Press "Enter" to skip to content

महाड पूरग्रस्त, दरडग्रस्तांना उरण सामजिक संस्थेचा मदतीचा हात

सिटी बेल | उरण | विठ्ठल ममताबादे |

उरण सामाजिक संस्थेने महाड पूरग्रस्त दरडग्रस्त भागात मदतकार्य अभियान राबवले. संस्थेच्या कार्यकर्त्यांची टीम यासाठी गेले काही दिवस झटत होती. जवळपास 100 हुन अन्न धान्य यासह जीवनावश्यक वस्तूंचे संच, कपडे, औषधे, भांडी, चटई, ब्लँकेट, चादर, टॉवेल, पिण्याचे पाणी अशी मोठ्या प्रमाणातील मदतीचे वाटप करण्यात आले.

महाड शहरासह सावित्री, काळ नदीकाठच्या गावामध्ये पुराने थैमान घातलं होतं. यातून घरे, दुकानातील सर्व चीज वस्तूंचे मोठं नुकसान झालं आहे. तलीये गावात डोंगर खचून संपूर्ण गाव गाडलं गेलं. त्या गावाला भेट देऊन तिथं असलेल्या मृतांच्या नातेवाईकांचे सांत्वन करण्याचा प्रयत्न या मोहिमेतील सारे कार्यकर्ते करत होते.

संपूर्ण महाराष्ट्रातून मदतीचा ओघ सुरू आहे. त्यामुळे जिथं मदतकार्य पोहचले नाही झालं नाही अशी गावं शोधून तिथल्या बाधित कुटुंबांना संस्थेने जमा केलेली मदत देण्यात आली. कसबे शिवथर घळ या महाड शहरापासून 30 किमी दुर्गम गावात नदीकाठची शेती पूर्णतः वाहून गेली. पुराच्या प्रचंड पाण्याने ठिकठिकाणी कोसळलेल्या दरडीने नदी प्रवाह बदलल्याने ही परिस्थिती ओढवली असल्याचे ग्रामस्थ सांगत होते. या गावात 70 कुटुंबांना मदत करण्यात आली.

या मार्गातील नुकसानग्रस्त अनेक गरजू कुटुंबाना मदत केली. पूरग्रस्त खरवली, आसनपोई, गांधारपाले, काही आदिवासी वाड्या तसेच महाड शहरात कपडे, ब्लँकेट, चटई, अन्न धान्य किट, भांडी आदींचे वाटप करण्यात आले. हे वाटप करताना संस्थेच्या प्रत्येक सदस्यांच्या मनात त्या कुटुंबांना दिलासा देण्याची भावना होती. मदत देणारे आणि मदत स्वीकारणारे यातील आपण माध्यम असल्याचे संस्थेचे सरचिटणीस संतोष पवार यांनी सांगितले. संस्थेचे उपाध्यक्ष रुपेश पाटील यांनी ग्रामस्थांशी संवाद साधत त्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला.

या अल्प मदतीने झालेल्या नुकसानाची भरपाई होऊ शकत नाही पण संकटात समाजासोबत उभं राहणं हे आमचं कर्तव्य आहे ते पार पाडण्याचा आम्ही प्रामाणिक प्रयत्न करत असल्याचे सांगितले. विलास गावंड, भरत मढवी वैभव पाटील यांनीही संवाद साधत पर्यावरणाचे महत्व अधोरेखित करताना विकास करताना निसर्ग पर्यायाने मानवी जीवन भकास होणार नाही याची काळजी घेण्याची गरज असल्याचे सांगितले. यावेळी संस्थेचे विभागप्रमुख दिलीप पाटील, विनोद कदम, प्रशांत पाटील, हरीश पाटील, दौलत पाटील, माऊली देशमुख, सदाशिव जाधव, संदीप म्हात्रे, अरुण पाटील, योगेश घरत, नीलम घरत, मयुरी घरत, भाई तांडेल तसेच एन्जॉय ग्रुपचे अनिल ठाकूर, सिद्धार्थ फाळके, आनंद म्हात्रे, पप्पू तोरणे उपस्थित होते.

तत्पूर्वी संस्थेच्या वतीने जनतेला मदतीचे आवाहन करण्यात आले होते. संस्थेचे अध्यक्ष सुधाकर पाटील, कॉ. भूषण पाटील, दिनेश घरत, नाना गायकवाड, सीमा घरत, प्रमोद ठाकूर , राजेंद्र मढवी, सुरेंद्र पाटील, सचिन वर्तक, अशोक पाटील यांनीही महाड येथील संकटग्रस्तांना मदत मिळवण्यासाठी खूप मेहनत घेतली.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.