्जत | संजय गायकवाड |
‘भाजपचे सरकार आल्यापासून महागाई मोठ्या प्रमाणात वाढली आहे. त्यांनी सोशल मिडियाला हाताशी धरून तरुणांना व महिलांना भुलवले आणि सत्ता आणली. आपले सरकार असताना गॅस, पेट्रोलचे थोडे जरी दर वाढले तरी ते किती आकांड तांडव करीत होते. ते सर्व देशाने पाहिले आहे. काँग्रेस पक्ष काय आहे आणि त्याची देशाला काय गरज आहे ? हे आपल्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी रस्त्यावर उतरून जनतेला सांगितले पाहिजे. तळागाळातील कार्यकर्त्यांशी सुसंवाद साधून त्यांना सक्रिय करणे गरजेचे आहे. नुसतीच पदे घेऊन बसलेले सक्रिय नसलेल्या पदाधिकाऱ्यांना बदलणे गरजेचे आहे कारण 2024 साल आपल्यासाठी महत्वाचे आहे. नाहीतर ‘अभी नही तो कभी नाही’ अशी परिस्थिती होईल.’ असे महत्वपूर्ण प्रतिपादन महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या उपाध्यक्ष व रायगड जिल्ह्याच्या प्रभारी चारुशीला टोकस यांनी येथे केले.
कर्जत तालुका काँग्रेसच्या वतीने तालुक्यातील पोसरी येथील वसंत सृष्टी रिसॉर्टमध्ये प्रमुख कार्यकर्त्यांना आमंत्रित करून आढावा घेण्यासाठी बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. तालुका अध्यक्ष मुकेश सुर्वे आणि नेरळ शहराध्यक्ष असिफ अत्तार यांनी उपस्थित मान्यवरांचे स्वागत केले. यावेळी व्यासपीठावर प्रदेश सरचिटणीस श्रीरंग बर्गे, रायगड जिल्हा काँग्रेस अध्यक्ष महेंद्र घरत, उपाध्यक्ष मिलिंद पाडगावकर, सरचिटणीस प्रमोद राईलकर, रियाज बुबेरे, खोपोली शहर अध्यक्ष रिचर्ड जॉन आदी उपस्थित होते.
मुकेश सुर्वे यांनी प्रास्ताविकात आढावा बैठकीचा उद्देश सांगताना, ‘आगामी निवडणुकांना सामोरे जाताना महाविकास आघाडी बरोबर जायचे की स्वबळावर निवडणूक लढवायची हे वरिष्ठ पदाधिकाऱ्यांनी सांगावे. आपण सांगाल त्याची अंमलबजावणी करण्यास आम्ही बांधील आहोत.’ असे स्पष्ट केले. याप्रसंगी अकलाक शिलोत्री यांची नव्यानेच जिल्हा काँग्रेस अल्पसंख्याक सेल अध्यक्षपदी तर पेण आदिवासी प्रकल्प अध्यक्षपदी
दत्तात्रेय सुपे यांची निवड नियुक्ती झाल्याबद्दल त्यांचा टोकस यांच्या हस्ते विशेष सन्मान करण्यात आला. त्यानंतर कार्यकर्त्यांनी युवक काँग्रेस, महिला काँग्रेस सक्षम करण्याची आवश्यकता असल्याचे सांगून कार्यकर्त्यांना बळ देण्याची गरज असल्याचे सांगितले. संदीप पाटील, प्रमोद राईलकर आणि रियाज बुबेरे यांनीही समस्या मांडल्या.
टोकस पुढे म्हणाल्या, ‘भाजपवाल्यांनी दिलेली आश्वासने किती पाळली? हे जनतेला रस्त्यावर उतरून सांगितले पाहिजे. सर्वप्रथम आपण विविध सेलच्या नियुक्त्या करणे आवश्यक आहे. त्यामुळे आगामी नगरपरिषदा, जिल्हा परिषदा, पंचायत समितीच्या निवडणुका लढवताना सोपे जाईल. तसेच बूथ कमिट्या नियुक्त केल्या पाहिजेत. स्थानिक परिस्थितीनुसार कामाला लागा.’ श्रीरंग बर्गे यांनी, ‘या तालुक्यात काँग्रेस भक्कम आहे. असे तुमच्याशी चर्चा करताना लक्षात आले. त्यामुळे कार्यकर्त्यांना सक्रिय करणे गरजेचे आहे.’ असे स्पष्ट केले. महेंद्र घरत यांनी, ‘आता संपूर्ण जिल्ह्यात विविध सेलच्या नियुक्त्या करायच्या आहेत. तसेच आपल्याला विकास कामे सुद्धा करायची आहेत. त्यासाठी कुठे कामे करायची आहेत त्यांची यादी तालुका अध्यक्षांकडे द्या. काही युवकांना त्यांच्या गुणवत्तेनुसार नोकऱ्या मिळण्यासाठीही आम्ही प्रयत्नशील राहू.’ असा शब्द दिला. सूत्रसंचालन संदीप सोनटक्के यांनी केले.
याप्रसंगी नाना म्हात्रे, कृष्णा पारंगे, आवेश जुवरी, लक्ष्मण ऐनकर, धनंजय चाचड, सुभाष मदन, संजय सुर्वे, मंगल माळी, देविदास ऐनकर, यतीन यादव, अरविंद कटारिया आदी प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते.








Be First to Comment