Press "Enter" to skip to content

उरण तालुक्यातील मोठीजुई गावात आजपासून मोफत डिजिटल सातबारा वाटप कार्यक्रम सुरू

सिटी बेल | उरण | मोठीजुई |

आज २ ऑक्टो. २०२१ रोजी महाराष्ट्र शासनाच्या महसूल विभागाने स्वतंत्र दिनाच्या ७५ व्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त महात्मा गांधी व लाल बहादूर शास्त्री यांच्या जयंती २ ऑक्टोबर पासून राज्यभर मोफत डिजिटल सातबारा वाटप कार्यक्रम सुरू केला असून त्याअनुषंगाने उरण तालुक्यातील मोठीजुई गावात आजपासून या गावातील शेतकरी बांधवांना मोफत डिजिटल सातबारा वाटपाचा कार्यक्रम ग्रुपग्रामपंचायत मोठीजुई येथे निवासी नायब तहसीलदार गजानन धुमाळ, गृप ग्रामपंचायत मोठीजुई सरपंच सौ.आशाताई भोईर,ग्रामविकास अधिकारी रुपम गावंड, माजी सरपंच महेश पाटील, उत्तम भोईर, तलाठी जुई, शशिकांत सानप,उपक्रमशिल शिक्षक मोठीजुई संजय होळकर, दर्शन पाटील, गावचे पोलीस पाटील सौ.चेतना पाटील गावातील प्रगतशिल शेतकरी मनोहर पाटील,यादव कामोठकर व इतर तसेच सर्व ग्रामपंचायत सदस्य आणि कर्मचारी वर्ग उपस्थित होते.

सुरुवातीला मान्यवरांच्या हस्ते राष्ट्रपिता महात्मा गांधींच्या व देशाचे माजी पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांच्या प्रतिमेचे पूजन व पुष्पहार अर्पण करून दीप प्रज्वलन करण्यात आले.

तद्नंतर धुमाळ यांचे पुष्पगुच्छ देऊन मा. सरपंच यांच्या हस्ते स्वागत करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक या कार्यक्रमाचे आयोजक शशिकांत सानप तलाठी यांनी केले.यात गेले दोन महिने शासनाच्या ई पीक पाहणी अंतर्गत मोठीजुई गावातील बहुसंख्य प्रगतशील शेतकरी वर्गाने सहभागी होऊन सहकार्य केले. त्यामुळे हा उरण तालुक्यात पहिला बहुमान आपल्या मोठीजुई गावाला मिळाला याचा खूप आनंद होत आहे. यापुढेही १००% उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी शासनाने १५ ऑक्टोबर पर्यंत मुदतवाढ दिली आहे.आपण हे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी सहकार्य कराल अशी अपेक्षा व्यक्त केली.

प्रगतशील शेतकरी महेश पाटील, शिवचंद्र भोपी, सरपंच सौ. आशाताई भोईर यांनी आपली मनोगते व्यक्त केली.अध्यक्षीय भाषणात धुमाळ यांनी मोठीजुई गावातील शेतकरी व तलाठी, कोतवाल,पोलीस पाटील,ग्रामपंचायत यांचे अभिनंदन करताना पंतप्रधान किसान योजना,संजय गांधी निराधार योजना यांचे महत्व व गरज पटवून दिली. शेतकरी वर्गाच्या समस्या जाणून संवाद साधला व आपल्या समस्या वर तहसील कार्यालयाकडून लागणारे सहकार्य करण्याचे आश्वासन दिले.तसेच शेतकरी सहकार्याबद्दल समाधान व्यक्त केले. तद्नंतर प्रातिनिधिक स्वरूपात १५ ते २० शेतकरी यांना मोफत डिजिटल स्वाक्षरी सातबारा वाटप कार्यक्रम घेण्यात आला. शासन आपल्या दारी या मोहिमेतर्गत सर्व शेतकरी यांना सोमवार पासून घरपोच सातबारा वाटप केले जातील.असे सांगण्यात आले.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन मोठीजुई शाळेचे उपक्रमशिल शिक्षक संजय होळकर सर यांनी केले.

त्यानंतर धुमाळ यांनी रायगड जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मोठीजुई शाळेला भेट दिली. त्यांनी शालेय परिसर,इमारत व स्वच्छता गृह,पिण्याच्या पाण्याची सोय यांना प्रत्यक्ष भेट देऊन समाधान व्यक्त केले. व काही मदत लागली तर निश्चितच मदत केली जाईल असे आश्वासन दिले.
सदर कार्यक्रम हा मा.जिल्हाधिकारी रायगड महेंद्र कल्याणकर, मा.उपविभागीय अधिकारी पनवेल राहुल मुंडके,उरण तालुक्याचे तहसिलदार भाऊसाहेब अंधारे यांच्या मार्गदर्शनाखाली सुनियोजित वेळेत समाधानकारक पार पडला.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.